<div id="MiddleColumn_internal"> <p style="text-align: justify; ">परिसंस्थांमध्ये आकस्मिक बदल घडवून आणणाऱ्या विशाल सागरी लाटा. जपानी भाषेत या लाटांना त्सुनामी म्हणतात. हाच शब्द आता सर्वत्र वापरला जातो. महासागर अथवा मोठ्या जलाशयाच्या तळभागावर भ्रंश किंवा भेगा पडल्यास त्या खळग्यात किंवा खड्ड्यात पाणी घुसते आणि त्या पाण्याचे स्थानांतरण होऊन प्रचंड लाटांची निर्मिती होते.</p> <p style="text-align: justify; ">भूकंप, ज्वालामुखी अशा नैसर्गिक घटनांमुळे सागरतळावर भेगा पडल्यामुळे या लाटा निर्माण होतात. भूमिपात, हिमलोट, उल्कापात, अणुस्फोट इत्यादी कारणांमुळेही महासागरात मोठ्या लाटांची निर्मिती होते. भूकंप आणि ज्वालामुखीमुळे होणाऱ्या त्सुनामी लाटांचे प्रमाण अधिक आहे. मात्र, सर्वच भूकंप आणि ज्वालामुखीमुळे त्सुनामी लाट निर्माण होते, असे नाही. एखादी लाट जशी खंडित होते, त्याप्रमाणे न घडता, त्सुनामी लाट आरंभी वेगाने भरती आल्याप्रमाणे वाटते.</p> <p style="text-align: justify; ">त्सुनामीचे स्वरूप महासागरातील सर्वसाधारण लाटांहून वेगळे असते, कारण तिची तरंगलांबी जास्त असते. त्यामुळे सागरकिनाऱ्याला स्थलांतरित झालेल्या पाण्याचे प्रमाण आणि व्याप्ती साधारण लाटांपेक्षा जास्त असते. त्सुनामीमुळे लाटा सलग व एकापाठोपाठ येत राहतात आणि त्या अधिक वेगवान असतात.</p> <p style="text-align: justify; ">त्सुनामीची वारंवारता साधारणपणे एक मिनिटापासून एक तासापर्यंत असू शकते. त्सुनामीची उंची १ ते १० मी. तर तरंगलांबी सु. १५० किमी.पर्यंत असते. त्सुनामीचा वेग ताशी ४० ते २०० किमी.पर्यंत असतो. त्सुनामी जसजशी किनाऱ्याकडे, उथळ भागाकडे पोहोचते तसतशी लाटांची उंची खूप वाढते. चिंचोळ्या भागातून वाहणाऱ्या त्सुनामीचे शीर्ष ३० मी.पर्यंत उंच असू शकते.</p> <p style="text-align: justify; ">त्सुनामी ही पर्यावरणीय आपत्ती आहे. प्रचंड उंचीच्या आणि अतिवेगवान त्सुनामी किनाऱ्यावर आदळतात. त्याचा प्रभाव किनारी प्रदेशात प्रकर्षाने जाणवतो. त्सुनामीमुळे किनारी प्रदेशातील लोकांची आर्थिक व जीवित हानी होते. असंख्य लोक मृत्युमुखी पडतात.</p> <p style="text-align: justify; ">सन २००४ मध्ये हिन्दी महासागरात निर्माण झालेल्या त्सुनामीमुळे सु. २,३०,००० लोक मृत्युमुखी पडले. मानवी इतिहासातील ही एक सर्वात मोठी नैसर्गिक आपत्ती आहे. त्सुनामी या नैसर्गिक संकटाची पूर्वकल्पना करणे शक्य होत नसल्यामुळे येणाऱ्या आपत्तीचे व्यवस्थापन आधीच करणे शक्य नसते.</p> <p style="text-align: justify; ">त्सुनामीचे पर्यावरणीय परिणाम लक्षणीय आहेत. या लाटांमुळे पर्यावरणाची हानी होते. परिसंस्था विस्कळीत होतात व पारिस्थितिकीय संतुलन बिघडते.</p> <p style="text-align: justify; ">या लाटांनी वाहून आणलेल्या वाळूखाली प्राणी व वनस्पती गाडल्या जातात. किनाऱ्यावरील शुष्क भूमी पाणथळ बनते आणि आद्र्रभूमी परिसंस्थेत तिचे रूपांतर होते. भूजलामध्ये क्षारजल मिसळल्याने जलसंसाधनांची अवनती होते. पुळणे नाहीशी होतात. लहान बेटे ओसाड होतात.</p> <p style="text-align: justify; ">किनाऱ्यावर खारफुटी व गवताळ वनस्पती असली तर ती विशिष्ट प्राण्यांचे अधिवास असते. त्यात बिघाड निर्माण होतो. सागरी व किनारी भागांतील काही वनस्पती जाती नष्ट होतात.</p> <p style="text-align: justify; ">प्रवाळ बेटांची हानी होते. चिखलाने ती गाडली जातात. सागरी परिसंस्थेचे भूमी परिसंस्थेत तर भूमी परिसंस्थेचे सागरी परिसंस्थेत रूपांतर होते.</p> <p style="text-align: justify; ">महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवबाग येथे त्सुनामीमुळे वालुकामय बेट तयार झाले आहे. तेथील सागरतळ उघडा पडल्यामुळे ते सागरी पक्ष्यांसाठी एक आश्रयस्थान बनले आहे.</p> <p style="text-align: justify; "> </p> <p style="text-align: justify; ">लेखक : जयकुमार मगर</p> <p style="text-align: justify; ">माहिती स्रोत: <a class="external-link ext-link-icon" href="https://kumarvishwakosh.maharashtra.gov.in/kumar-vishwakosh/index.php/component/content/article?id=276" target="_blank" title="नवीन विंडो मध्ये ओपन होणारी बाह्य साईट ">कुमार मराठी विश्वकोश</a></p> </div>