অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सोयाबीन- तूर- कपाशीला साथ उन्हाळी भुईमुगाची

अकोला जिल्ह्यात निंभारा येथील निखिल व सचिन या नानोटे भावंडांची वडिलोपार्जित दहा एकर शेती आहे. त्यात त्यांनी पारंपरिक पीकपद्धतीचा पॅटर्न निश्‍चित करून तो यशस्वी केला आहे. या पीकपद्धतीतून वर्षभर जोडल्या जाणाऱ्या उत्पन्नातून कौटुंबिक गरजा भागवत पाच एकर शेती जोडण्यात त्यांना यश आले आहे.

अशी आहे पीकपद्धती

खरिपात जूनच्या दरम्यान सोयाबीन व तूर ही आंतरपीक पद्धती असते. त्यात सहा ओळी सोयाबीनच्या व त्यानंतर एक ओळ तुरीची ठेवली जाते. सोयाबीनचे दरवर्षी एकरी 12 क्विंटलपर्यंत उत्पादन घेतले जाते. त्यातून खर्च वजा जाता 20 ते 25 हजार रुपयांचा नफा होतो. अर्थात, पिकातून मिळणारा नफा दरांवर अवलंबून असतो. सोयाबीनची गेल्यावर्षी 3000 रुपये प्रति क्‍विंटल दराने विक्री करण्यात आली. तुरीचे सोयाबीनमध्ये आंतरपीक असल्याने या पिकाच्या व्यवस्थापनावरील खर्च कमी होतो.
सोयाबीननंतर कपाशीचे पीक हाती लागते. एकूण जमीनधारणेपैकी सुमारे सहा एकरांवर बीटी कपाशीची लागवड केली जाते. लागवडीसाठी पाच बाय एक फूट अंतर निवडले आहे. दरवर्षी एकरी सुमारे 16 ते 18 क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते. दरांप्रमाणे एकरी 35 हजार ते 40 हजार रुपयांप्रमाणे या पिकातून नफा मिळतो. गेल्या चार ते पाच वर्षांत उत्पादनात सातत्य ठेवण्याचा प्रयत्न नानोटे यांनी केला आहे. कपाशीला गेल्यावर्षी 5200 रुपये प्रति क्‍विंटल दर मिळाला. कपाशीचे उत्पन्न हाती येते, त्याचबरोबर सोयाबीनमधील तुरीचे पीक हाती लागते. त्याचे एकरी तीन ते पाच क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते. रब्बीमध्ये गहू, हरभरा आदी पिकेही घेतली जातात.

भुईमूग लागवडीत सातत्य

निंभारा गावकुसातून काटेपूर्णा नदी वाहते, त्यामुळे या परिसरातील जलसाठ्यात वाढ झाली आहे. विहिरी तसेच बोअरवेलला वर्षभर पाणी राहते, त्यामुळे शेतकऱ्यांना पिकांसाठी पाण्याची सोय करणे शक्‍य होते. त्यामुळेच उन्हाळ्यात भुईमूग लागवडीत नानोटे बंधूंचे सातत्य राहते. दरवर्षी चार ते सहा एकर क्षेत्र यासाठी निश्‍चित ठेवले जाते. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात भुईमूग लावण्यात येतो. लागवडीसाठी अद्याप पारंपरिक पद्धतीचाच अवलंब होतो. भुईमूग पिकाला पाण्याची जास्त गरज राहते. चार महिन्यांच्या कालावधीत या पिकाला पाण्याच्या सोळा पाळ्या दिल्या जातात. पीक फुलोऱ्यावर असताना, शेंगा धरण्याच्या व परिपक्‍व होण्याच्या अवस्थेत असताना या पिकाची अधिक काळजी घ्यावी लागते, असे नानोटे सांगतात. या काळात पाण्याचा ताण पिकाला सोसत नाही. त्याचा थेट परिणाम पीक उत्पादकतेवर होण्याची भीती असते, त्यामुळे या पिकाच्या पाण्याचे नियोजन महत्त्वाचे ठरते.
भुईमूग पिकाचे एकरी सरासरी 12 ते 15 क्‍विंटल उत्पादन मिळते. भुईमुगाला यंदाच्या वर्षी प्रति क्विंटल 2500 ते 3200 रुपये दर मिळाला. त्यानुसार 44 हजार 800 रुपयांचे उत्पन्न झाले. पिकाच्या व्यवस्थापनावर बियाणे, खत, मजुरी व अन्य असा एकूण 16 हजार 500 रुपयांपर्यंत खर्च होतो. गेल्यावर्षी भुईमुगाला 3600 ते 4000 रुपये प्रति क्‍विंटल दर मिळाला होता.

बाजारपेठ

महान गावापासून कारंजा (जि. वाशीम) बाजारपेठ 35 किलोमीटरवर आहे. हंगामात या बाजारपेठेत भुईमुगाची मोठी उलाढाल होते. अकोला, वाशीमसह लगतच्या अमरावती जिल्ह्यातील शेतकरी देखील या बाजारपेठेत आपला माल विक्रीसाठी आणतात, त्यामुळे नानोटे बंधूंनी देखील माल विक्रीसाठी कारंजा बाजारपेठेलाच पसंती दिली आहे. विक्रीचा निर्णय घेण्यापूर्वी त्यांच्याद्वारे व्यापाऱ्यांशी संपर्क साधला जातो. या वर्षी कारंजा बाजारपेठेतील दर स्थानिक व्यापाऱ्यांकडून मिळणाऱ्या दराइतकेच असल्याचे त्यांना समजले. त्यानंतर कारंजाऐवजी त्यांनी गावापासून पाच किलोमीटरवरील महान येथील व्यापाऱ्यास माल विकणे पसंत केले.

कौटुंबिक जबाबदारी पेलली सक्षमपणे

निखिल व सचिन यांचे वडील हिंमत नानोटे यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे शेतीत काम करणे आता शक्‍य होत नाही. मात्र शेती व प्रापंचिक जबाबदारी सक्षमपणे पेलण्याचे काम दोघा भावंडांनी केले आहे. कामांची विभागाणी करून ते शेतीचे नियोजन करतात. सोयाबीन- तूर- कपाशी- भुईमूग हीच पीकपद्धती कायम ठेवत त्यांनी आर्थिक घडी स्थिरस्थावर करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यातूनच पाच एकर क्षेत्र नव्याने खरेदी केले आहे. यंदाच्या वर्षीपासून कांदा, बटाटा तसेच भाजीपाला पिकांकडे वळण्याचा त्यांचा विचार आहे. शेतातील पाणी शेतातच जिरवण्यासाठी त्यांनी मातीचे बांधही घातले आहेत.

नानोटे यांच्या शेतीची काही वैशिष्ट्ये

1) शेतीचा पोत कायम राखण्यासाठी शेणखताचा एकरी चार ट्रॉली वापर
2) शेणखताच्या उपलब्धतेकरिता दोन गाई, दोन बैल, दोन म्हशींचे संगोपन
3) पिकाला पाणी देण्याकरिता तुषार सिंचन पद्धती
4) वन्यप्राण्यांपासून पिकाचे रक्षण करण्याकरिता रात्री शेतातच निवारा
5) बीटी कपाशीच्या बाजूंनी नॉन बीटी कपाशीच्या (रेफ्युजी) काही ओळी नेहमी लावल्या जातात.
बोंड अळीमध्ये प्रतिकारक्षमता विकसित होऊ नये म्हणून या पद्धतीचा वापर
6) माती परीक्षणावर भर, त्यानुसार शेतीचे व्यवस्थापन
संपर्क- निखिल नानोटे - 9527613303

स्त्रोत: अग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate