सप्तपदी : स्वच्छ व हरित महाराष्ट्रासाठी
भारत सरकारचा पुढाकार, स्वच्छ महाराष्ट्र करू साकार
देशातील सर्व शहरांमधील नागरिकांना स्वच्छ पर्यावरण व चांगले आरोग्य मिळावे या करिता या शहरांना स्वच्छतेची आणि या शहरामधील सर्व नागरीकांना शौचालयांची सुविधा उपलब्ध करून देवून हे ध्येय गाठण्यासाठी केंद्र शासनाने स्वच्छ भारत अभियान संपूर्ण देशामध्ये राबविण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार, हे अभियान 2 ऑक्टोंबर, 2014 पासून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150 व्या जन्मदिनापर्यंत म्हणजे 2 ऑक्टोंबर 2019 पर्यंत संपूर्ण देशात राबविण्यात येत आहे. स्वच्छ भारत अभियान (नागरी) देशामध्ये एक अभियान म्हणून राबविण्यासाठीच्या मार्गदर्शक सूचना केंद्र शासनाने प्रसिध्द केल्या आहेत.
राज्यात 26 महानगरपालिका व 239 नगरपरिषदा अशा एकूण 265 नागरी स्थानिक स्वराज्य संस्था असून, सन 2011 च्या जनगणनेनुसार राज्याची नागरी लोकसंख्या 5,08,27,531(राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या 45.23 टक्के) एवढी आहे. तर, नागरी भागातील एकूण कुटुंबांची संख्या 1,08,13,928 एवढी आहे. त्यापैकी साधारण 29टक्के कुटुंबांना शौचालयाची सुविधा उपलब्ध नाही. शौचालयाची सुविधा उपलब्ध नसलेल्या कुटुंबांपैकी साधारण 73टक्के कुटुंबे सार्वजनिक शौचालयांचा वापर करीत आहेत. तर, साधारण 27 टक्के कुटुंबे उघडयावर शौचालयास जात आहेत.
केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियान (नागरी) च्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यामधील सर्व शहरांमधील उघडयावर शौचालयास जात असलेल्या कुटुंबांना शौचालयाची व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी व शहरांमधील घनकचऱ्याचे व्यवस्थापन करण्यासाठी केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत भियान (नागरी) च्या धर्तीवर राज्यामध्ये “स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी)” हे एक अभियान म्हणून राबविण्यात येत आहे. या अभियानाचा कालावधी 2 ऑक्टोबर, 2019 पर्यंत राहील
महाराष्ट्र अभियानाच्या अंमलबजावणीसाठी नगर विकास विभागांतर्गत स्वतंत्र स्वच्छ महाराष्ट्र अभियान संचालनालय निर्माण करण्यात आले आहे. या अभियानाची अंमलबजावणी शहरस्तरावर नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत करण्यात येत आहे.
१. केंद्र शासन
२. महाराष्ट्र शासन
३. अभियान संचलनालय
स्त्रोत : स्वच्छ महाराष्ट्र अभियान, नगर विकास विभाग, महाराष्ट्र शासन
अंतिम सुधारित : 10/7/2020