<div id="MiddleColumn_internal"> <p style="text-align: justify; "><span>कुठं दिव्यांग विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप... कुठं तराफा, कप्पी, जनरेटर अशा विविध यंत्रांचं प्रात्यक्षिक देणारं विज्ञान मॉडेल... तर कुठं शेतकर्याच्या पीककापणीच्या कामात मदत... कुठं गडकिल्ले परिसर स्वच्छता व संवर्धन मोहीम... तर कुठं अनघड दगडी बांधाची उभारणी... असे विविध उपक्रम राबवण्याचं निमित्त होतं; ‘एशियन पेंट्स’ या कंपनीच्या 75व्या वर्षपूर्तीचं.</span></p> <p style="text-align: justify; ">‘एशियन पेंट्स’ या कंपनीच्या सहकार्यानं ‘वनराई’च्या माध्यमातून सातारा जिल्ह्यातील बारा गावांमध्ये विविध विकासकामं सुरू आहेत. या गावांमध्ये कंपनीच्या सहकार्यातून ‘वनराई’मार्फत विविध लोकोपयोगी उपक्रम राबवण्यात आले. त्यामध्ये प्रामुख्यानं लोणंदजवळील बाळू पाटलाची वाडी इथल्या ‘श्री स्वामी समर्थ निवास मूकबधीर विद्यालया’मधल्या दिव्यांग विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं. प्रत्येक विद्यार्थ्याला वही, पेन, पेन्सिल असं साहित्य देण्यात आलं. त्या वेळी ‘वनराई’चे अध्यक्ष श्री.रवींद्र धारिया, वित्त विभागप्रमुख श्री.सुधीर मेकल, प्रकल्प संचालक श्री.प्रकाश जगताप आदी मान्यवरांसह ‘एशियन पेंट्स’चे विविध अधिकारी व कर्मचारीही उपस्थित होते.</p> <p style="text-align: justify; ">यानिमित्ताने खंडाळा तालुक्यातील चार शाळांमध्ये विज्ञान प्रात्यक्षिक उपक्रमांचं आयोजनदेखील करण्यात आलं होतं. या उपक्रमाअंतर्गत ‘एशियन पेंट्स’च्या प्रशिक्षित कर्मचार्यांनी प्रत्यक्ष शाळेत जाऊन शाळेतील विद्यार्थ्यांना इंजीन, तराफा, कप्पी, जनरेटर, सौर उर्जा यांचं प्रत्यक्ष मॉडेल बनवून दाखवलं आणि विद्यार्थ्यांना या मॉडेलआधारे काही प्रात्यक्षिकं करायला सांगितली. हे मॉडेल संच शाळेला भेटीदाखल देण्यात आले.<span style="text-align: justify; ">याव्यतिरिक्त आणखी एक आगळावेगळा उपक्रम राबवण्यात आला. तो म्हणजे ‘गड परिसरातील स्वच्छता आणि संवर्धन’ उपक्रम. या उपक्रमाअंतर्गत ‘एशियन पेंट्स’चे साठ कर्मचारी आणि ‘वनराई’चे कार्यकर्ते सिंहगड आणि मल्हारगड इथेे गेले. त्यांनी सिंहगडावर स्वच्छता मोहीम राबवून पाच गोण्या प्लास्टिक कचरा गोळा केला. मल्हारगडावरील हौदामध्ये साचलेला गाळ काढून तो हौद रिकामा करण्यात आला.</span></p> <p style="text-align: justify; ">याशिवाय काही गावांमधल्या शाळांमध्ये चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, कृषी प्रात्यक्षिकं अशा वेगवेगळ्या स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं.<span style="text-align: justify; ">‘एशियन पेंट्स’च्या कर्मचार्यांनी झगलवाडी (ता. खंडाळा, जि. सातारा) इथे श्रमदानातून एक अनघड दगडी बांध रचला. तसेच केसुर्डी (ता. खंडाळा, जि. सातारा) गावातील शेतकर्यांच्या शेतांमध्ये जाऊन हरभराकाढणीसाठी मदत केली.</span><span style="text-align: justify; ">असे विविध लोकोपयोगी उपक्रम राबवून ‘एशियन पेंट्स’ कंपनीची 75वी वर्षपूर्ती साजरी केली जात आहे. असे उपक्रम राबवणे म्हणजे समाजऋणातून अंशतः उतराई होण्याचाच प्रयत्न असल्याचं मत कंपनीचे मानव संसाधन अधिकारी श्री.विक्रम शिंदे यांनी व्यक्त केलं.</span></p> <p style="text-align: justify; "><span style="text-align: justify; "><br /></span></p> <p style="text-align: justify; ">माहिती स्रोत: वनराई</p> </div>