<div id="MiddleColumn_internal"> <p style="text-align: justify; ">आच्छादनावर आधारीत भात शेती म्हणजे मल्चिंगपेपर वापरुन केलेली भात शेती सामान्यता मल्चिंगचा वापर करुन भाजीपाला व इतर पिके घेतली जातात. परिक्षणासाठी भात पीक मल्चिंगपेपरवर घेण्यासाठी शेतकरी श्री. अनिल नारायण पाटील, मु. सांगे, ता. वाडा, जि.पालघर यांनी 5 वर्षापुर्वी म्हणजेच सन 2012-13 पासून प्रयोग केला आणि आज भातशेती फायद्यात असल्याबाबत ते आत्मविश्वासाने सांगतात.</p> <p style="text-align: justify; ">मल्चिंगपेपर भातशेती करत असताना त्यांना ठळक फायदे दिसले. जसे राब, चिखलणी करण्याचा त्रास वाचला एवढेच नाही तर जमिनीची, अन्नद्रव्याची धूप टळली. तण नियंत्रणासाठी मजुरी अथवा तणनाशक वापरावे लागत नाही. रोपांची मुळे न तुटल्याने जोमदार वाढ होते. जास्त अंतर ठेवून एका जागी 3-4 बिया टोकल्याने रोपांना भरपूर सूर्यप्रकाश मिळून फुटवे जास्त येतात. अंगच्या ओलीवर किंवा संरक्षित पाणी देऊन रब्बी पीक घेतल्यास दुबार उत्पन्न तर मिळतेच पण प्लास्टिकला ऊन कमी लागून त्याचेही आयुष्य वाढुन बिनामशागतीत दुसऱ्या वर्षीही दोन पिके घेता येतात.</p> <p style="text-align: justify; ">मल्चिंगवरील भात शेती वर्ष 5 वे. चिखलणी न करता भातशेती कशी करता येईल ह्या विचारातून सुरु झालेल्या प्रयोगाचे हे पाचवे वर्ष होते. भातशेती म्हणजे चिखलणी ही परंपरा का निर्माण झाली असावी ? ह्यावर विचार केला असता, तण नियंत्रण ह्या कारणाशी पोहचले. नुकतेच अंकुरित भात साठलेल्या पाण्यात कुजते म्हणून रोप करावे लागते. त्यात गवत उगवू नये, रोप सशक्त व्हावे व सहज उपटले जावे ह्यासाठी राब भाजण्याचा खटाटोप, पण रोप वाढू लागेपर्यंत पाणी पातळी व पुढे तण नियंत्रण केले तर ह्या दोन्हीची गरज पडू नये असे वाटले. तसा घाटावर पेरभात होतोच की ! कलिंगड, भाजीपाला पिके गादीवाफा, प्लास्टिक मल्चिंगवर घ्यायचा अनुभव होता. त्यामुळे भाताचा प्रयोग करणे सोपे झाले.</p> <p style="text-align: justify; ">पहिल्याच वर्षी त्यांना चांगला अनुभव आल्याने गेल्या 4 वर्षात हे तंत्र त्यांनी विकसित केले आणि हेच तंत्रज्ञान प्रसारित करणेसाठी आजुबाजूच्या गावातील शेतकऱ्यांची कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत शेतीशाळा घेण्याबाबत विभागीय कृषि सहसंचालक कोकण विभाग ठाणे व प्रकल्प संचालक आत्मा ठाणे याच्यामार्फत सुरु केल्या.</p> <p style="text-align: justify; ">श्री. अनिल नारायण पाटील यांचेशी चर्चा करुन कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत शेतीशाळेचे सहा वर्ग निश्चित केले व परिसरातील शेतकऱ्यांची निवड केली. यामध्ये भातशेतीपद्धत माहिती व शेतकरी निवड, जमिन तयार करणे, सरीपाडणे व बियाणे टोकण करणे, खतव्यवस्थापन व आंतर मशागत, किड व रोगनियंत्रण, पिक फुलोरा अवस्था, काढणी पश्चात तंत्रज्ञान, साठवणुक, उत्पादन आकडे व हरभरालागवड ( दुसरेपिक) हरभराकाढणी व दोन्हीपिकांचे अर्थशास्त्र याविषयावर मार्गदर्शन केले.</p> <p style="text-align: justify; ">मल्चिंगपेपर भातशेती करताना हा शेती प्रकार काटोकोर शेती पद्धतीप्रमाणे आहे. म्हणून नियोजन उत्तम पाहिजे. मोकाट जनावरे शेतात येता कामा नये. पाण्याचा प्रवाह थेट गादीवाफा मल्चिंगवर येता कामा नये या दक्षता घ्यावा लागतात. मल्चिंगपेपर अंथरुन 1x1 फुटावर विशेष अवजार तापवून भोके पाडणे. पाऊस पडून जमिन ओली होताच प्रत्येक होलमध्ये 3-4 बिया टाकूणे काडीने हलवावे. त्या जागी गरजेनुसार चाळलेले शेणखत, गांडूळखत टाकावे. रोप 20 दिवसाचे झाल्यावर 4 रोपांच्या मध्ये भोक पाडून युरिया- डीएपी ब्रिकेट खोचावी. भात निघताच ह्या जागी रब्बी हंगामासाठी बी टोकण / लागवड करायची आहे. 16 ते 20 दिवसाचे रोप झाल्यावर युरीया ब्रिकेट दोन रोपाच्या मध्ये मल्चिंगमध्ये Punch करणे सदर ठिकाणीच्या भात कापल्यावर हरभरा चे दोन दाणे लावायचे आहेत.</p> <p style="text-align: justify; ">अशाप्रकारे अनिल नारायण पाटील यांनी 0.40 हेक्टरवर भातशेती व हरभरा लागवड केली. त्यांना भातशेतीसाठी त्यांना 27 हजार 52 रुपये इतका खर्च आला व त्याच मल्चिंगपेपरवर हरभरा शेतीसाठी 11 हजार 200 रुपये इतका खर्च आला. त्यांना भात उत्पन्न 3200 किलो ग्रॅम मिळाले. त्यांचा 16 रुपये प्रतिकिलो ग्रॅम 51 हजार 200 रुपये झाले. तसेच पेंढा 3500 किलोग्रॅम पासून 7 हजार झाले. हरभरा उत्पादन 896 किलोग्रॅम झाले. त्याचा 50 रुपये प्रतिकिलोग्रॅमप्रमाणे 44 हजार 800 रुपये झाले. त्यांना एकूण रक्कम 1 लाख 3 हजार रुपये मिळाले. त्यांचा एकूण खर्च भात व हरभरासाठी 38 हजार 252 रुपये झाला. त्यांना निव्वळ नफा 64 हजार 748 रुपये झाला.</p> <p style="text-align: justify; ">सदर मल्चिंगपेपर 2 वर्ष वापर करावयाचा असल्याने पुढीलवर्षी सदर खर्च कमी असणे अपेक्षित आहे. अनिल पाटील यांची शेती पाहून सापने बु., डाकिवली, नाणे, हमरापूर, गुहीर, निचोळे या गावातील शेतकऱ्यांनी या शेतीचा प्रयोग सुरु केले.</p> <p style="text-align: justify; ">लेखक - दत्तातय कोकरे,</p> <p style="text-align: justify; ">प्र. जिल्हा माहिती अधिकारी,पालघर</p> <p style="text-align: justify; ">माहिती स्रोत : <a class="external_link ext-link-icon" href="https://www.mahanews.gov.in/Home/HomeDetails.aspx?str=sPsgQEVyxE0=" target="_blank" title="मल्चिंगपेपरवर भात, हरभरा शेती">महान्यूज</a></p> </div>