অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

दर्जेदार द्राक्षउत्पादन

द्राक्षवेलींसाठी अन्नद्रव्यांचा पुरवठा म्हणजे द्राक्षपोषण. द्राक्षबाग व्यवस्थापनात या पोषणास अनन्यसाधारण महत्त्व आहे. द्राक्षास पुरविलेली अन्नद्रव्ये पाण्याच्या माध्यमातून जमीन- मुळे- वेल यांच्या मार्गाने प्रवास करतात. त्यामुळे वेलीची वाढ, विस्तार, पक्वता आणि उत्पादन (द्राक्ष) मिळत असते. उष्ण प्रदेशीय द्राक्षशेतीत सततची वाढ, पुढील हंगामासाठी अन्नसाठा आणि चालू हंगामातील उत्पादन असे एका वेळी तिहेरी कार्य वेल करीत असते. या सर्व गोष्टींचा समतोल राखण्यावर द्राक्षाच्या अचूक पोषणाचे यश अवलंबून असते.

सर्व बाबींचा समतोल हवा

बऱ्याचदा हा समतोल ढळतो. मग अडचणी निर्माण होतात. त्या विकृतींच्या स्वरूपात दिसून येतात. त्या सोडविण्याचा प्रयत्न केला जातो. वेळ निघून जातो. त्यात नुकसान होते. दुसरे असे की अन्नद्रव्यांचा पुरवठा बऱ्याचदा शेतकरी वेलीकडे, पिकाकडे बघून तात्कालिक ठरवीत असतात. द्राक्षपोषण हा ठरवून करण्याचा उपक्रम आहे हे आपण समजून न घेतल्याने ते घडते. त्यामुळे बऱ्याचदा अन्नद्रव्यांचा पुरवठा अंदाजाने चालतो. त्यामुळे प्रश्‍न गुंतागुंतीचे होतात. यासंदर्भात फ्रेंच संज्ञा "टेरर' ही मूलतः महत्त्वाची आहे. म्हणजे तेथील भौगोलिक परिस्थिती, जमिनीची घडण, आणि वातावरणातील घटकांचा (सूर्यप्रकाश, उष्णता, पाऊस, आर्द्रता आदी अन्नद्रव्यांच्या पुरवठ्यावर होणारा परिणाम या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. याशिवाय निचरा, अन्नद्रव्य स्थिरीकरण, वातावरणातील ऱ्हास, परस्परांमधील क्रिया आदी गोष्टींचा विचारही दुर्लक्षिण्यासारखा नसतो. सर्व बाबींचा विचार करता अन्नद्रव्ये पुरविणे हा शास्त्रीय उपक्रम (जमीन, पाणी, पाने, देठ तपासणी) असून तो समजून करावयाचा आहे ही खूणगाठ मनाशी पक्की केली पाहिजे. परंतु, हे करीत असताना उद्‌भवणाऱ्या अडचणींवर (विकृती) सतत नजर ठेवून त्यावर वेळीच उपाययोजना करणे तेवढेच महत्त्वाचे समजावे.
काही महत्त्वाचे अन्नद्रव्यांच्या वेलींतील अतिप्रमाणामुळे उद्‌भवणाऱ्या विकृती अशा. 
नत्र (Nitrogen) 
द्राक्षवेलीच्या नत्रपोषण चक्रातील वेगवेगळ्या अवस्था 
अवस्था ---- वाढीची अवस्था ---- द्राक्षमण्यांच्या वाढीची अवस्था ---- नत्रशोषणाचे विशिष्ट गुणधर्म

वाढीचा पहिला टप्पा

डोळे उमसणे ते पूर्ण फुलोरा 
डॅश 
नवीन फूट पूर्वीच्या हंगामातील अन्न साठ्यावर अंशतः अवलंबून
वाढीचा दुसरा टप्पा 
फुलोऱ्यानंतर शेंडावाढ थांबेपर्यंत 
मुळांकडून जलद शोषण, नवीन शोषलेले नत्र नवीन वाढीस पुरेसे.

काडीच्या शेंडावाढीनंतर व्हेरीजनपर्यंत (मणी नरम पडेपर्यंत) 
पाने आणि घड या दोन्हींना नत्राचा पुरवठा. मुळांकडून शोषण थांबू शकते. घड प्रमुख नत्राचे सिंक

व्हेरीजन ते काढणी

मुळे, फुटी, पाने यांच्याकडून घडांना पुरवठा 
काढणी ते त्यानंतरची अवस्था 
मुळांकडून शोषण, साठवलेल्या नत्राचा पुरवठा काड्या व पानांद्वारे 
वरील कारणांमुळे यात अडथळे आल्यास उद्‌भवणाऱ्या विकृती
1) काडीवरील डोळे मर (Bad necrosis) 
2) अर्ली बंच स्टेम नेक्रोसिस (EBSN) 
3) बंच स्टेम नेक्रोसिस (BSN) 
4) वॉटर बेरीज (waterberries) 
5) ग्लॉसी बेरीज (Glossy berries) 
6) फळांचा लाग (Fruit set)

अधिक नत्राचे द्राक्ष गुणवत्तेवर होणारे परिणाम

अधिक नत्रामुळे गोडी कमी येणे, रंगनिर्मिती आणि फेनॉलिक घटकाचे प्रमाण कमी होणे या गोष्टी घडतात. अधिक नत्रामुळे वेलीचा जोम वाढतो. तो वाढला की सावली वाढते. सावलीत नत्राचे प्रमाण वाढते. शिवाय नायट्रेट, अमोनिकल आणि सेंद्रिय स्वरूपातील नत्राच्या वितरणातही बदल होतात. देठातील नत्र हा सावलीला फार संवेदनाक्षम असतो. सावलीत फुटी व पानांत पोटॅशचे प्रमाणही वाढते. उजेडातील पानांमध्ये नायट्रेट रिडक्‍टेज या विकाराची (enzyme) क्रिया अधिक होते. त्यास नायट्रेट आणि सायटोकायनीनची आवश्‍यकता असते. तसेच मुळांमध्ये कर्बोदकांची आवश्‍यकता असते. परंतु, ग्लुटामाईन या अमिनो आम्लामुळे ती कमी होते. पानांमध्ये नायट्रेट स्वरूपातील नत्राचे प्रमाण वाढले व विशेषतः आर्द्र जमिनी, उष्णता आणि स्वच्छ प्रकाश अशी परिस्थिती असेल तर पानांतून शर्करेचे वहन कमी होते. पानांतील नायट्रेट वाढला तर मुळांमधील पिष्टमय पदार्थ कमी होतात आणि मुळांची वाढ कमी होते. प्रोलीन आणि ग्लुटामाईन या अमिनो आम्लांचा पुरवठा वाढला तसेच वापर (demand) कमी झाला तरीही नायट्रेट वाढतो. म्हणजे नुसता एकूण नत्र नाही तर नायट्रेट, अमोनिकल, अमाईड या स्वरूपातील नत्राचे प्रकारही महत्त्वाचे आहेत.

स्फुरदाचे महत्त्व

द्राक्षवेलीत ऊर्जा निर्मिती (energy metabolism) साठी, रंगीत घटकांच्या निर्मितीसाठी स्फुरदाची आवश्‍यकता असते. तसेच पेशी विभाजनासाठी पर्यायाने घडनिर्मितीसाठी स्फुरदाची गरज भासते. स्फुरदाच्या कमतरतेमुळे मॅग्नेशियमची तर स्फुरदाच्या अधिक प्रमाणामुळे झिंक व लोह या अन्नद्रव्यांची कमतरता भासते. कॅल्शियम, मॅग्नेशियम यांच्यासोबत स्फुरद अविद्राव्य घटक तयार करीत असल्याने ही दुय्यम अन्नद्रव्ये उपलब्ध होत नाहीत.

पोटॅशियमचे महत्त्व

पोटॅशियमचे प्रमाण वाढल्यास त्याचे अनेक अनपेक्षित परिणाम वेलीवर होत असतात. त्यामुळे पानांमधील कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे प्रमाण कमी होते. त्यामुळे जास्त पोटॅशियमचे अनेक दुष्परिणाम द्राक्षावर होत असतात. कारण पोटॅशचे "झायलम' आणि "फ्लोएम' या उतींमधून वहन होते, तर कॅल्शियमचे वहन फक्त झायलम उतीमधून होते. पोटॅशचे वहन व साठा सतत सुरू असतो तर कॅल्शियमचा साठा साखर भरताना थांबतो. पोटॅशियमचे प्रमाण वाढले तर अन्नघटकांचे वहन वाढते. अन्नपुरवठा करणाऱ्या पानांना पोटॅशियम पुरवले तर अन्नघटकांच्या वहनावर त्वरित परिणाम होतो. हे जरी खरे असले तरी पोटॅशियम या अन्नद्रव्याची कमतरता भासणार नाही एवढे म्हणजेच कमतरता पातळी पेक्षा थोडे जास्त प्रमाण राहील, एवढा पोटॅश पानांमधून पुरविणे त्वरित उपयोगाचे असते, परंतु जमिनीतून होणारा पुरवठाही थोडा उशिरा पण बराच उपयोगी असतो. आपल्याकडील बहुतांश बागांतील जमिनींमध्ये पोटॅशचे प्रमाण जास्त असते. त्यात प्रमाणापेक्षा जास्त पोटॅश पुरविला तर त्याचे प्रमाण वाढून वेगळा फायदा होत नाहीच, पण तोटा होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. कारण धन (+) भारीत कॅटायन पैकी पोटॅशियमचे प्रमाण पक्व द्राक्षात जास्त असते. गरापेक्षा सालीत ते तीन पटींनी जास्त असते. त्यामुळे द्राक्षरसातील मुक्त आम्ले कमी होतात आणि त्याचा सामू वाढतो. त्यामुळे मद्यनिर्मितीतीत मॅलोलॅक्‍टीक फरमेंटेशन वाढते आणि दर्जा बिघडतो. पोटॅशचा वापर अनियंत्रित असला तर द्राक्ष सालीत पोटॅशचे प्रमाण वाढून बिनरंगाच्या द्राक्षात रंगीत घटक तयार होऊन पिंक बेरीज दिसू लागतात. पोटॅशयुक्त खतांचा वापर वाढल्यावर जसे द्राक्षमण्यांमध्ये पोटॅशचे प्रमाण वाढते, त्याचप्रमाणे जमिनीत पाण्याचे प्रमाण वाढले तरीही पोटॅशचे प्रमाणात वाढ होते. यामुळे पोटॅशियमच्या प्रमाणावर कॅल्शियम, मॅग्नेशियम, सोडियम यांचे परिणामही अवलंबून असतात. अधिक प्रमाणातील लोहाचेही दुष्परिणाम द्राक्षावर होतात. पानांमधील हरित द्रव्य कमी होते. पानांवर पिवळसर तसेच करपलेले चट्टे दिसतात. उच्चप्रतीच्या दर्जेदार द्राक्षाचे उत्पादन हे सर्वस्वी त्याच्या पोषणावर अवलंबून आहे.
द्राक्षमणी हा जैविक रासायनिक कारखाना आहे. यात तयार होणारे उत्पादन हे केवळ एका घटकावर अवलंबून नसते याची कल्पना खालील रचनेवरून येईल.
जमीन हवामान मशागत व्यवस्थापन 
भौतिक, रासायनिक, जैविक 
पाऊस तापमान आर्द्रता प्रकाश वारा 
रूटस्टॉक, सायन वळण, छाटणी अंतर मशागत 
पाणी, अन्नद्रव्ये, संजीवके, विस्तार, रोग- कीड
वेलीचे शरीरशास्त्र 
फळाची घडण 
फळाचा दर्जा
यावरून असे लक्षात येते की, पोषण हा अनेक घटकांपैकी एक घटक असला तरी सर्व घटकांचा परिणाम ""दर्जेदार द्राक्ष'' हा आहे, प्रत्येक घटकाचे स्वतंत्र अस्तित्व आहे. द्राक्षपोषणाकडे या दृष्टिकोनातून बघितले तर संतुलित पोषण कसे असावे हे लक्षात येईल. 
(लेखक ज्येष्ठ शास्त्रज्ञ व अखिल भारतीय द्राक्ष बागायतदार संघाचे माजी अध्यक्ष आहेत.)
संपर्कः डॉ.ज.मा. खिलारी- 9405034809

स्त्रोत : अग्रोवन

अंतिम सुधारित : 9/28/2019



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate