অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

अलुते-बलुते

परंपरागत वतनी हक्क

भारतीय खेड्यांतील परंपरागत वतनी हक्क. हे हक्क ग्रामीण अर्थव्यवस्थेचा पाया होत. खेड्यांत राहणाऱ्या बिगर-शेतकरी लोकांचा व्यवसाय हा परंपरेने चालत आल्यामुळे त्याला कुलपरंपरागत हक्काचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यामुळे हे व्यवसाय व त्यांना मिळणारा मोबदला हे प्रत्येक व्यावसायिकाचे वतनी हक्क झाले आहेत. हे वतनी हक्क ‘अलुते-बलुते’नावाने ओळखले जातात. या हक्कांवरून शेतकरी व त्यांवर उदरनिर्वाहाकरिता पूर्णपणे अवलंबून असणारे बिगर-शेतकरी लोक यांचे परस्परसंबंध वैशिष्ट्यपूर्ण असल्याचे दिसून येते. शेतकऱ्‍यांबरोबरच्या इतर लोकांच्या या परस्परसंबंधांना उत्तरेत जजमानी (यजमानी) पद्धत व महाराष्ट्रात ‘अलुतेदारी-बलुतेदारी’म्हणतात. या जजमानी किंवा अलुतेदारी-बलुतेदारी पद्धतीत शेतकरी हा यजमान समजला जातो, तर बिगर-शेती-व्यावसायिक हे ‘कामिन्’(इच्छुक) समजले जातात.

नारू-कारू

महाराष्ट्रात अशा बिगर-शेती व्यावसायिकांचे अलुतेदार अगर ‘नारू’आणि बलुतेदार अगर ‘कारू’असे दोन प्रकार आढळतात. शेतकऱ्‍यांची अधिक महत्त्वाची कामे करणारे, त्यांच्या नित्याच्या गरजा भागविणारे ते बलुतेदार. साहजिकच त्यांना मोबदलाही अधिक मिळतो. सामान्यपणे पाटील, कुलकर्णी हे सोडून चौगुला, महार, सुतार, लोहार, चांभार, कुंभार, न्हावी, सोनार, जोशी, परीट, गुरव आणि कोळी हे प्रामुख्याने ‘बारा बलुतेदार’म्हणून प्रसिद्ध आहेत. ज्यांच्यावाचून शेतकऱ्‍यांचे नडत नाही, पण जे शेतकऱ्यांच्या नैमित्तिक गरजा भागवितात ते अलुतेदार. यांमध्ये तेली, तांबोळी, साळी, सनगर, शिंपी, माळी, गोंधळी, डवऱ्या, भाट, ठाकर, गोसावी, मुलाणा, वाजंत्री, घडशी, कलावंत, तराळ, कोरव, भोई या अठरा जाती येतात. प्रत्येक गावात हे सर्व असतातच असे नाही. स्थलकालपरत्वे, अलुतेदार व बलुतेदार हे परस्परांची कामे करताना दिसून येतात.

अलुतेदार-बलुतेदार हे करीत असलेल्या व्यवसायांच्या उपयुक्ततेवरून थोरली, मधली आणि धाकटी ओळ किंवा कास अशी त्यांची प्रतवारी केली जाते. मोबदला हा औतावरून ठरवितात. न्हाव्याचा मात्र पुरुष-माणसांच्या संख्येवरून ठरतो.

शेतीच्या कामाव्यतिरिक्त लग्न किंवा इतर धार्मिक-सामाजिक समारंभांतही महार-मांगांसकट सर्व अलुत्या-बलुत्यांची कामे परंपरेने ठरलेली असतात. त्यांकरिता त्यांना खण-नारळ वगैरे मोबदला कामाप्रमाणे व ऐपतीप्रमाणे मिळतो. या अलुतेदारी-बलुतेदारी पद्धतीत एकंदर गावातील बिगर-शेती-व्यवसायातील कुटुंब, त्याचे काम आणि त्याचा मोबदला यांचा निश्चित आणि अभेद्य संबंध दिसून येतो. यात काहींना अलुत्या-बलुत्यांची पिळवणूक दिसते, तर काहींना शेतकऱ्यांचा छळ दिसतो.

ग्रामीण अर्थव्यवस्थेस आधारभूत असलेली ही पद्धत औद्योगिकीकरणाच्या व नागरीकरणाच्या प्रभावाखाली आता मोडकळीस आलेली दिसते. आपापल्या वाढत्या गरजा व अपेक्षा भागविण्याकरिता सर्वांनाच शहराकडे धाव घ्यावी लागत असल्यामुळे खेड्यातील पूर्वीचे परस्परावलंबन कमी होत चालले आहे. पैशाच्या विनिमय-माध्यमामुळेही यावर परिणाम झाला आहे. बऱ्याच ठिकाणी १९३३ सालापासूनच महारांनी त्यांच्यातील नवजागृतीमुळे आपले वतनी हक्क आणि गावकीची कामे सोडून देण्यास सुरवात केली. या सर्व गोष्टींचा परिणाम ही पद्धत कमकुवत होण्यात झाला आहे.

संदर्भ : 1. Beidelman, Thomas, O. A Comparative Analysis of the Jajmani System, New York,1959.

2. Orenstein, Henry, Gaon Conflict and Cohesion in an Indian Village, New Jesrsey, 1965.

3. Wiser, W. H. The Hindu Jajmani System, Lucknow, 1936.

४. अत्रे, त्रिं. ना. गांव-गाडा, मुंबई, १९५९.

५. दांडेकर, वि. म.; जगताप, म. भा. महाराष्ट्राची  ग्रामीण समाजरचना, पुणे, १९५७.

लेखक: रामचंद्र मुटाटकर

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/28/2023



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate