आपण पाहतो की, खासगी व सार्वजनिक ठिकाणी महिलांना विविध प्रकारच्या अडचणींना तोंड द्यावे लागते. कधी छळ, मानसिक त्रास तर कधी अगदी लैंगिक छळासारखे प्रकार घडतात. अशा प्रकाराला आळा घालण्यासाठी आता अहमदनगर जिल्ह्यात दिलासा सेल अर्थात डिस्ट्रीक्ट इंटिग्रेटेड लीगल एड ॲन्ड सपोर्टिव एक्टिव्हिटीज फॉर वुमेन या कक्षाची स्थापना करण्यात आलीय. या कक्षाच्या माध्यमातून पीडित महिलांना तातडीची सेवा, समुपदेशन, कायदेशीर सल्ला आणि मदत मिळावी, हाच या कक्षाचा मुख्य उद्देश आहे. जिल्हाधिकारी अभय महाजन आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या प्रयत्नाने जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात (जुनी इमारत) येथे हे केंद्र सुरु झाले आहे. महिला व बालविकास अधिकारी विजयमाला माने या केंद्रासाठीच्या कार्यकारी समितीच्या सचिव असणार आहेत. पालकमंत्री प्रा.राम शिंदे यांच्या हस्ते हे दिलासा केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे.
एकाच ठिकाणी महिलांना सर्व सुविधा मिळावी, हा या कक्ष सुरु करण्यामागील उद्देश आहे. केंद्रपुरस्कृत वन स्टॉप सेंटर ही योजना महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यात सुरु करण्यात येणार असून नागपूरनंतर असे केंद्र सुरु करणारा अहमदनगर हा दुसरा जिल्हा ठरला आहे. दिलासा या वन स्टॉप सेंटरच्या माध्यमातून पीडित महिलेला तातडीची मदत मिळाल्याने तिचा आत्मविश्वास परत मिळवून देण्यात तसेच तिला मानसिक आधार देऊन नवी उभारी देण्यात हे केंद्र महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
महिलांच्या अडचणींचा विचार करुन दिलासा सेलच्या माध्यमातून पीडित महिला व मुले (वय, वर्ग, जात, शिक्षणाचा दर्जा, वैवाहिक स्थिती, वंश आणि संस्कृती यांच्या आधारावर भौतिक, लैंगिक, मानसिक आणि आर्थिक स्वरुपाचा अन्याय केला जातो.) यांना एकाच ठिकाणी सर्व प्रकारची मदत व सुविधा उपलब्ध करण्याचा मुख्य उद्देश आहे. दिलासा सेल मध्ये महिला व मुले यांच्या समस्यांचे समाधान, सर्व प्रकारची मदत उदा. पोलीस, कायदेशीर सल्ला, मानसोपचार तज्ञ, वैद्यकीय सुविधा, संरक्षण अधिकारी, विविध प्रकारचे समुपदेशन तसेच शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून पुनर्वसन करण्यामध्ये मदत करण्याचे उद्दिष्ट आहे.
फायदे - खाजगीरित्या किंवा सार्वजनिक स्थळी संकटात सापडलेल्या महिला व मुलांकरिता पोलीस, वैद्यकीय सेवा, समुपदेशन, विधीतज्ञ व पुनर्वसन या सेवांच्या माध्यमातून तात्काळ सहाय्य / आधार देऊन त्यांच्या समस्या योग्य पद्धतीने सोडविण्यास मदत होईल. कोणत्याही प्रकारच्या हिंसाचारास बळी पडलेल्या महिला व मुलांना अत्याचाराविरुद्ध लढण्यासाठी मानसिक बळ प्राप्त होईल. सामाजिक सलोखा व सुरक्षित समाजासाठी पुरुष व महिला यांना त्यांच्या कौटुंबिक वाद / कलहामध्ये योग्य समुपदेशन झाल्यास महिलांना व मुलांना समाजामध्ये एक सुरक्षित स्थान निर्माण करता येईल.
कार्यपद्धती - दिलासा सेलमध्ये सर्व प्रकारचे सहाय्य एकाच ठिकाणी मिळवून देण्याकरिता पोलीस, विधी अधिकारी, संरक्षण अधिकारी, मानसोपचार तज्ञ, समुपदेशक हे पूर्ण वेळ उपलब्ध असतील. दिलासा सेल हे पीडित महिला व मुले यांच्या तक्रारी स्वीकारण्याकरिता 24x7 सुरु राहतील तसेच महिला हेल्पलाईन क्र. 1091 व 100 या क्रमांकावर तक्रारदारांच्या तक्रारी स्वीकारुन संबंधित तज्ञांकडे तात्काळ पाठविण्यात येतील.
बळी पडलेल्या व्यक्तीच्या मानसिकतेचा विचार करुन तिचे समुपदेशक, कायदेशीर सल्लागार व वैद्यकीय अधिकारी यांच्या मदतीने योग्य ते समुपदेशन करुन तिला आवश्यकता असल्यास तिच्या तात्पुरत्या निवासाची व्यवस्था करणे. दिलासा सेलमध्ये प्राप्त झालेल्या तक्रारी मधील पीडित व्यक्तीस जोपर्यंत न्याय मिळत नाही किंवा तिचे योग्य ते पुनर्वसन होत नाही तोपर्यंत ती तक्रार बंद केली जाणार नाही किंवा कुठल्याही प्रकारचा एकतर्फी निर्णय घेतला जाणार नाही. दिलासा सेलमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्यास दर दोन महिन्याला व नंतर सहा महिन्यात प्रेरणा देणारे प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार आहे. दिलासा सेलमध्ये कायदेविषयक सल्लागार, वैद्यकीय तज्ज्ञ, अशासकीय संस्थेत कार्य करणारे (एनजीओ) व पुनर्वसन करणाऱ्या व्यक्तीचे मिळून एक कार्यकारी मंडळ नियुक्त केले जाईल.
या केंद्रामध्ये पोलीस, महिला व बालविकास, विधी सेवा प्राधिकरण, वैद्यकीय सेवा, जिल्हा परिषद, महिला हेल्पलाईन, दामिनी पथक, समुपदेशन व एनजीओ यांचा समावेश आहे या केंद्राच्या माध्यमातून मानसोपचार तज्ञ, विधीविषयक सेवा, स्वतंत्र केस प्रोफाईल, वैद्यकीय सेवा, महिला हेल्पलाईन, कौटुंबिक हिंसाचारासाठी संरक्षण अधिकारी, पिडीत महिलांना साहाय्य, चाईल्ड हेल्पलाईन व समुपदेशन सेवा संबंधित पिडीतेला मिळणार आहे.
या कक्षाच्या समन्वयासाठी जिल्हास्तरावर एक कार्यकारी समिती स्थापन करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी हे या समितीचे अध्यक्ष तर जिल्हा महिला व बालविकास अधिकारी या सदस्य सचिव राहणार आहेत.
- जिल्हा माहिती कार्यालय, अहमदनगर
माहिती स्रोत: महान्युज
अंतिम सुधारित : 7/25/2020