निफाड तालुक्यातील उगावमध्ये राष्ट्रीय सेंद्रीय शेती अभियानांतर्गत परंपरागत कृषी विकास योजनेच्या माध्यमातून कृषी उत्पादन पद्धतीत बदल घडून आला आहे. गावातील 50 शेतकरी आपल्या प्रत्येकी एक एकर क्षेत्रात अत्यंत कमी खर्चात उत्पादन घेऊ लागले आहेत.
फेब्रुवारी 2015 मध्ये गावातील 50 शेतकऱ्यांनी श्री श्री सेंद्रीय फळे व भाजीपाला उत्पादक गट स्थापन केला. कृषी विभागातर्फे परंपरागत कृषी विकास योजनेअंतर्गत सेंद्रीय शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. शेतकऱ्यांना ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक अशोक कांबळे, संदिप बच्छाव आणि कृषी सहाय्यक जे.के. सोनवणे यांचेदेखील चांगले सहकार्य मिळाले. सेंद्रीय शेतीसाठी आवश्यक निविष्ठादेखील शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदान तत्वावर देण्यात आल्या.
सेंद्रीय शेतीमुळे निविष्ठा आणि रासायनिक खतांवर होणारा खर्च कमी झाल्याने शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. काही शेतकऱ्यांनी व्हर्मी वॉशमध्ये लागणाऱ्या गोमुत्रासाठी गावठी गायी पाळल्या आहेत. शेतीच्या आरोग्यात सुधारणा होऊन शेतात गांडुळांची संख्या वाढली आहे. जमिनीचा पोत सुधारल्याने पिकाची गुणवत्ताही वाढली आहे.
मातीत मित्र किडींची संख्या वाढल्याने रासायनिक किटकनाशके फवारणीची आवश्यकता नाही. खर्च कमी असल्याने सोमनाथ ताजणे यांनी चार गुंठे क्षेत्रात केवळ तीन हजार खर्च करून 35 हजारावर उत्पन्न मिळविले. काही शेतकऱ्यांनी ऊस, भोपळा, द्राक्षे यासोबत आंतरपीक म्हणून कोबी, ब्रोकोली आदी पिके घेतली आहेत.
कृषी विभागातर्फे गांडुळखत, दशपर्णी अर्क, रॉक फॉस्फेटयुक्त खत, बिवेरीया बॅक्टेरिया, व्हर्डीसीलेम, नीम, दशपर्णी टाक्या, जीवामृत टाक्या, ताग, गांडुळ युनिट, धेंचा आदी निविष्टा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. महिलांनादेखील सेंद्रीय शेतीचे प्रशिक्षण मिळाल्याने त्यांचाही शेतीकामात सहभाग वाढला आहे. |
सेंद्रीय उत्पादनाच्या मार्केटींगसाठी कृषी विभागाच्या सहाय्याने इथले शेतकरी दिल्लीसह विविध ठिकाणी भेटी देऊन आले आहेत. द्राक्ष, भाजीपाला, ऊस, शेवगा, गहू, कांदा, मका अशी सेंद्रीय उत्पादने या गावातून बाजारात जात असून त्याला मागणीदेखील चांगली आहे. गेल्यावर्षी सेंद्रीय द्राक्षांना 70 रुपये दर मिळाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. मागच्या वर्षी बीक बास्केट कंपनीला उत्पादनांची विक्री करण्यात आली. सेंद्रीय उत्पादनांना वाढती मागणी लक्षात घेता या प्रकारच्या पद्धतीचा अधिकाधिक उपयोग करण्याचा मनोदय इथल्या शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.
गणेश चव्हाण- सेंद्रीय पद्धतीने शेती करताना निविष्ठांचा खर्च कमी झाल्याने उत्पन्न वाढले आहे. जमिनीचा पोतही सुधारला आहे. सेंद्रीय उत्पादनांना चांगली मागणी असल्याने उत्पन्नदेखील वाढले आहे. शाश्वत शेतीसाठी एक चांगला मार्ग यामुळे शेतकऱ्यांना उपलब्ध झाला आहे. |
-डॉ.किरण मोघे
माहिती स्रोत: महान्युज
अंतिम सुधारित : 1/29/2020