<div id="MiddleColumn_internal"> <h3 style="text-align: justify; ">प्रस्तावना</h3> <p style="text-align: justify; ">मी संगिता अशोक गायकवाड , मु. पो. सावरगाव घुले येथे वसुंधरा सेविका म्हणुन काम पाहते. या गावात काम करताना मी महिला व बाल विकासाकडे भर दिला. सावरगाव घुले येथे आधी एकही बचत गट चालू नव्हता. कारण बचतीचे महत्त्व पटलेले नव्हते. आणि त्यांना बचतीविषयी मार्गदर्शन करणारे कोणीही नव्हते.</p> <p style="text-align: justify; ">कार्यक्रमाअंर्तगत महिलाना एकत्र करून बैठका घेण्यात आल्या. त्यात त्यांना बचतीचे महत्त्व समजावून सांगितले ते त्यांना आवडले. त्यांना आपल्या गरजा उदा. व्यवसाय, निवारा, अन्न, शिक्षण, खरेदी, आजरपण अशावेळी आर्थिक अडचणी येतात याविषयी महत्व पटले. त्यासाठी बचत गटातून आपण २% द्वारे कर्ज घेऊन आपली पैशाची गरज भागवू शकतो आणि अशा प्रकारे अनेक चर्चा करून महत्त्व पटवून दिले. परिणामी आमच्या गावात १२ गट चालू झाले.</p> <p style="text-align: justify; ">सर्व कार्यक्रम गटांमार्फत राबवत आहोत. त्यात महिलांचे अधिकार महिलांना समजून सांगितले. पूर्वी आमच्या गावात महिला ग्रामसभेला जात नव्हत्या. त्यांना त्यांचा अधिकार समजून सांगितल्यामुळे महिला आता ग्रामसभेला जावू लागल्या. त्यामुळे आता ग्रामसभेला पुरुषांपेक्षा महिलांची संख्या जास्त असते. अशाप्रकारे महिलांचे संघटन तयार होत गेले. कुठलाही कार्यक्रम असला तरी महिला एकत्र येतात व ते करू शकतात.</p> <p style="text-align: justify; ">उदा. शिसवद येथे महिला मेळावा होता तेव्हा गावातील महिलांनी खादय पदार्थ तयार करून विकले. त्यात त्यांनी मासवडी व भाकरी ३०रु. ताटाने जेवण दिले. त्यासाठी त्यांना १५०० रु. खर्च झाला व ४००० रु. फायदा झाला. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे नगर जिल्ह्याचे कलेक्टर श्री संजीव कुमार साहेब व वाटरच्या मनीषा डिसोजा मॅडम यांनी आमच्या स्टॉल वर जेवण केले. त्यांनी गावचा महिलांना चांगला शेरा दिला. जेवण चांगले झाले महिलांना खूप आनंद झाला व गावात पण महिलांनी काहीतरी केले व नाव कमावले. पुरुषांच्या दृष्टीने महिला काहीतरी करतात यावर विश्वास बसला.</p> <h3 style="text-align: justify; ">आरोग्य प्रश्नांकडे लक्ष</h3> <p style="text-align: justify; ">गावात बालविकासाकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी ० ते ५ वयोगटातील मुलांची वजन उंची घेतो. त्यातून मुलांची श्रेणी ओळखली जाते आणि कुपोषीत मुले ओळखता येतात. सुरवातीला आमच्या गावात ७ मुले तिसऱ्या श्रेणीत येत होते. नंतर त्यांच्या मातांची भेट घेवून त्यांना मुलांना अंगणवाडीत घेवून जाणे, त्यांना खाऊ घालणे.</p> <p style="text-align: justify; ">वेळेवर लसीकरण करणे. वजन, उंची मोजणे. व स्वतः लक्ष देणे अशी माहिती सर्व मातांना दिली. वजन, उंचीचा तक्ता सर्वांना समजून सांगितल्यामुळे आपले बाळ कोणत्या श्रेणीत / रंगात येते ते ओळखता येवू लागले. नंतर माता स्वता मुलांची काळजी लागल्या. हळुहळु तिसऱ्या श्रेणीतले मुले पहिल्या श्रेणीकडे येवू लागली.</p> <h3 style="text-align: justify; ">कुपोषणावर बटाटयाचे महत्व</h3> <p style="text-align: justify; ">वसुंधरा सेविका प्रशिक्षणात आम्हाला बटाटा मुलांसाठी किती महत्त्वाचा आहे हे समजले. बटाटयामुळे बाळाचे वजन वाढते हे सांगितले. आम्ही गावात बैठक ठेवली. त्यात गावचे सरपंच उपस्थित होते. त्यांना कुपोषित मुलांसाठी काहीतरी करा यासंबधी शब्द टाकला. त्यांनी लगेच अंगणवाडी साठी ३ क्विंटल बटाटा दिला. त्यामुळे मुलांचे वजन वाढत गेले .</p> <p style="text-align: justify; ">नंतर ७ पैकी फक्त २ मुले तिसऱ्या श्रेणीत आले. त्यातील तिसऱ्या श्रेणीतील जी एक मुलगी कुपोषित होती, तिच्या घरी जाऊन आम्ही तिच्या मातेची भेट घेतली. कुपोषित असण्याचे कारण शोधले तर असे लक्षात आले ती मुलगी हि तिसरी मुलगी होती म्हणून तिच्याकडे लक्ष कमी दिले गेले होते.</p> <p style="text-align: justify; ">मग आम्ही तिच्या आईला समजून सांगितले व मुला-मुलीमध्ये भेदभाव करू नका. मुली सर्व बाबतील आता पुढे आहेत व त्याच तुमचे नाव उज्ज्वल करतील, नाव कमावतील अशी भावना तिच्या मनात निर्माण केली. नंतर ती मुलगी दररोज अंगणवाडीत येवू लागली, तिची काळजी घेवू लागले व तिला वजनवाढीसाठी औषधे वगैरे चालू केले. त्यामुळे त्या मुलीचे वजन वाढले.</p> <h3 style="text-align: justify; ">विविध कारणांनी गाव एकत्र आल्याने बक्षिस</h3> <p style="text-align: justify; ">अशा रीतीने गावात वेगवेगळे कार्यक्रम राबवू लागलो. अशा पद्धतीने गावात महिला-पुरुष एकत्र येण्यामुळे गाव विकासाकडे चालले आहे. गावाचा विकास होत गेला व गावाने पहिले बक्षिस मिळवले.</p> <p style="text-align: justify; ">आठ गावात सावरगाव घुले पहिले आल्यामुळे सर्वांना आनंद झाला आणि ते आता अजून चांगले तयारी करू लागले आहेत.</p> <p style="text-align: justify; "> </p> <p style="text-align: justify; ">आशय लेखिका : संगिता गायकवाड (सावरगाव घुले)</p> </div>