অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

राज्यातील ग्रामीण उद्योजकांसाठी संधी

राज्यातील ग्रामीण उद्योजकांसाठी संधी

राज्यातील ग्रामीण उद्योजकांना आता देशातील प्रसिद्ध अशा भारतीय आंतरराष्ट्रीय मेळावा २०१८ मध्ये सहभागी होण्याची नामी संधी असून त्यांनी आतापासूनच तयारीला लागायला हरकत नाही. कारण, पुढील वर्षी ३८ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्याचा विषय असणार आहे ‘ग्रामीण भागातील उद्योजक’.

केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या भारतीय उद्योग प्रोत्साहन संस्था अर्थात आयटीपीओच्या वतीने देशाच्या राजधानीतील प्रसिद्ध प्रगती मैदानावर भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्याचे दरवर्षी दिनांक १४ ते २७ नोव्हेंबर या कालावधीत आयोजन करण्यात येते. विदेशातील उद्योग दालने आणि देशातील प्रत्येक राज्याची दालने या मेळाव्याचे खास आकर्षण असते. मेळाव्याच्या माध्यमातून उत्पदकांना थेट ग्राहक व ग्राहकांनाही थेट उत्पादक मिळतो आणि मध्यस्थाशिवाय वस्तूंची देवाणघेवाण होते. दरवर्षी या मेळाव्यासाठी मध्यवर्ती संकल्पना ठरते व त्यानुसारच विदेश आणि देशातील विविध राज्यांची दालने उभारण्यात येतात. यावर्षी ‘स्टँडअप इंडिया’ ही मध्यवर्ती संकल्पना होती. महाराष्ट्राच्यावतीने ‘स्टार्टअप व स्टँडअप महाराष्ट्र’ ही संकल्पना सादर करणारे दालन उभारले होते. या माध्यमातून राज्यातील ६० तरूण उद्योजकांच्या प्रकल्पांचे याठिकाणी सादरीकरण करण्यात आले.

पुढील वर्षी या मेळाव्याची मध्यवर्ती संकल्पना ‘ग्रामीण भागातील उद्योजक’ असणार असल्याची माहिती आयटीपीओचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक सी.एल.गोयल यांनी दिली. यामुळे महाराष्ट्राच्या ग्रामीण उद्योजकांना या मेळाव्यात आपले उत्पादन विक्री व प्रदर्शनासाठी ठेवण्याची उत्तम संधी आहे. यासाठी ग्रामीण उद्योजकांनी तयारीला लागले पाहिजे. नोव्हेंबर महिन्यात या मेळाव्याच्या आयोजनाच्या दोन महीने आधी राज्य शासनाच्या महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाच्यावतीने प्रसार माध्यमांद्वारे जाहिरात दिली जाते व अर्ज मागविले जातात. त्यामुळे आतापासूनच या संदर्भातील माहिती मिळवून ग्रामीण भागातील उद्योजक २०१८ चा भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्याच्या माध्यमातून मिळणाऱ्या संधीचे सोन्यात रुपांतर करण्यासाठी तयारी करू शकतात.

मेळाव्याच्या माध्यमातून या उद्योजकांच्या उत्पादनास थेट आंतरराष्ट्रीय मंच उपलब्ध होणार आहे. याठिकाणी देश–विदेशातील उद्योजकही मोठ्या संख्येने भेट देत असतात त्यांना राज्यातील ग्रामीण उद्योजकाची संकल्पना आवडली तर या उद्योजकांना परदेशात जाण्याचीही संधी मिळू शकते. या उद्योजकांच्या मालाला थेट विदेशातील, दिल्ली व विविध राज्यांतील ग्राहक या मेळाव्याच्या माध्यमातून मिळतात. उद्योजकांच्या वस्तू ग्राहकाच्या पसंतीस पडल्यास त्यांच्या मालाला मोठ्या प्रमाणात बुकींगही मिळते. या सुवर्ण संधीचा लाभ करून घेण्यासाठी ग्रामीण उद्योजकांकडे पुरेसा वेळ आहे तर त्यांनी या दिशेने पाऊल उचलण्याची गरज आहे.

लेखक -रितेश मोतीरामजी भुयार

उपसंपादक,

महाराष्ट्र परिचय केंद्र नवी दिल्ली.

माहिती स्रोत : महान्यूज

अंतिम सुधारित : 4/29/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate