<div id="MiddleColumn_internal"> <h3>प्रस्तावना</h3> <p style="text-align: justify; ">शेती करण्याआधी शेतकरी जमीन नीट नांगरून तिची सगळी मशागत करून ठेवतो. मुलगी वयात येण्यापूर्वी, स्त्री म्हणून तिचे जीवन निसर्गनियमाप्रमाणे सुरु होण्यापूर्वीच तिच्या मनाची त्यासाठी तयारी करणे, तिच्या मनाची एक मशागत करून ठेवणे हे मुख्यतः मुलीच्या आईचे किंवा आई नसल्यास मोठ्या बहिणीचे आणि शाळेतल्या तिच्या शिक्षिकेचेही काम असते.</p> <p style="text-align: justify; ">मुलाची पौगंडावस्था नि मुलीचे यौवनातले पहिले पाऊल हे त्यांच्या जीवनातले अत्यंत महत्त्वाचे टप्पे असतात. मुलांना याबद्दल सांगणारे पुष्कळजण असतात. भाऊ असतात, मित्र असतात असल्या विषयांवर ते अगदी खुल्या मानाने बोलू शकतात.</p> <p style="text-align: justify; ">शंभर वर्षापूर्वीच्या काळी, म्हणजे जेव्हा मुलगी वयात येण्यापूर्वी तिचे लग्न होत असे, बालविवाहाची प्रथा जेव्हा रूढ होती त्या काळात पहिल्यांदा नहाण आलेल्या छोटयाशा सौभ्याग्यवातीचं खूप कोडकौतुक केले जात असे, त्या काळातल्या न्हाणुली ला मखरात बसवत असत. तिच्या सासर माहेरचे किंवा अन्य जवळचे नातलग तिच्यासाठी चार दिवस चांगली चांगली स्वादिष्ट पक्वान्न घेऊन येत असत. चार दिवस ती अस्पृश्य असली तरी या कोडकौतुकाच्या बरसातीने ती सुखावत असे. मग पाचव्या दिवशी ती स्वच्छ झाल्यानंतर मुहूर्त वगैरे पाहून तिचा गर्भाधान विधी केला जात असे. त्याकाळी न्हाणुलीचे असे कौतुक होत असे कारण पहील्यांदा नहाण म्हणजे तिच्या पतीच्या शेजेसाठी सिद्ध होत असे. पण पुढे बालविवाहाची प्रथा बंद पडून मुलींची लग्न उशिरा व्हायला लागली म्हणजे लग्नाच्या आधीच मुलगी वयात येऊ लागली. पण तेव्हापासून न्हाणुलीचे कौतुक मागे पडून मुलगी वयात आलेली पाहिली की तिची आई मोठ्या काळजीत पडलेली दिसू लागे. मुलगी न्हातीधुती झाली आता एकदा वेळेवर तिचे लग्न झाले तर बरे, नाहीतर मग चुकून वाटणाऱ्या या काळजीतूनच पहिली पाली या घटनेकडे पाहायची स्त्रीची नजर बदलली. लहानपणी तर बहुतेक मुलींना पाळीबद्दल काहीच नीटशी माहिती नसे. विचित्र, अर्धवट कुतुहल मात्र खूप असे. दर महिन्याला घरातल्या पांघरूण वेगळे, कुणी त्यांना शिवायचे नाही. त्यांची आंघोळीची मोरी पण वेगळीच. असे दृश्य सर्रास प्रत्येक घरात दिसून येत असे. अश बाईला किंवा मुलीला विटाळशी म्हटले जाई. तो शब्दच इतका घाणेरडा होता की विटाळशी म्हणजे कुणीतरी घाणेरडी बाई असे वाटे. बायकांना आणि मोठया मुलींना दार महिन्याला नेमका कावळा कसा आणि का शिवतो याचे घरातल्या लहान मुलींना नेहमीच मोठे नवल वाटे. कधीतरी मोठ्या बहिणीचे रक्ताने भरलेले कपडेही नजरेला पडत. मनातून अतिशय भीती वाटे. पण कुणी नीट समजावून सांगेल तर शपथ. मग अचानक एखादे दिवशी शाळेत किंवा घराबाहेर असतांना परकरावर डाग पडला की बिचाऱ्या मुलीच्या फटफजितीला पारावर उरत नसे. तिला अगदी मेल्याहून मेल्यासारखे होत असे. आपल्याला पाली आली आहे म्हणजे काहीतरी वाईट घडलंय, आपल्या हातून काहीतरी चूक घडलीच अशा विचाराने मुलगी कानकोंडी होऊन जात असे. एकदम रक्त पाहून ती भिऊन जात असे. विटाळ हा शब्द ऐकला की कोणती कोवळी मुलगी शहारणार नाही ?</p> <p style="text-align: justify; ">आता अर्थातच समाज बदललाय, मुलींच्या वागण्यात खूप आत्मविश्वास आला आहे. घरातल्या वातावरणात सुद्धा प्रसन्न मोकळेपणा आला आहे. सनीटरी नापकीन च्या जाहिराती सिनेमागृहात आणि टि. व्ही. वर सुद्धा दाखवल्या जातात.</p> <p style="text-align: justify; ">बहुतेक शाळेतून आता शरीरशास्त्र हा विषय शिकवताना स्त्री शरीराची आणि शरीरधर्माची ओळख मुलीना करून दिली जाते. पण पुष्कळदा पाली येऊन गेल्यावर हे शिक्षण शाळेत दिले जाते. थोडया मोठ्या आणि जबाबदार मुलींना हे शिक्षण देण्यापेक्षा मुलींच्या दहाव्या अकराव्या वर्षीच तिच्या शरीरधर्माची ओळख तिला करून दिली पाहिजे. सरळ आणि सोप्या पण शास्त्रीय भाषेत अशी चांगली पूर्ण कल्पना दिली गेली तर ती केव्हाही जास्त चांगली.</p> <p style="text-align: justify; ">पण शाळेपेक्षाही मुलीचे मन तयार करण्याची मुख्य जबाबदारी मुलीच्या आईची आहे. मेला बायकांचा जन्मच वाईट म्हणूनच देवाने तिच्यामागे पाळीचा हा त्रास लावला आहे. पूर्वीचे लोक तर अशा बाईला चार दिवस अगदी अस्पर्श मानत. पण हल्ली मेला सगळाच अनाचार माजलाय असे आईच जर बोलू लागली तर मुलीलाही पाली हे संकट वाटणारच. यापेक्षा आईनेच तिला चांगल्या शब्दात ऋतुमती होणे हे निसर्गाचे वरदान आहे सांगून मुलीला आपल्या पहिल्या पाळीचे स्वागत करायला पाहिजे.</p> <h3>वयात येणाऱ्या मुलीच्या आईची जबाबदारी</h3> <p style="text-align: justify; ">मुलगी वयात येत असल्यामुळे तिच्यात होणारे मानसिक बदल प्रामुख्याने तिच्या आईने समजून घेतले पाहिजेत आणि तिच्याशी समजून वागले पाहिजे. तिच्या स्वभावात बदल झाल्यामुळे तिच्यावर कोणत्याही परिस्थितीत रागवता कामा नये. तिच्या वागणुकीतील बदल आईने स्वीकारायला हवेत. आता आपली मुलगी विकसित होत आहे. हे लक्षात घेऊन आईने मुलीला आता आदराची बरोबरीची वागणूक द्यायला हवी.</p> <p style="text-align: justify; ">प्रत्येक मुलीला, पाळी म्हणजे काय, याची माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. पाळी येणे ही अनिष्ट गोष्ट नसून ती एक नैसर्गिक क्रिया आहे आणि पाळी येणे ही एक आनंदाचीच घटना आहे. हे तिला समजावून दिले पाहिजे. काही आया आपल्या मुलीला पाळी आली ही गोष्ट इतर कुटुंबियांपासून लपवून ठेवू पाहतात. साहजिक मुलीलाही ही एक शरमेचीच गोष्ट वाटू लागते. पाळी येणे ही नैसर्गिक गोष्ट आहे. उलट पाळी न येणे हीच अनैसर्गिक गोष्ट आहे. ३ ते ५ दिवस रक्तस्राव होणे ही एक नैसर्गिक बाब असते. आणि त्यापेक्षा जास्त दिवस रक्तस्राव होऊ लागला तर मात्र ते अयोग्य असते. हे मुलींना सांगितले पाहिजे. पाळीच्या दिवसात शरीराची स्वच्छता कशी ठेवावी हेही आईने मुलीला शिकवायला हवे. काही मुलींच्या पोटात पाळी चालू असतांना खूपच दुखते, काहींना फार दुखत नाही. हे दु:ख तसं इतके तीव्र नसते. लाडावलेल्या मुली मात्र त्याचा बाऊ करतात.</p> <p style="text-align: justify; ">पहिली एक-दोन वर्षे पाळी नियमितपणे दर महिन्याला येईलच असे नसते. दोन किंवा तीन महिन्यांनीसुद्धा पाळी येऊ शकते. यात अनैसर्गिक असे काहीच नसते. पण ही वस्तुस्थिती आईने मुलीला सांगायला हवी. कारण पाळी दार महिना आली नाही तर मुली घाबरून जाते. तिच्या मनात भलते विचार येऊ लागतात. पाळी येऊन गेल्यावरसुद्धा गर्भधारणा होऊ शकते. खरे म्हणजे पाळी कधीच आली नसतानासुद्धा गर्भधारणा होवू शकते. अर्थात अशी उदाहरणे फारच कमी असतात.</p> <p style="text-align: justify; ">मुलींच्या मध्ये होणारे शारीरिक आणि मानसिक बदल जाणून घेऊन तिच्या येऊ घातलेल्या पहिल्या पाळीच्या संदर्भात तिचे मन तयार करणे, पाळी म्हणजे काय याची माहिती करून देणे हे प्रत्येक मुलीच्या आईचे कर्तव्य आहे. पूर्वीच्या पिढीतील मुलीच्या वेळची सभोवतालची परिस्थिती वेगळी होती. एकच कुटुंब पद्धती होती. घरात खूप माणसे असायची. बायकांची एकमेकीत पाळी, लग्न, गर्भधारणा, बाळंतपण या विषयांवरच्या गोष्टींची चर्चा चालू असायची, वयात येणाऱ्या मुली आपल्या बहिणीकडून ते सगळे शिकत असत. पण आता कुटुंबव्यवस्थाच बदलत गेली आहे. बहुसंख्य कुटुंब आता लहान असतात. एकत्र कुटुंबपद्धती संपुष्टात येत चालली आहे. आता मुलांना आपले आई वडील एवढेच आपले कुटुंब हे माहित असते. आपल्या चुलत, मानस भावंडाबद्दल, काका, मामा, आत्या यांच्याबद्दल फारशी माहिती नसते. अशा परिस्थितीत कुटुंबातील सगळ्या मुलींची जबाबदारी प्रामुख्याने आईवरच येवून पडते. साहजिकच शरीरातील बदल आणि पाळीबद्दलची भीती मुलींच्या मनातून काढून टाकण्यासाठी आईनेच संपूर्णपणे जबाबदारी स्वीकारणे आणि योग्य रीतीने पार पाडणे आवश्यक असते. मुलींच्या त्या संक्रमणावस्थेच्या काळात आईने तिच्याशी हळुवारपणे, मैत्रीच्या नात्याने वागून, विश्वासात घेऊन मुलीचे मनोधैर्य वाढविण्यासाठी झटले पाहिजे. आत्मविश्वास निर्माण केला पाहिजे आणि सर्वार्थाने परिपूर्ण अशी उदयाची स्त्री, म्हणून मुलीचे व्यक्तिमत्व विकसित करायला पुढे सरसावले पाहिजे.</p> <h3 style="text-align: justify; ">मुलीमधील बदल</h3> <h4 style="text-align: justify; ">मुलगी वयात आल्यावर कोणकोणते मानसिक बदल दिसून येतात ?</h4> <p style="text-align: justify; ">मुलगी वयात आल्यानंतर प्रसन्न दिसू लागते. तिचा अल्लडपणा कमी होतो. मुलांबद्दल आकर्षण वाटू लागते. ती लाजाळू बनते. तिला आपण मोठे झाल्यासारखे वाटू लागते. शरीरात होणाऱ्या बदलांचे आकलन ण झाल्याने तिच्यात संभ्रम निर्माण होतात. कदाचित परिचित मुले, नातेवाईक यांच्याशी संभोग केल्याची स्वप्ने पडून ती घाबरते. तिच्यात अपराधीपणाची भावना निर्माण होते.</p> <h4 style="text-align: justify; ">मुलगी वयात आल्यावर मुलींमध्ये कोणकोणते शारीरिक बदल दिसून येतात?</h4> <p style="text-align: justify; ">मुली ११ – १२ वर्षाच्या झाल्या की, शरीरातील विशिष्ट भागात चरबी वाढू लागते. विशेष करून कंबरेभोवती व छातीवरती ही वाढ आपल्या नजरेस येण्याइतकी असते. कंबरेच्या हाडांच्या रचनेतही बदल होऊ लागतो. त्यामुळे कंबर गोलाकार दिसू लागते. स्तन वाढू लागतात. काखेत व जांघेत केस येतात व त्यानंतर मासिक पाळी सुरु होते. प्रत्येक मुलीची मासिक पाळी सुरु होण्याचे वय वेगवेगळे असले तरी साधारणतः अकरा ते पंधरा वर्षापर्यंत मुलींची मासिक पाळी सुरु होते. मुलीला मिळणाऱ्या पोषणावर मासिकपाळी सुरु होण्याचे वय काही प्रमाणात अवलंबून असते. काही अशक्त मुलींची पाळी उशिरा सुरु होते. आपल्याकडे मुलींची मासिक पाळी सुरु होण्याचे वय साडेबारा ते साडेसतरा वर्षे इतके आहे. त्यामुळे पंधरा-सोळा वर्षापर्यंत मुलींची मासिक पाळी सुरु झाली नाही तर घाबरून जाऊ नये त्यानंतर मात्र डॉक्टरी सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.</p> <h4 style="text-align: justify; ">वयात येणाऱ्या मुलींची कोणती काळजी घेतली पाहिजे ?</h4> <p style="text-align: justify; ">वयात येत असताना व वयात आल्यानंतर मुलींना समतोल आहार मिळणे आवश्यक आहे. याकरिता लोहयुक्त खाणे महत्त्वाचे आहे. याचबरोबर मुलींच्या शंका-कुशंकांचे निरसन करून, त्यांना योग्य ती माहिती देवून पालकांनी त्यांच्यात आधी सांगितल्याप्रमाणे होणारे बदल समजून घेऊन त्यांचे व्यक्तिमत्व मोकळ्या वातावरणात खुलू दिले पाहिजे. मुलींचे शारीरिक व्यायाम, खेळ व छंद बंद न करता अशा गोष्टींना प्रोत्साहन देणे महत्वाचे आहे. शरीराची व मनाची सर्वांगीण वाढ ही सकस आहार, भरपूर व्यायाम व हसरे खेळते, मनमोकळे वातावरण यामध्येच होत असते.</p> <h4 style="text-align: justify; ">वयात येताना मुलींच्या स्वभावात, वागण्यातही बदल होत असतात, ते कोणते ?</h4> <p style="text-align: justify; ">ज्याप्रमाणे मुलींच्या शरीररचनेत बदल होतो त्याप्रमाणे त्यांच्या स्वभावातही बदल होऊ लागतात. मुलांबद्दल अनामिक आकर्षण वाटणे, वेशभूषेवर व सुंदर दिसण्याकडे जास्त लक्ष केंद्रित होणे. पालकांपासून एक प्रकारचे तुटलेपण येणे तर मैत्रिणींबरोबर गप्पा गोष्टी वाटणे असेही बदल मुलींमध्ये होत असलेले आपल्याला दिसतात. आपल्या शरीरात होणाऱ्या बदलांची जाणीव झाल्यामुळे मुलींच्या वागण्यात एक प्रकारचा संकोच, लाजरेपणाही निर्माण होतो. ज्या घरातील वातावरण मनमोकळे असते, आई-वडिलांची मुला-मुलींबरोबरचे वागणे अति धाकाचे नसते, त्या घरातील मुलींमध्ये असे बदल प्रकर्षाने जाणवत नाहीत. परंतु स्वतःच्या शरीरात होणाऱ्या बदलांमुळे निर्माण होणाऱ्या संभ्रमाचे निरसन होण्यासाठी पोषक असे वातावारण घरात नसले तर मात्र मुलींमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे न्यूनगंड निर्माण होऊ शकतात. याच वयात मुलामुलींना पालकांच्या जवळीकतेची मार्गदर्शनाची जास्त गरज असते. आपुलकीचा साधा स्पर्शही एक भावनिक गरज असते. नेमक्या याच काळात पालक, विशेषतः वडील आपल्या मुलीपासून दूर दूर राहू लागतात. मोठी झाली या शब्दाचा भडिमार वाढत्या वयातील मुलींवर वारंवार होऊ लागतो. अचानकपणे बदललेल्या या वातावरणाचा अर्थ मात्र वाढत्यावयातील मुलीला लागत नसतो. त्यामुळे मनावरचा ताण वाढत जातो. लैंगिकतेबद्दल नव्याने निर्माण होणारे कुतूहल समाजाला मान्य नसल्या कारणाने अनेकदा आई-वडिलांपासून लपून छपून लैंगिक प्रयोग केलेले आपल्याला आढळतात.याचे घातक परिणाम बहुतांशी मुलींनाच भोगावे लागतात. अनेकदा या वयात मुला-मुलींकडून न झेपणारी पावले केवळ उत्सुकतेपोटी अथवा एकटेपणाच्या भावनेतून उचलली जातात. आजुबाजूला वावरणारे विश्वासार्ह वाटणारे पुरुष विकृत मनोवृत्तीतून अजाण मुलींचा वापर कामपूर्तीसाठी करतात. उदा. शेजारी, घरगडी, नातेवाईक, शिक्षक इत्यादी. याबद्दल पालकांनी तर जागरूक रहावेच पण मुलींनाही याबद्दल चर्चेतून माहिती दयावी. या नाजूक वयात आई-वडिलांशी मैत्रीपूर्ण संवादाची किती आवश्यकता आहे हे आता आपल्या लक्षात आलेच असेल.</p> <h3 style="text-align: justify; ">मुलांमधील बदल</h3> <h4 style="text-align: justify; ">मुलगा वयात येताना त्याच्यात कोणते बदल होतात ?</h4> <p style="text-align: justify; ">ज्याप्रमाणे आपण पाहिले की मुली वयात येताना त्यांच्यात अनेक बदल होतात. त्याचप्रमाणे मुलांच्या शरीरातही अनेक बदल होतात. मुलगा वयात येऊ लागला की, त्याची उंची झपाटयाने वाढते. छाती व कंबर पसरट होऊ लागते. काखेत व जांघेत केस येऊ लागतात. त्याचबरोबर दाढी व मिशाही फुटतात. आवाज बदलतो. शिस्नाचा आकार वाढतो व मधून मधून शिश्न ताठर होऊ लागते व कधी कधी खूप उत्तेजित झाल्यामुळे त्यातून वीर्य बाहेर पडते. यामध्ये घाबरण्यासारखे किंवा लाजण्यासारखे काहीही नाही. मुलांमधील हे बदल साधारणतः वयाच्या १२ व्या वर्षांपासून सुरु होऊन १९ व्या वर्षांपर्यंत पूर्ण होतात.</p> <p style="text-align: justify; "><strong><i><br />स्त्रोत : वयात येताना (किशोरावस्था)</i></strong><strong><i>, माहिती व शिक्षण मार्गदर्शक पुस्तिका, वॉटरशेड ऑगनायझेशन ट्रस्ट</i></strong></p> </div>