অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

कच्छ

कच्छ

कच्छ

स्वातंत्र्यपूर्व भारतातील संस्थान व पाकिस्तानला लागून असलेला गुजरात राज्यातील एक जिल्हा. भूज हे कच्छचे मुख्य ठाणे आहे. क्षेत्रफळ ४५,६१२ चौ. किमी. व लोकसंख्या ८,४९,७६९ (१९७१). पूर्व-पश्चिम सु. २५६ किमी. व उत्तर-दक्षिण ५६ ते ११२ किमी. विस्ताराच्या, या द्वीपकल्पाच्या उत्तरेस व वायव्येस कच्छच्या मोठ्या रणापलीकडे पाकिस्तानचा सिंध प्रांत, पूर्वेस मोठ्या व छोट्या रणापलीकडे गुजरातच्या बनासकांठा, मेहसाणा व सुरेंद्रनगर जिल्ह्यांचे प्रदेश, आग्‍नेय भागात कच्छचे छोटे रण, दक्षिणेस कच्छचे आखात व त्यापलीकडे आणि छोट्या रणापलीकडे सुरेंद्रनगर, राजकोट व जामनगर जिल्ह्यांचे प्रदेश आणि पश्चिमेला अरबी समुद्र आहे. कच्छ हे नाव या द्वीपकल्पाचा कासवासारखा आकार तसेच खाऱ्या पाण्याचा प्रदेश किंवा कक्ष (संस्कृतमध्ये दलदल) याचा अपभ्रंश यांवरून पडले असावे. खाऱ्या पाण्याने बव्हंशी वेढलेल्या व मुख्य भूमीपासून जवळजवळ अलग पडलेल्या या प्रदेशाची भूमी उजाड व खडकाळ असून तिच्यावर मधूनमधून टेकड्याच्या रांगा, लहान लहान नद्यांची खोल गेलेली पात्रे, थोडी सुपीक खोरी व संपन्न गवताळ मैदाने आहेत. दक्षिण भागात वाळूच्या उंच तटामागे ३२ ते ४८ किमी. लांबीचा सुपीक जमिनीचा पट्टा आहे. टेकड्याच्या तीन रांगांत झुरा व वरार ही २८० मी. उंचीची शिखरे व धिनोधार हे ३१० मी. उंचीचे प्राचीन ज्वालामुखीचे अवशिष्ट शिखर आहे. उत्तरेकडच्या रणात पछम, चोरड, खादीर, बेला इ. बेटे आहेत. पछमच्या नैर्ऋत्येस किनाऱ्याला समांतर असा ११४ किमी. लांबीचा बन्नी नामक पट्टा कधीकधी भरतीच्या पाण्याखाली जातो. त्यावर गुरचराई करणारे गुराखी गवती झोपड्यातून वस्ती करतात. कच्छच्या नद्या पावसाळ्यात रणाला व आखाताला मिळतात. एरवी त्यांच्या पात्रांतून डबकी असतात. कच्छमधले एकमेव सरोवर पूर्व भागातल्या एका गोलाकार खोऱ्याला बांध घालून केलेले आहे. कच्छला भूकंपाचे धक्के वरचेवर बसतात. १८२९, १८४४, १८४५, १८६४ व १९५६ मध्ये भूकंप झाले. लिंब, बाभूळ, पिंपळ यांखेरीज येथे फारशी झाडे नाहीत. वन्य पशू, चित्ते, रानडुक्कर, वाळवंटी गाढव व ससा तसेच उंट, घोडे, बैल, गाई, म्हशी असून हिवाळ् यात हंसक व सारस पक्षी बाहेरून येथे येतात. तपमान किमान ७.८० से. व कमाल ४२.८० से. असून सरासरी वार्षिक पर्जन्य ३१.५ सेंमी. पडतो. किनाऱ्यावर वर्षभर व अंत:प्रदेशात उन्हाळ्याखेरीज हवा सुसह्य असते. एप्रिल, मे व ऑक्टोबर महिन्यांत धुळीची वादळे उठतात.

सोळाव्या शतकापर्यंत सिंध-गुजरातचे राज्यकर्ते कच्छवरही अंमल चालवीत. नवव्या शतकात सिंधमधील सम्मा राजपुतांचा कच्छशी संबंध आला. त्यांच्याच एका शाखेतील जाडेजा राजपुतांपैकी खेंगारने सोळाव्या शतकाच्या सुरुवातीस स्वायत्त संस्थान स्थापिले. राजधानी भूज येथे होती. जहांगीरने हाज यात्रेकरूंच्या कच्छी जहाजातील मुक्त प्रवासाच्या बदल्यात खंडणी माफ केली; टाकसाळीचा परवाना दिला. प्रागमल (१६९८), लाखो (१७४१) या राजपुत्रांनी गादी बळकावण्यासाठी कारस्थाने केली. लाखोने मोगलांकडून माहीमरातिबचा मानही मिळविला (१७५७). १७३० मध्ये गुजरातच्या सरबुलंदखानाने आणि १७६२ मध्ये सिंधच्या गुलामशाह काल्होराने केलेल्या स्वाऱ्यांचा यशस्वी प्रतिकार झाला. अठराव्या शतकात कलावंत रामसिंग मालम याने कलावैभव कळसाला नेले,राजकारणावर दिवाण देवकरण, त्याचा मुलगा पुंजासेठ यांचा प्रभाव राहिला. महाराव गोदजी (१७६१ - ७८) याने फौज वाढवली. व्यापाराला उत्तेजन दिले,मांडवीला ४०० जहाजांचा ताफा राहू लागला. दुसऱ्या रायधनच्या (१७७८ - १८१३) काळात बजबजपुरी माजून सत्ता समादार फतह मुहम्मदच्या हाती गेली. चाचेगिरीला पायबंद घालण्यासाठी इंग्रजांनी हस्तक्षेप करून (१८०९) कच्छला मांडलिक संस्थान बनवले (१८१६, १८१९). तहान्वये भयताना (महारावचे भाऊबंद) दिलेले महत्त्व एकोणिसाव्या शतकात भोवले. त्यांचे उत्पन्न व अधिकार महारावपेक्षाही अधिक असत. मिठाच्या निर्यातीवर बंदी, मोरवीशी अढोईसाठी शतकभर चाललेला झगडा, काठेवाडातील संस्थानांचे वाढते नाविकी महत्त्व ही कच्छच्या प्रगतीला मारक ठरली. तरी भ्रुणहत्या, गुलामगिरी (विशेषत: झांझिबारशी संबंधित), सती पध्दती यांना आळा बसला आणि शिक्षण, वाहतूक, पाणीपुरवठा इ. सुधारणा झाल्या. तिसऱ्या खेंगारने (१८७८ -१९४२) रापड,भाचौ, मुंद्र, भूज, मांडवी, अब्दासा, लखपत, अंजार, नख्तराना असे शासकीय विभाग पाडले, चराऊ कुरणे राखीव केली व कांडला बंदराचा पाया घातला. सतरावे महाराव मदनसिंहजी यांनी विलीनीकरणाला मान्यता दिली (१ जून १९४८). १९५६ पर्यंत कच्छ मुख्यायुक्ताचा प्रांत व १९६० पर्यंत द्विभाषिक मुंबई राज्याचा एक भाग होता. त्यानंतर कच्छ गुजरात राज्यात समाविष्ट झाले. १९६५ मध्ये सिंध-कच्छचा सीमाप्रश्न चिघळला आणि पाकिस्तानने कच्छवर हल्ला केला. आंतरराष्ट्रीय लवादमंडळाने रणाचा सु. ८३७ चौ. किमी. भाग पाकिस्तानला दिला. सीमांकन १९६९ मध्ये पूर्ण झाले. १९७१ च्या भारत-पाक संघर्षात भारताने यातील बहुतेक मुलूख परत मिळविला. परंतु सिमला कराराने तो परत पाकिस्तानला मिळाला.

 

संदर्भ : Williams, L. F. Rushbrook, The Black Hills, London, 1958.

ओक, शा. नि; खरे, ग. ह.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 8/3/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate