<p style="text-align: justify; "><span>विनामूल्य अन्न मिळण्याचे ठिकाण. धर्मात अन्नदानाचे महत्व नेहमीच अधिक मानण्यात आले आहे. विशेषतः </span><span>तीर्थक्षेत्री अन्नदान केल्याने महत्पुण्य लाभते अशी भावना आहे. या भावनेने प्रेरित होऊन काही दयाळू श्रीमंत लोकांनी तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी अन्नछत्रे उघडण्याची व ती व्यवस्थित चालविण्याकरिता कायम स्वरूपाची आर्थिक व्यवस्था ठेवण्याची जुनी प्रथा आहे. अशी अन्नछत्रे काही ठिकाणी आजही अस्तित्वात आहेत. अलीकडे धार्मिक वृत्ती कमी झाल्यामुळे अन्नछत्रे कमी होत आहेत</span><span>;</span><span> परंतु भूकंप, महापूर किंवा परचक्र यांमुळे झालेल्या आपद्ग्रस्त व निर्वासित यांच्याकरिता सरकार अगर इतर संस्थांमार्फत अन्नछत्रे आजही उघडली जातात.</span></p> <p style="text-align: justify; "><span> </span></p> <p style="text-align: justify; "><span><span><span class="tool-text">अ</span>न्नछत्रांचा उपयोग विद्यार्थी, गोरगरीब, संन्यासी, साधू, यात्रेकरू, निराश्रित व इतर गरजू लोकांना नेहमीच होत आला आहे. या दृष्टीने अन्नछत्राची उपयुक्तता मान्य केली, तरी त्यामुळे परावलंबित्व व आळसाची प्रवृत्ती वाढते</span><span>;</span><span> त्याचप्रमाणे नेहमीच सत्पात्री दान पडेल याचीही निश्चिती नाही.</span></span></p> <p style="text-align: justify; "><span><span><span class="tool-text">के</span>वळ भूतदयेने प्रेरित होऊन अन्नदान केल्याने गरीब व निराधार लोकांचा प्रश्न कायमचा सुटणारा नाही </span><span>;</span><span> त्यांच्यात स्वत</span><span>:</span><span>च्या पायावर उभे राहण्याची क्षमता निर्माण करण्याचा प्रयत्न होण्याची जरूरी आहे, असे काही समाजधुरिणांचे मत आहे.</span></span></p> <p style="text-align: justify; "><span style="text-align: right; ">लेखक: पु. ल. </span><span style="text-align: right; ">भांडारकर</span></p> <p style="text-align: justify; "><span style="text-align: right; "> </span><span style="text-align: right; ">माहिती स्रोत: <a class="external-link" href="https://marathivishwakosh.maharashtra.gov.in/khandas/khand1/index.php/component/content/article?id=4300" target="_blank" title="अन्नछत्र">मराठी विश्वकोश </a></span></p>