<div id="MiddleColumn_internal"> <h3 style="text-align: justify; ">प्रस्तावना</h3> <p style="text-align: justify; ">गाजराचा उपयोग आहारात भाजी म्हणून किंवा कच्ची खाण्यासाठी केला जातो. जनावरांचे खाद्य म्हणूनही केला जातो. गाजरामध्ये अ जिवनसत्व भरपूर प्रमाणात असल्यामुळे त्याचा आहारात नियमित उपयोग केल्यास डोळयांचे आरोग्य उत्तम राहून दृष्टीदोष होत नाही.</p> <p style="text-align: justify; ">गाजराचा उपयोग सूप, सॅलड, लोणची, हलका, जॅम इत्यादी पदार्थ तयार करण्यासाठी करतात. गाजराच्या चकत्या करुन सुकवून त्या साठविल्या जातात.</p> <h3 style="text-align: justify; ">हवामान आणि जमीन</h3> <p style="text-align: justify; ">गाजर हे थंड हवामानात वाढणारे पिक आहे. गाजराला आकर्षक रंग येण्यासाठी तापमान 15-20 अंश से. असावे लागते. 10 ते 15 अंश से. तापमानाला तसेच 20 ते 25 अंश से.तापमानाला गाजराचा रंग फिक्कट असतो. ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी व नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवडयात गाजराची लागवड केल्यास जास्त उत्पादन मिळून गाजराचा आकार आणि रंग चांगला राहतो. परंतु गाजराची लागवड सप्टेबर ते डिसेंबर महिन्यापर्यंत करता येते. उत्तम वाढीसाठी 18 ते 24 अंश से. तापमान अतिशय पोषक आहे.</p> <p style="text-align: justify; ">गाजर हे जमिनीत वाढणारे मूळ आहे. म्हण्ूान गाजराची वाढ व्यवस्थित होण्यासाठी लागवडीसाठी निवडलेली जमिन मऊ भुसभुशीत असावी भारी जमिनीची मशागत व्यवस्थित करुन जमिन भुसभुशीत करावी. गाजराच्या लागवडीसाठी खोल भुसभुशीत गाळाची आणि पाण्याचा उत्तम निचरा होणारी, सामु 6 ते 7 असणारी जमिन निवडावी.</p> <h3 style="text-align: justify; ">सुधारीत जाती</h3> <p style="text-align: justify; "><i>पुसा केसर, नानटीस, पुसा मेधाली</i> या गाजराच्या सुधारित जाती आहेत.</p> <h3 style="text-align: justify; ">हंगाम</h3> <p style="text-align: justify; ">महाराष्ट्रात गाजराची लागवड खरीप आणि रब्बी हंगामात केली जाते. रब्बी हंगामातील गाजरे जास्त गोड आणि उत्तम दर्जाची असतात. रब्बी हंगामातील लागवड ऑगस्ट ते डिसेबर तर खरीप हंगामातील लागवड जून ते जूलै महिन्यात करतात.</p> <h3 style="text-align: justify; ">लागवड पध्दती</h3> <p style="text-align: justify; ">गाजराच्या लागवडीसाठी जमिन खोल उभी – आडवी नांगरुन घ्यावी. जमिन सपाट करुन घ्यावी. बी सरीवरंब्यावर पेरावी. दोन वरंब्यातील अंतर 45 सेमी ठेवावी बियाची टोकून पेरणी करतांना 30 ते 45 सेमी अंतरावर सरी ओढून दोन्ही बाजूंनी 15 सेमी अंतरावर टोकन पध्दतीने लागवड करावी. पाभरीने बी पेरतांना दोन ओळीत 30 ते 45 सेमी अंतर ठैवावी आणि नंतर विरळणी करुन दोन रोपातील अंतर 8 सेमी ठेवावे. एक हेक्टर क्षेत्रासाठी गाजराचे सुमारे 4 ते 6 किलो बियाणे लागते. पेरणीपूर्वी बियाणे उगवून येण्यास पेरणीनंतर 12 ते 15 दिवस लागतात. पेरणीपूर्वी बियाणे 24 तास पाण्यात भिजत ठेवल्यास हा काळ कमी करता येतो.</p> <h3 style="text-align: justify; ">खते आणि पाणी व्यवस्थापन</h3> <p style="text-align: justify; ">गाजराच्या पिकाला दर हेक्टरी 80 किलो नत्र 60 किलो स्फूरद आणि 60 किलो पालाश द्यावे. नत्राची अर्धी मात्रा आणि स्फूरद व पालाशची संपूर्ण मात्रा पेरणीपूर्वी द्यावी. नत्राची उर्वरित अर्धी मात्रा लोगवडीनंतर 20 दिवसांनी द्यावी. जमिनीच्या मगदुरानुसार 20 ते 30 गाडया शेणखत जमिनीच्या पूर्वमशागतीच्या वेळी मिसळून द्यावे.</p> <p style="text-align: justify; ">बियांची उगवण चांगली होण्यासाठी जमिन तयार झाल्यावर वाफे आधी ओलावून घ्यावेत आणि वाफसा आल्यावर बी पेरावे. पेरणी केल्यानंतर लगेच हलके पाणी द्यावे. उगवण झाल्यावर नियमित पाणी देऊन पिकाच्या 50 दिवसाच्या कालावधीत जमिनीत चांगला आंलावा टिकून राहील याची काळजी घ्यावी. हिवाळयात 7 ते 8 दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. गाजर काढणीपूर्वी 15 ते 20 दिवस पाणी देणे बंद करावे म्हणजे गाजरात गोडी निर्माण होते. पाण्याचे प्रमाण जास्त झााले तर गाजरात तंतुमय मुळांची वाढ जास्त होते.</p> <h3 style="text-align: justify; ">कीड रोग आणि त्यांचे नियंत्रण</h3> <p style="text-align: justify; ">गाजराच्या पिकावर साडया भुंगा (कॅरट विव्हिल) सहा ठिपके असलेले तुडतुडे आणि रूटफलाय या किडीचा उपद्रव होतो. सोंडया भुंगा आणि तुडतुडे या किडींच्या नियंत्रणासाठी 10 लिटर पाण्यात 10 मिली मेलॅथिऑन मिसळून फवारावे. गाजरावर रूटफलाय या किडीची प्रौढ माशी गर्द हिरव्या ते काळसर रंगाची असते. या किडिच्या अळया पिवळसर पांढ-या रंगाच्या असून त्या गाजराची मुळे पोखरुन आत शिरतात आणि आतील भाग खात त्यामुळे गाजराची मुळे वेडीवाकडी होतात आणि कुजतात. गाजराची पाने सुकतात. या किडीच्या नियंत्रणासाठी 10 लिटर पाण्यात 3 मिली डायमेथॉएट मिसळून फवारावे.</p> <p style="text-align: justify; ">गाजराच्या पिकावर करपा, भुरी, मर पानांवरील ठिपके इत्यादी रोंगाची लागण होते.</p> <h3 style="text-align: justify; ">काढणी उत्पादन आणि विक्री</h3> <p style="text-align: justify; ">गाजराची काढणी बियाणाच्या पेरणीनंतर 70 ते 90 दिवसात करतात. गाजरे चांगली तयार व्हावीत म्हणून काढणीपूर्वी पिकाला 15 ते 20 दिवस पाणी देण्याचे बंद करावे. कुदळीने खोदून हाताने उपटून किंवा नागराच्या ससाहारूयाने गाजराची काढणी करावी. गाजरावरील पाने कापून गाजरे पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावीत. लहान मोठी गाजरे आकारानुसार वेगळी करावीत. गाजराचे उत्पादन हेक्टरी 8 ते 10 टन इतके मिळते.</p> <p style="text-align: justify; "><strong><i>स्त्रोत : </i></strong> <a class="ext-link-icon" href="http://www.mahaagri.gov.in/level3detaildispm.aspx?id=11&subid=2&sub2id=3" target="_blank" title="गाजर या पिकाच्या अधिक माहितीसाठी(External website that opens in new window)">कृषी विभाग, महाराष्ट्र शासन</a></p> <div></div> </div>