<div id="MiddleColumn_internal"> <p style="padding-left: 9px; text-align: justify; ">भारतातल्या राजस्थान राज्याच्या एका टोकावर, चार गावांच्या अंधार्या रात्री बल्बच्या झगझगीत प्रकाशात उजळून निघाल्या आहेत. लाटांप्रमाणे दिसणार्या वाळवंटी भूक्षेत्रामध्ये दूरवरपर्यंत वस्ती करून असणारी ही गांवे वसाहतींची एक श्रृंखला आहेत. ही गांवे, कधी ही वीजेच्या ग्रीडला जोडली गेली नव्हती. त्यांना आता मिळत असणारा प्रकाश मात्र भारत सरकार आणि संयुक्त राष्ट्रांच्या विकास कार्यक्रमातील एक प्रकल्प “ग्रामीण भागासाठी नूतनीकरणक्षम उर्जा” यांच्या संयुक्त प्रयत्नांचा एक भाग आहे.</p> <p style="padding-left: 9px; text-align: justify; ">रात्रीच्यावेळी, रस्तेही नसलेल्या या गावांत अंगणामधील एकाच बल्बमधून येणारा पांढराशुभ्र प्रकाश हाच एकमेव दिशादर्शक आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, प्रत्येक गावांतील एक याप्रमाणे चार तरुणींनी मिळून हे दिवे भंगारातून गोळा केलेले आहेत आणि त्यांच्या देखरेखीसाठी त्यांना आर्थिक मोबदला मिळतो.</p> <p style="padding-left: 9px; text-align: justify; ">या चौघीजणींना त्यांच्या समुदायाची सोय करण्यासाठी ‘अनवाणी सौर इंजीनिअर’ म्हणून प्रशिक्षित करण्यामागे त्यांच्या कुटुंबांना समजावण्यात बरेच प्रयत्न खर्ची घालावे लागले. बारमरमध्ये हा कार्यक्रम राबविणारी तिलोनियामधील एक स्वयंसेवी संस्था, सामाजिक कार्य आणि संशोधन केंद्र (एसडब्ल्यूआरसी) राजस्थानातील अजमेर जिल्ह्यात अनवाणी सौर इंजीनिअरसाठी आवश्यक प्रशिक्षण कार्यक्रम चालविते.</p> <p style="padding-left: 9px; text-align: justify; ">या चौघीजणींचे शिक्षण केवळ पांचवी किंवा आठवीपर्यंतच झालेले आहे. यांपैकी कोणीही त्यांच्या कुटुंबापासुन कधी दूर राहिलेले नाही किंवा कोणीही कधी शेजारच्या गावांपलीकडे प्रवास केलेला नाही. यातील तिघी अनवाणी सौर इंजीनिअर विवाहित आहेत तर एकीचे लग्न ठरलेले आहे.</p> <p style="padding-left: 9px; text-align: justify; ">ग्रामस्थांचे म्हणणे होते की मुलांना या कामाचे प्रशिक्षण द्यावे मात्र त्यांना सांगण्यात आले की हा प्रकल्प फक्त स्त्रियाच हाताळतील. गावकर्यांना हे स्वीकारण्यास थोडा वेळ लागला. मात्र शेवटी, भगवती, सजनी, सलीमती आणि चानो यांनी एसडब्ल्यूआरसीच्या तिलोनिया कॅम्पसमध्ये दोन महिन्यांचे प्रशिक्षण आणि एक महिन्याचा कार्यानुभव पूर्ण केला. यानंतर त्यांनी प्रत्येक गावांतील दिवे तयार केले आणि कार्यान्वित केले. आता त्या गावातील दिव्यांची नियमित देखभाल करतात, त्यांसंबंधी तक्रारी सोडवतात आणि त्यांना उर्जा देणार्यां बॅटर्यांची देखभाल करतात.</p> <p style="padding-left: 9px; text-align: justify; ">त्या तरूणी, ज्या काही महिन्यांपूर्वी चारचौघींसारख्याच धुणीभांडी, केरकचरा करायच्या; आज ‘इंजीनिअर’ म्हणून ओळखल्या जातात. दिवे असणारे प्रत्येक कुटुंब गावातील निधीला काही देणगी देते ज्यातून ह्या स्त्रियांना महिना रु. १००० ते १३५० पगार देण्यात येतो.</p> <p style="padding-left: 9px; text-align: justify; "><strong><span>स्त्रोत:</span></strong> <a class="external-link ext-link-icon" href="http://www.undp.org/" target="_blank" title="नवीन विंडो मध्ये ओपन होणारी बाह्य साईट ">www.undp.org</a></p> </div>