<div id="MiddleColumn_internal"> <p style="text-align: justify; ">वेशीवरच्या पाऊलखुणा : गूढ अन् अज्ञात अंबेगण</p> <p style="text-align: justify; ">सूक्ष्म-अतिसूक्ष्म चैतन्यकण अंगाखांद्यांवर खेळविणा-या एखाद्या गावचे वैभव नेमके कसे होते हे अज्ञात राहणे म्हणजे एखाद्या सुखाला पारखे होण्यासारखेच आहे. असेच सुख अन् नदीच्या उगमस्थानावर वसलेल्या संस्कृतीचे पवित्रक घेऊन बहरलेले गाव भूमिज शैलीने मढलेले दिसते. दिंडोरीतील आंबेगणचे महादेव मंदिर ही ओळख ठसविणारे अंबेगण आपले अनोखे वेगळेपण गावाच्या कानाकोपऱ्यात दडवून आहे. हे अवशेष अंबेगणच्या समृद्धी अन् अनोखेपणाची निश्चितच साक्ष देतात.</p> <p style="text-align: justify; ">नाशिक-पेठ रस्त्यावर ३५ किलोमीटरवर डाव्या हाताला एक-दीड किलोमीटर आत शंभर उंबऱ्यांचे अंबेगण हे गाव वसले आहे. अंबेगण म्हटले की, अंब्याच्या झाडांचा समूह असे सहज लक्षात येते. परिसरात अंब्याच्या असंख्य झाडांमुळे गावाला अंबेगण असे नाव पडले, असे ग्रामस्थ सांगतात. सध्या मात्र अंब्याची झाडे तुरळकच दिसतात. गावात शिरताना दोन्ही बाजूंना आदिवासींची कौलारू घरे अन् त्यांचे जगण्यातल्या अनेक लहान लहान गोष्टी डोळ्यांच्या पापण्या रोखून धरतात. एखाद्या आध्यात्मिक प्रवासाला निघावे, असा भास या गावात शिरताना होतो. शांत अन् गूढ अंबेगण आपल्याला कोणत्या प्रवासावर घेऊन जाणार आहे, या विचाराने मन अस्वस्थ व्हायला लागतं. कारण गावातील घराघरासमोर विखुरलेले दगडांचे मोडकेतोडके अवशेष या गावचे अज्ञात पैलू उलगडणार असल्याचे संकेत देतात. या संकेतांमागेही एक कारण आहे. गावाला अंबे हे नाव लागण्यामागे गावात खरेच खूप अंब्याची झाडे असणे हे कारण असू शकते; मात्र गावाच्या नावाला गण हे उपपद लागल्याने हा प्रवास अध्यात्माकडे सुरू होतो. गण म्हणजे जीवात्मा. संस्कृत कोशानुसार 'गण' म्हणजे पवित्रक. पवित्रक म्हणजे सूक्ष्म-अतिसूक्ष्म चैतन्यकण.</p> <p style="text-align: justify; ">गण म्हणजे सृष्टी किंवा शक्तिरूपिणी जगदंबा. गण म्हणजे आर्यांचा समूह. या समूहाचा अधिपती म्हणजे गणाधिपती गणपती अथवा या समूहाचा वंदनीय ईश (देव) म्हणजे गणेश, असा असा उल्लेख शिवपुराणातील शैव-वैदक वितंडवाद मिमांसात करण्यात आला आहे. गण म्हणजे शूर योद्धा, सैनिक असाही अर्थ होतो. गण म्हणजे विशिष्ट ध्येयाने प्रेरित झालेली, विशिष्ट कार्याच्या सिद्धीसाठी दीक्षा घेतलेली, मुद्रांकित व्यक्ति होय. गणचे इतके अर्थ पाहिल्यावर अंबेगणची गूढता अधिकच वाढते. ही गूढता असण्याचे आणखी एक कारण म्हणजे अंबेगण हे दमणगंगा नदीचे उगमस्थान आहे. त्यामुळे हे गाव नक्की पूर्वीपासून प्राचीन संस्कृतीच्या सान्निध्यात बहरले असेल. अंबेगण येथून उगम पावणारी पश्चिमवाहिनी दमणगंगा (दावण असेही म्हणतात.) वायव्येकडे दमण या एकेकाळी बंदरासाठी प्रसिद्ध असलेल्या गावातून वाहत जाऊन समुद्राला मिळते. व्यापारी पेठेशी हे नातेही अंबेगणमध्ये प्राचीन वसाहत निर्माण होण्यास दमणगंगा प्रामुख्याने कारणीभूत राहिली असावी.</p> <p style="text-align: justify; ">गावात प्रवेश केल्यानंतर दमणगंगेच्या दिशेने निघाल्यावर डाव्या हाताला शांतपणे पहुडलेले एक दगडी मंदिर पहायला मिळते. ग्रामस्थ या मंदिराला महादेव मंदिर म्हणतात. अंबेगणचे हे महादेव मंदिर भूमिज शैलीतील असून, ते चालुक्य अथवा यादवांच्या काळात बांधले गेले असावे, असे वाटते. अंजनेरीतील मंदिरांचा समूह, सिन्नरमधील गोंदेश्वर या मंदिरांच्या शैलीशी साम्य दाखविणारे हे महादेव मंदिर एकाच काळात उभारले गेले असतील हेही लगेच लक्षात येते. हे मंदिर पूर्वाभिमुख आहे. प्रवेशद्वार नक्षीकामाने सजले आहे. मंडपाचे छत कोसळले आहे. मात्र, हे छत संवरण प्रकारचे असावे. मंदिराच्या बाहेरील आणि आतील भिंतीवर सुंदर नक्षीकाम दिसते. तर सूरसुंदऱ्यांनी हे मंदिर गजबजले आहे. विशेष म्हणजे सूरसुंदऱ्यांच्या हातातील नक्षीदार शिळेवर विविध प्रणयांची शिल्पे कोरलेली आहेत. मुखमंडप, द्वारललाटबिंब, गूढमंडप, अंतराळ, गाभारा व तेथील शिवपिंड अनोखे आहे. नक्षीदार द्वारशाखांनी गाभाऱ्याचे दार सजलेले आहे.</p> <p style="text-align: justify; ">उत्तररांग, मंडारक यावरील नक्षीकाम अनोखे आहे. गाभाऱ्यातील भिंतीवर नक्षीकाम दिसत नाही. मंदिरातील मंडपाच्या आतील भागात समुद्रमंथन, विविध वाद्य वाजविणारे वादक, प्रणय शिल्प, बैल अन् हत्ती यांचे एकच शिल्प अन् शिव पूजेत दंग असलेले भक्त अशा भिंतीपट्ट्या पाहत रहावेसे वाटते. खांबांवरील नक्षीकाम व त्यावरील सूरसुंदऱ्यांचे प्रकार या मंदिराला अनोखे करतात. पुरातत्त्व खात्याने या मंदिराला कंपाऊड करून तेथून चोरी जाणाऱ्या मूर्तींवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र येथील अनेक मूर्ती जागेवर नाहीत. मंदिराची दुरूस्ती तेवढी करण्यात आली आहे. अंबेगणचे हे वैभव ग्रामस्थांसाठी श्रद्धेचे केंद्रस्थान आहे. महादेवाची यात्रा, रोकडोबा महाराजांची, हनुमान यात्रा, विविध सप्ताह अन् आदिवासी सण याच मंदिराच्या अवतीभवती साजरे केले जातात. या मंदिराभोवती फिरणारी अंबेगणची गोष्ट आता खऱ्या अर्थाने आपल्या पैलूतून ऐतिहासिक प्रवासाच्या खाणाखुणा दाखविते. नाशिक गॅझेटियरमध्ये गावात दगडी मंदिर असल्याचा उल्लेख १८२३ च्या दरम्यानचा आहे. मात्र अंबेगणमधील दगड वाड्याचा उल्लेख गॅझेटियरमध्ये नाही. त्यामुळे अनेकांना अंबेगणमध्ये दगडी वाडा आहे याची कल्पना अनेकांना नाही. हा वाडा ग्रामस्थांमध्ये नेहमी चर्चेला जातो तो अवैध उत्खननामुळे. येथे खजिन्याच्या शोधात अनेकदा खोदकाम होत असल्याचे ग्रामस्थ सांगतात.</p> <p style="text-align: justify; ">महादेव मंदिराचे सौंदर्य वैभव पाहून बाहेर पडले की, दक्षिणेला गावात शिरताना अनेक दगडी शिल्पे अन् नक्षीकाम केलेल्या खांबांचे अवशेष घरांसमोर पहायला मिळतात. यावरून येथे अनेक मंदिरे असल्याची शक्यता निर्माण होते. अंजनेरीप्रमाणे अंबेगण हेही एक बाजारपेठेचे ठिकाण असावे, असा अंदाज विखुरलेल्या दगडांवरून यायला लागतो. साधारण एक-दीड किलोमीटर दक्षिणेला चालत गेल्यावर एखाद्या भग्न मंदिराच्या दगडी पाठावर ठेवलेल्या अनेक मूर्तीजवळ आपण पोहचतो. उजव्या हाताला आदिवासीपाड्यांचा लाकडी बुरूज भगवा झेंडा खांद्यांवर घेऊन हे वैभव जपायला हवे असे सांगतोय, असे वाटल्यावाचून राहत नाही. अनेक मूर्ती अन् मंदिरांचे भग्न अवशेष मात्र अस्वस्थ करतात. तेथून पुन्हा पश्मिमेकडे ३०० मीटरवर एक-दीड एकरात भव्य वाडा असल्याच्या खाणाखुणा आजही स्पष्ट दिसतात. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार हा वाडा जव्हार अथवा पेठ संस्थानचा असावा. मात्र त्याची नेमकी माहिती मिळत नाही. नाशिक जिल्ह्यातील अज्ञात वाड्यांच्या यादीत हा वाडा आणखी भर घालतो.</p> <p style="text-align: justify; ">या वाड्याच्या परिसरातील शेतकऱ्यांना नांगरताना लहान मोठी शिल्पे, नाणी मिळत असल्याचे देवीदास गायकवाड व कचरू पागे सांगतात. वाड्याचे प्रवेशद्वार पूर्व दिशेला असल्याचे दिसते. पूर्वेला दमणगंगा शांत पहुडलेली दिसते अन् दमणगंगेसमोर लहानशा टेकाडावर हा वाडा. दमणगंगेतही अनेक मूर्ती व लहान लहान मंदिराचा खच पडला असल्याचे ग्रामस्थ सांगतात. उन्हाळ्यात याचे दर्शन होते आता हे वैभव पाण्यात सामावलेले दिसते. अंबेगणचा हा अज्ञातात सामावलेला प्रवास हे वैभव अनुभवताना आपण थक्क होतो. हा इतिहास आजपर्यंत का उलगडा गेला नाही, याचेही आश्चर्य वाटते. गावातून बाहेर पडताना घराघरांबाहेर दिसणारे दगडी अवशेष हे गाव वेगळेच काहीतरी असल्याच्या शक्यतेला दुजोरा देतात. गाव सोडताना वीरगळ अन् चिरे आम्ही अजूनही हे जपण्याचा प्रयत्न करतो आहोत, तुम्हीही आमच्या या वैभवाला जपण्यासाठी काहीतरी करा, असे सांगताहेत असे वाटायला लागते. हा अज्ञात इतिहास सुन्न करणारा प्रवास घडवितो अन् अंबेगणचा गोडवा मनात दरवळत राहतो.</p> <div id="_mcePaste">लेखक : रमेश पडवळ</div> <div id="_mcePaste"></div> </div>