<div id="MiddleColumn_internal"><ol style="text-align: justify; "> <li> <p align="left"><span>१८५३ च्या कराराद्वारे हैदराबादच्या निजामाने अमरावती जिल्ह्यासहित सर्व बेरार </span><span>(</span><span>वऱ्हाड</span><span>)</span><span>ईस्ट इंडिया कंपनीकडे काही काळाकरिता सुपूर्द केला</span><span>.</span></p> </li> <p style="text-align: justify; "><b><span>कंपनीने वऱ्हाड प्रांताचे दोन जिल्ह्यांमध्ये विभाजन केले </span><span>-</span></b></p> <ol style="text-align: justify; "> <li> <p align="left"><span>दक्षिण वऱ्हाड </span><span>- </span><span>त्याचे मुख्यालय हिंगोली येथे होते</span><span>.</span></p> </li> <li> <p align="left"><span>पूर्व वऱ्हाड </span><span>- </span><span>उत्तर वऱ्हाडचे रूपांतर पूर्व वऱ्हाडात करण्यात आले</span><span>. </span><span>त्याचे मुख्यालय अकोला येथे होते</span><span>.</span></p> </li> </ol> <li> <p align="left"><span>१८६४ मध्ये अमरावतीमधून यवतमाळ जिल्हा वेगळा करण्यात आला</span><span>.</span></p> </li> <li> <p align="left"><span>१९०३ मध्ये निजामाने वऱ्हाड ब्रिटिश भारत सरकारकडे कायमस्वरूपी सुपूर्द केला</span><span>.</span></p> </li> <li> <p align="left"><span>१९०३ मध्ये वऱ्हाड हा मध्यप्रांताला जोडण्यात आला</span><span>, </span><span>आणि मध्यप्रांत व बेरार असा मोठा प्रांत निर्माण करण्यात आला</span><span>. </span><span>तत्कालीन व्हाईसराय लॉर्ड कर्झन याने वऱ्हाड मुंबई प्रांतास जोडण्यास नकार दिला</span><span>. </span><span>मराठी भाषिकांमध्ये प्रांतिक फूट पाडणे हा त्याचा हेतू होता</span><span>.</span></p> </li> <li> <p align="left"><span>१९५६ मधील राज्य पुनर्रचनेदरम्यान अमरावती जिल्ह्यासहित विदर्भातील सर्व जिल्हे तत्कालीन द्वैभाषिक मुंबई राज्यास जोडण्यात आले</span><span>.</span></p> </li> <li> <p align="left"><span>१९६० मध्ये महाराष्ट्र व गुजरात वेगळे झाल्यावर अमरावती जिल्हा महाराष्ट्रातील एक जिल्हा बनला</span><span>. </span><span>अमरावती जिल्हा हा पूर्णपणे दख्खनच्या पठारावर आहे</span><span>.</span></p> </li> </ol> <p style="text-align: justify; "><span>प्राचीन इतिहासात अमरावती शहराचा उल्लेख महाभारतात आढळतो</span><span>. </span><span>महाभारत काळात श्रीकृष्णाने कौंडिण्यपूर या ठिकाणाहून रुक्मिणीचे हरण केले होते</span><span>. </span><span>श्रीकृष्णाने हरण करताना अमरावतीच्या एकवीरा देवीच्या तळाखालून ते कौडिण्यपूरपर्यंत भुयार खणले होते असे सांगतात</span><span>.</span></p> <p style="text-align: justify; "><span>अमरावती जिल्हा हा महाराष्ट्रातील उत्तरेकडील जिल्हा म्हणून ओळखला जातो</span><span>. </span><span>महाराष्ट्र राज्याच्या एकूण क्षेत्रफळापैकी ३</span><span>.</span><span>९८ टक्के क्षेत्र या जिल्हाने व्यापलेले आहे</span><span>. </span><span>अमरावती जिल्ह्यात कापसाची मोठी बाजारपेठ आहे</span><span>. </span><span>विदर्भातील महत्वाचा</span><span>, </span><span>शैक्षणिकदृष्ट्या प्रगतिशील जिल्हा म्हणून ओळखल्या जातो</span><span>. </span><span>सामाजिक क्षेत्रामध्ये या जिल्ह्याचे नाव खूपच अग्रेसर आहे</span><span>. </span><span>संत गाडगेबाबा</span><span>, </span><span>राष्ट्रसंत तुकडोजी महाराज</span><span>, </span><span>संत गुलाबराव महाराज</span><span>, </span><span>डॉ</span><span>. </span><span>शिवाजीराव पटवर्धन</span><span>, </span><span>डॉ</span><span>. </span><span>पंजाबराव देशमुख इत्यादी महत्त्वाच्या व्यक्ती या जिल्ह्यात होऊन गेल्या आहेत</span><span>.</span></p> <p style="text-align: justify; "><span>राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी १९३५ साली मोझरी येथे गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली</span><span>. </span><span>अमरावती जिल्ह्यातील सातपुड्याच्या कुशीत वसलेले चांदूरबाजार तहसिलातील माधान हे गाव श्री गुलाबराव महाराजांची कर्मभूमी आहे</span><span>. </span><span>१९४६ साली डॉ</span><span>. </span><span>शिवाजीराव पटवर्धन यांनी कुष्ठरोग्यांच्या सेवेसाठी अमरावतीजवळ तपोवन येथे जगदंबा कुष्ठधामाची स्थापना केली</span><span>. </span><span>अमरावती येथील अंबादेवीचे मंदिर अस्पृश्यांसाठी खुले व्हावे म्हणून डॉ</span><span>. </span><span>पंजाबराव देशमुख यांनी मंदिरप्रवेश चळवळ सुरू केली</span><span>. </span><span>१९३२ साली त्यांनी अमरावती येथे श्रद्धानंद छात्रालय व शिवाजी शिक्षण समितीची स्थापना केली</span><span>. </span><span>शिवाजी शिक्षण समिती आज विदर्भातील अग्रणी शिक्षण संस्था आहे</span><span>. </span><span>१८९७चे राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन अमरावती येथे भरले होते</span><span>. </span><span>या अधिवेशनाचे अध्यक्ष सी</span><span>. </span><span>शंकरन नायर हे होते</span><span>.</span></p> <p style="text-align: justify; "> </p> <p style="text-align: justify; ">माहिती संकलक : अतुल पगार</p> <p style="text-align: justify; "><b>स्त्रोत : <span class="external-link ext-link-icon">http://amravati.nic.in/main.html</span></b></p> </div>