<div id="MiddleColumn_internal"> <h3 style="text-align: justify; ">नळदुर्ग</h3> <p style="text-align: justify; ">उस्मानाबाद जिल्ह्याच्या तुळजापूर तालुक्यातील ऐतिहासिक ठिकाण. लोकसंख्या ७,३६७ (१९७१). क्षेत्रफळ ३४·७० चौ. किमी., स. स. पासून उंची ६७०·५६ मी. असून येथील हवामान आरोग्यवर्धक आहे.</p> <p style="text-align: justify; ">हे तुळजापूरच्या आग्नेयीस सु. ३२ किमी. <span>मुंबई-हैदराबाद या राष्ट्रीय महामार्गावर वसले आहे. येथील बोरी नदीकाठावरील चौदाव्या शतकातील नळदुर्ग हा किल्ला प्रसिद्ध असून या किल्ल्यावरूनच या ठिकाणास नळदुर्ग नाव पडले असे म्हणतात.</span></p> <p style="text-align: justify; "><span> १८५३ पर्यंत नळदुर्ग जिल्ह्याचे आणि १९०५ पर्यंत तालुक्याचे हे मुख्य ठिकाण होते. नळदुर्ग दख्खन पठारावरील तटबंदी केलेल्या सुंदर ठिकाणांपैकी एक आहे. यावर चालुक्य, बहमनी व आदिलशाही इत्यादींची सत्तांतरे झाली.</span></p> <p style="text-align: justify; "><span> दुसऱ्या इब्राहिम आदिलशाहाने बोरी नदीवर धरण बांधून पाणीपुरवठ्याची कायमची सोय केली. स्वतःच्या सुखसोयींसाठी त्याने किल्ल्यात बांधलेला पाणी-महाल हे येथील मुख्य आकर्षण आहे. येथे १९४६ पासून नगरपालिका आहे. कर्नल मेडोज टेलरच्या कारकीर्दीत (१८५३-५७) याची फार भरभराट झाली. त्याने येथील बाजारपेठ सुधारून व्यापारास चालना दिली आणि या किल्ल्याचा मनोवेधक वृत्तांतही लिहिला. </span></p> <p style="text-align: justify; "><span>नळदुर्गच्या आसमंतात ज्वारी, गहू, कापूस इ. पिके होतात. येथे दवाखाना, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा व शिक्षक प्रशिक्षण महाविद्यालय आहे. राम, महादेव व हनुमान यांची मंदिरे येथे आहेत. वनवासकाळात रामाचा येथे काही दिवस मुक्काम होता, असे म्हटले जाते. येथे रामनवमीचा उत्सव होतो व पौष पौर्णिमेस खंडोबाची यात्रा भरते.</span></p> <p style="text-align: justify; "><span><br /></span></p> <p style="text-align: justify; "><span><span>लेखक - य. रा. </span>कांबळे<br /></span></p> <p style="text-align: justify; ">स्त्रोत: <a class="external-link ext-link-icon" href="https://marathivishwakosh.maharashtra.gov.in/khandas/khand8/index.php/component/content/article?id=9369" target="_blank" title="नवीन विंडो मध्ये ओपन होणारी बाह्य साईट ">मराठी विश्वकोश</a></p> </div>