অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना

अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन वसतीगृहाची सोय करते. मात्र ज्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश मिळालेला नाही अशाने काय करायचे. त्यासाठी अशा विद्यार्थ्यांना शासनाने नवीन योजना आणली आहे. या योजनेचे नाव आहे... भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना. याविषयीची माहिती घेऊया.

अशा विद्यार्थ्यांना मॅट्रीकोत्तर शिक्षण घेता यावे तसेच भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा स्वत: उपलब्ध करुन घेण्यासाठी आवश्यक ती रक्कम संबंधित विद्यार्थ्यांच्या आधार कार्ड संलग्न बँक खात्यामध्ये थेट उपलब्ध करून दिली जाणार आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने क्रं. बीसीएच-2016/प्र.क्र.293/शिक्षण-2, मंत्रालय, विस्तार भवन, मुंबई-32 दिनांक 6 जानेवारी, 2017 अन्वये “ भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना ” राबविण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे.

योजनेचा लाभ मिळण्यासाठी पात्रता

  • यासाठी विद्यार्थी अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील असावा.
  • विद्यार्थ्यांने प्रवेश घेतलेली शैक्षणिक संस्था ज्या ठिकाणी आहे अशा स्थानिक ठिकाणचा रहिवासी नसावा.
  • सन 2016-2017 या वर्षामध्ये इयत्ता 11 वीचे विद्यार्थी इयत्ता 12 वीनंतर प्रथम वर्षात प्रवेश घेणारे पदविका, पदवीचे विद्यार्थी आणि प्रथम वर्षात प्रवेश घेणाऱ्या पदव्युत्तर पदवी / पदवीकाचे विद्यार्थ्यांना हा लाभ दिला जाणार आहे.
  • सन 2017-2018 पासून पुढे हा लाभ 11 वी व 12 वीचे विद्यार्थी आणि 12 वीनंतर प्रथम वर्ष पदविका, पदवी व पदव्युत्तर पदविका व पदवीच्या विद्यार्थ्यांनाही हा लाभ दिला जाणार आहे.
  • अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी तीन टक्के आरक्षण असेल.
  • त्यांच्या पात्रतेची किमान टक्केवारी 50 टक्के असावी.
  • दिव्यांग विद्यार्थी वगळता इतर विद्यार्थ्यांसाठी इयत्ता 10 वी, 12 वीमध्ये किमान 60 टक्के गुण असणे आवश्यक आहे.
  • त्यापेक्षा कमी गुण असणारे विद्यार्थी या योजनेस पात्र होणार नाहीत.
  • विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवाशी असावा व कुटूंबाचे / पालकांचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावे.
  • विद्यार्थ्यांने स्वत:च्या नावे राष्ट्रीयकृत / शेड्युल बँकेत खाते उघडणे व आधार क्रमांकाशी संलग्न करणे अनिवार्य आहे.
  • विद्यार्थी शासन निर्णयातील तरतुदीप्रमाणे इयत्ता 10 वी किंवा 12 वीनंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेशित असावा. त्यास कोणत्याही शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश मिळालेला नसावा.
  • 12 वीनंतरच्या तसेच पदवीनंतर पदव्युत्तर पदवी/पदवीका अभ्यासक्रम हा दोन वर्षांपेक्षा कमी कालावधीचा नसावा.
  • विद्यार्थी केवळ प्रथम वर्षात प्रवेशित असावा.
  • विद्यार्थ्यांने प्रवेश घेतलेले महाविद्यालय व अभ्यासक्रम यास राज्य शासन व संबंधित तत्सम सक्षम प्राधिकारी यांची मान्यता असणे आवश्यक आहे.
  • विद्यार्थ्यांची निवड गुणवत्तेनुसार करण्यात येईल. निवडलेला विद्यार्थी संबंधित अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत लाभास पात्र राहील.
  • ही सवलत शैक्षणिक कालावधीत जास्तीजास्त सात वर्षापर्यंत घेता येईल.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी प्रत्येक वर्षी किमान 60 टक्के गुण मिळविणे आवश्यक आहे. अन्यथा तो या योजनेस अपात्र होईल. विद्यार्थ्यांने खोटी माहिती व कागदपत्र देवून या योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न केल्यास किंवा शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण न केल्यास अथवा नोकरी व व्यवसाय करीत असल्यास किंवा इतर मार्गाने या योजनेचा लाभ घेऊन गैरवापर केल्याचे निदर्शनास आल्यास तो कारवाईस पात्र राहील. तसेच त्यास दिलेल्या रक्कमेची 12 टक्के व्याजासह वसुली केली जाईल.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी 16 मार्च 2017 पर्यंत अर्ज करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी संबंधित विद्यार्थ्यांनी आपल्या जिल्ह्याच्या संबंधीत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जाचा विहीत नमुना https://mahaeschol.maharashtra.gov.in ,
https://sjsa.maharashtra.gov.in ,
https://www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.

लेखक - अरुण सूर्यवंशी,
जिल्हा माहिती अधिकारी, हिंगोली.
स्त्रोत- महान्युज

 

अंतिम सुधारित : 7/19/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate