दुर्गामाता मंदिर जीर्णोद्धाराच्या निमित्ताने गावकऱ्यांनी संपूर्ण गाव गो-पालक करायचे ठरविले. प्रत्येकाने एक देशी गाय संगोपनाचा निर्णय घेतला. शेती आणि आरोग्य समृद्धीचा वसा गावकऱ्यांनी घेतला. हा आगळा-वेगळा उपक्रम राबवून नगर जिल्ह्यातील शिराळ (चिचोंडी) गावाने वेगळी ओळख तयार केली आहे. नगर जिल्ह्याच्या पाथर्डी तालुक्यातील शिराळ (चिचोंडी) हे 475 उंबरे असलेले गाव. बाजरी, कांदा आणि कपाशी ही प्रमुख पिके. रब्बी हंगामात ज्वारीची लागवड ठरलेली. गावातील संपूर्ण पीक पद्धती ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून. ज्यांच्या विहिरीला थोडेफार पाणी टिकते, त्यांनी डाळिंब, संत्रा लागवड केली आहे. खरीप हंगामातील कांदा हेच आर्थिक उत्पन्नाचे भरवशाचे पीक. जवळपास 70 टक्के क्षेत्र कांदा लागवडीखाली असते. येथील कांदा नगर, घोडेगाव आणि पुणे बाजारपेठेत जातो. जिरायती गाव असल्याने शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालनावर शेतकऱ्यांचा भर आहे, त्यामुळे ज्यांच्याकडे चाऱ्याची सोय आहे, त्यांच्याकडे एक-दोन जर्सी गाई दिसतात. गावात सर्व जाती-धर्मांचे लोक गुण्यागोविंदाने राहतात, त्यामुळे गाव तंटामुक्त आहे. गेल्या आठ वर्षांत लोक सहभागातून गावकऱ्यांनी दुर्गामाता मंदिराचा जीर्णोद्धार केला. 12 मे रोजी झालेल्या मंदिराच्या कलशारोहण समारंभामध्ये राजस्थान येथील राधाकृष्णजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली गावामध्ये विविध कार्यक्रम झाले. या कार्यक्रमाच्या नियोजनाच्या वेळी जीर्णोद्धार समितीपुढे राधाकृष्णजी महाराजांनी एक प्रस्ताव मांडला, की गावातील प्रत्येक घरात एक देशी गाय असावी. त्याचा शेती आणि आरोग्यासाठी फायदा होईल. गावातील कारभाऱ्यांनाही हा विचार पटला. बैठक घेतली. सर्वांनी तयारी दर्शविली. प्रत्येक घरात देशी गाय संगोपनाचा निर्णय झाला. फेब्रुवारी महिन्यापासून पंचक्रोशीतील शेतकऱ्यांच्या कडून 330 देशी गायांची एकत्रित खरेदी झाली. त्यानंतर पुन्हा 275 देशी गायींची खरेदी करण्यात आली. अशा प्रकारे संपूर्ण गावात आता 605 देशी गाईंचे संगोपन करण्यात येत आहे. या गाईंमध्ये प्रामुख्याने खिल्लार, डांगी, लाल कंधारी, गीर गाईंची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. काही शेतकऱ्यांनी घोडेगाव बाजारातून गीर गाईंची खरेदी केली. सरासरी आठ लिटर दूध या गीर गाई देतात
अशी झाली गाईंची खरेदी
1) संपूर्ण गावाने देशी गोवंश संगोपनाचा निर्णय घेतल्यानंतर गाईंचा शोध सुरू झाला. परिसरातील शेतकऱ्यांकडून देशी गाईंची खरेदी झाली; परंतु शेतकऱ्यांकडून देशी गायी कमी प्रमाणात उपलब्ध झाल्या.
2) गावकऱ्यांनी चांदा, जेऊर आणि नगर येथील कत्तलखान्यामध्ये आलेल्या देशी गाईंची खरेदी केली. सुमारे 175 गायी कत्तलखान्यातून शेतकऱ्यांनी विकत घेतल्या. कत्तलखाना मालक सांगेल त्या किमतीला या गायी खरेदी करण्यात आल्या. अक्षरश: मृत्यूच्या दाढेतून या गायी परत गोठ्यात आल्या.
3) प्रत्येक कुटुंबाने ज्याच्या त्यांच्या पसंतीप्रमाणे गाय विकत घेतली. कोणी सहा हजार रुपये, कोणी 15 हजार रुपये या किमतीची गाय खरेदी केली. ज्यांची आर्थिक स्थिती चांगली नव्हती, त्यांनी पाच-दहा हजारांत कालवडींची खरेदी केली.
4) प्रत्येक कुटुंबाने देशी गाय पाळण्याचा निर्णय घेतल्यानंतर उत्साह वाढलेल्या ग्रामस्थांनी राधाकृष्णजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतःहून शपथ घेतली, की जोपर्यंत शरीरात प्राण आहे, तोपर्यंत गायींचे रक्षण करणार. कोणीही कत्तलखान्यासाठी गाय विकणार नाही.
5) संपूर्ण गाव गो-पालक झाल्यामुळे प्रत्येक कुटुंबात आता दररोज गाईंची पूजा होऊनच इतर कामांना प्रारंभ होतो.
6) कुटुंबासाठी देशी गाईचे दूध आणि शेतीसाठी गोमूत्र आणि शेणाची उपलब्धता. त्यातून मानवी आरोग्य आणि जमिनीच्या सुपीकतेवर भर गावकऱ्यांनी दिला आहे.
पशुपालनावर भर...
जिरायती गाव असल्याने पावसावर शेती अवलंबून. चांगला पाऊस झाला तरच कपाशी, कांदा, बाजरीचे चांगले उत्पन्न हाती येते. त्यामुळे शेतीला जोडधंदा म्हणून शेतकऱ्यांच्याकडे एक-दोन दुधाळ जनावरे आहेत. रब्बी ज्वारीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असल्याने चाऱ्याची उपलब्धता चांगली होते. पूर्वी शेतकऱ्यांकडे जर्सी गाईंची संख्या मोठ्या प्रमाणात होती; परंतु गेल्या तीन वर्षांतील दुष्काळी परिस्थितीमुळे संकरित गाईंची संख्या कमी झाली. सध्या गावात दोन डेअरी आहेत. दररोज सरासरी 200 लिटर दुधाचे संकलन होते.
आता प्रत्येक कुटुंबाकडे देशी गाय आहे. संकरित गाईंच्यापेक्षा देशी गाईंच्या संगोपनाचा खर्च कमी आहे. घरापुरते दूध मिळते. या गाईंच्या शेणाचा उपयोग गांडूळ खत तयार करण्यासाठी केला जातो, तसेच गोमूत्र हे पाटपाण्याद्वारा पिकांना दिले जाते. जनावरांच्यामुळे प्रत्येक जणाकडे पुरेसे शेणखत उपलब्ध होत आहे. त्याचा जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी उपयोग होईल. जातिवंत देशी गोवंश संगोपन आणि सेंद्रिय शेतीचे ध्येय गावकऱ्यांनी ठेवले आहे.
पीक उत्पादनवाढीसाठी उपक्रम
1) गावात कांदा लागवडीचे क्षेत्र मोठे आहे. या पिकाच्या उत्पादनवाढीसाठी कृषी विभागातर्फे कार्यशाळा आयोजित केल्या जातात. शेतकरी कांदा, फळबागेसाठी ठिबक सिंचनाचा अवलंब करतात. येथील प्रयोगशील शेतकरी कांद्याचे एकरी उत्पादन 8 ते10 टनांपर्यंत मिळवितात.
2) माती परीक्षणानुसारच रासायनिक खतांचा वापर. शेणखत, गांडूळ खताचा जास्तीत जास्त वापर, जमीन सुपीकतेकडे लक्ष.
3) गावात शेतकरी गटांची उभारणी. या गटांच्या माध्यमातून कापूस कांदा, बाजरी, रब्बी ज्वारी पीक उत्पादन वाढ प्रात्यक्षिके.
4) चारा पीक लागवड त्याचबरोबरीने चारा प्रक्रिया या विषयीही शेतकऱ्यांना प्रशिक्षण.
5) जल-मृद संधारणासाठी विविध उपाययोजना.
देशी गोपालनातून आरोग्य, जमीन समृद्धी
शेतकरी हा जगाचा अन्नदाता आहे. देशी गाईंचे शेण आणि गोमूत्राचा फायदा जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी होणार आहे. त्यातून पिकाची गुणवत्ता सुधारणार आहे. सकस दुधामुळे कुटुंबाचे आरोग्यही सुधारणार आहे.
- राधाकृष्णजी महाराज
लेखक : तुळशीदास मुखेकर
माहिती संदर्भ : अॅग्रोवन