रब्बीमध्ये जिरायतीसाठी जमिनीतील ओलावा अत्यंत महत्त्वाचा असून, अधिकाधिक ओलावा साठविण्यासाठी जल व मृद् संधारणाच्या सोप्या बाबींचा अवलंब फायद्याचा ठरू शकतो.
कार्यक्षम जलसंधारणाच्या उपायामध्ये शक्यतो जमिनीचा पृष्ठभाग भुसभुशीत करून अथवा सरीसदृश उपचाराचा उपयोग करावा. रब्बीसाठी राखलेल्या शेतात बळिराम नांगराने उभी-आडवी मशागत करावी. त्यानंतर क्षेत्र तणविरहित व भुसभुशीत राखण्याकरिता वखराच्या एक-दोन हलक्या पाळ्या दिल्यास जलसंधारणाकरिता फारच उपयुक्त ठरते.
सपाट अथवा कमी उताराच्या भारी जमिनीमध्ये, रबी पेरणीपूर्वी 10 x 10 मीटरचे चौरस अथवा चौकोनी वाफे करून त्यामध्ये पेरणी करणे व मध्यम उताराच्या जमिनीवर 5 ते 10 मीटर अंतरावर, बैलाने ओढणाऱ्या रिजरच्या साह्याने उताराला आडवी जलसंधारण सरी काढून, दोन सरींमधील भागात पेरणी करण्याने परिणामकारक जलसंधारण होऊन उत्पादनात वाढ होते.
जमिनीवर आच्छादनाचा वापर केल्यास जमिनीतील ओलाव्याचे बाष्पीभवन कमी होते. ओलावा जास्त काळ टिकतो. यासाठी शेतात सहज उपलब्ध घटकांचा (गव्हाचा भुसा, सोयाबीनचा भुसा, शेतावरील काडीकचरा, उसाचे चिपाड इ. ) वापर करता येतो. ही आच्छादने पीक उगवणीनंतर 25 ते 30 दिवसांनी (1 कोळपणी आणि निंदणी झाल्यानंतर) समप्रमाणात जमिनीवर पसरावीत.
जिरायती क्षेत्रामध्ये रब्बी पिकांना खताची उपलब्धता कार्यक्षमपणे होण्यासाठी खते पेरणीपूर्वी 1 किंवा 2 दिवस अगोदर तिफणीच्या साह्याने 12 ते 15 सें.मी. खोलीवर शक्यतो पेरून द्यावे.
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
ग्लॅडिओलसच्या लागवडीसाठी मध्यम प्रतीची, पाण्याचा च...
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने रब्बी ज्वा...
राज्यात खरिपात पाऊस न झाल्याने निर्माण झालेल्या दु...
सध्याच्या काळात गहू, ज्वारी, करडई पिकांच्या वाढीच्...