मिनी दाळ मिल हा लघू उद्योग आहे. त्यासाठी मर्यादित मजूर लागतात. खोत स्वतः, आपले आई-वडील व पत्नी असे चौघे जण हा सारा व्याप सांभाळतात. उन्हाळ्यातील तीन महिने व्यवसाय चालतो. शेतकऱ्यांनाही यंत्राद्वारा डाळ तयार करून घेण्याची सोय या उद्योगाच्या माध्यमातून झाली आहे.
खोत यांच्याकडे अद्याप "ग्रेडर मशिन' नाही. भांडवल कमी पडत असल्याने अद्याप ते खरेदी केलेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनीच आपला माल काडीकचरा वेगळा करून निवडून आणावा, अशी सूचना खोत देतात. तीन महिन्यांच्या कालावधीत जवळपास 500 क्विंटल डाळ येथे तयार होते. वर्षाला सुमारे दीड लाख रुपयांची उलाढाल होते. शिवाय घरच्यांना तीन महिने रोजगार मिळतो.
मिनी डाळ मिलची क्षमता कमी असते. हरभऱ्याची दिवसाला सुमारे चार क्विंटल, तर तुरीची 2 ते 2.5 क्विंटल डाळ तयार होते. मजुरीच्या खर्चाव्यतिरिक्त विजेचा मुख्य खर्च असतो. महिन्याला तीन ते चार हजार रुपये विजेचे बिल येते. याशिवाय गोडेतेलाचा खर्च असतो. वीज भारनियमनाची मुख्य समस्या असते. त्यामुळे उपलब्ध वीज कालावधीतच काम करावे लागते.
एक किलो शेतमालापासून सुमारे 750 ग्रॅम डाळीचा उतारा पडतो. यात सुमारे 600 ग्रॅम पहिल्या क्रमांकाची मिळते. याला स्थानिक भाषेत फटका असे म्हणतात, तर त्याहून बारीक डाळ जी दुसऱ्या क्रमांकाची असते ती सुमारे 150 ग्रॅम असते. तिला सव्वा नावाने संबोधले जाते. एक किलो डाळीसाठी पाच रुपये दर आकारला जातो. सर्व शेतमालासाठी हाच सामूहिक दर आहे. डाळीबरोबर सुमारे 20 टक्के भुस्साही मिळतो. हा भुसा शेतकरी ग्राहक आपल्या जनावरांसाठी घरी घेऊन जातात. खोत यांच्याकडे अद्याप पॉलिशिंग मशिन नाही आणि त्यांची त्यांना गरजही भासत नाही. त्यांच्या ग्राहकांकडूनही अद्याप तशी काही मागणी नाही.
खोत यांच्या डाळ मिल उद्योगाची चांगली प्रसिद्धी झाली आहे. त्यामुळे त्यांच्याकडे परिसरातील पन्नास किलोमीटर अंतरावरील विविध गावांतून डाळ तयार करून घेण्यासाठी ग्राहक येतात. त्यांची संख्या सुमारे तीनशे ते चारशेपर्यंत आहे. परळी तालुक्यातील (जि. बीड) सारडगाव, धर्मापुरी, खापरटोन, पिंपरी; अहमदपूर तालुक्यातील (जि. लातूर) सताळा, किनगाव; रेणापूर तालुक्यातील हाणमंतवाडी, मुरढव, घनसरगाव, तळणी, गोविंदनगर, भंडारवाडी, पानगाव आदी गावांतील कार्यक्षेत्रात आपल्या उद्योगाचा विस्तार खोत यांनी केला आहे. खोत कुटुंबीयांना जिरायती शेती पद्धतीत पूरक उत्पन्नाचे ते चांगले साधन ठरत आहे.
पाथरवडीत आता किसानसेवा ऍग्रो प्रोड्युसर कंपनी शेतकऱ्यांनी स्थापन केली आहे. त्याचे 30 शेतकरी सभासद आहेत. कंपनीच्या पाच संचालकांपैकी श्री. खोत एक आहेत. कंपनीच्या माध्यमातून सध्या बियाणे व निविष्ठा विक्री केंद्र सुरू करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना रास्त दरात निविष्ठा देण्याचे त्यातून उद्दिष्ट ठेवले आहे. कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना माती परीक्षण करून दिले जाणार आहे. त्यासंबंधीचे "किट' खरेदी करण्यात आले असल्याचे खोत म्हणाले.
माहिती संदर्भ : अॅग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
लातूर जिल्ह्यातील औसा येथील बालाजी माळी यांनी मात्...
जिद्द, चिकाटी, मेहनत व सर्वांना सोबत घेऊन जाण्याची...
चांगले उत्पन्न मिळवून देणारे पीक’ म्हणून ज्वारीचे ...
आधुनिक शेड व्यवस्थापन, खाद्य, पोषण, स्वच्छता, लसीक...