वेशीवरच्या पाऊलखुणा : म्हसरूळ
नाशिकच्या गावकुसाबाहेर वसलेले एक गाव कालांतराने शहरात दाखल झाले अन् गावाचे रूपडे पालटले. मात्र रामायण व प्राचीन इतिहासाशी या गावाचे नाते आजही कायम आहे. रामाच्या पदस्पर्शाने व सीतासरोवरामुळे ही भूमी पावन झाली. तर जैन लेणीच्या माध्यमातून हे गाव प्राचीन वारसा घेऊन पुढे जात आहे. म्हणूनच म्हसरूळला हिंदू आणि जैन धर्मीयांचे तीर्थक्षेत्र म्हटले जाते. भक्ती आणि शक्तीचे उदाहरण ठेवणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे मराष्ट्रातील पहिले मंदिर म्हसरूळमध्ये साकारण्यात आले आहे. मात्र गरज आहे, ती हा वारसा समृद्ध करण्याची.
एखाद्या गावाला भेट दिल्यावर त्या गावाचे नाव कशावरून पडले असेल, असा प्रश्न पडतो, तसाच प्रश्न म्हसरूळ गावाबाबत पडतो. म्हसरूळ म्हणजे काय? या प्रश्नाचे उत्तर गावातील ज्येष्ठ एक आख्यायिकेच्या माध्यमातून सांगतात. असे म्हटले जाते की, नाशिक गावाबाहेर असलेले म्हसरूळ या परिसरात म्हसोबाची अनेक मंदिरे होती. म्हसोबाच्या या मंदिरांकडे जाण्याची वाट हळूहळू म्हसरूळ या नावाने ओळखली जाऊ लागली. आता जेथे गाव वसले आहे, ते तेथे नव्हते. पूर्वी दिंडोरी रस्ता गावातून जाई. यामागेही अनेक अख्यायिका सांगितल्या जातात. म्हसरूळच्या ग्रामदेवतेच्या यात्रेत बोहाडा कार्यक्रम केला जातो. मात्र यात देवीचा आणि म्हशाचे (म्हसोबाचे) सोंग काढले जात नाही. पूर्वीच्या जुन्या गावठाणातील दक्षिणमुखी मारुती मंदिरासमोरून ही दोन्ही सोंगे जात असताना जुने गावठाण पेटले होते. यामुळे गाव नव्या ठिकाणी वसले, असे गावातील ज्येष्ठ सांगतात. आताचे दक्षिणमुखी हनुमानाचे मंदिर नंतरच्या काळात बांधण्यात आले. या मंदिराच्या आजूबाजूला अजूनही म्हसरूळची जुनी घरे पाहायला मिळतात. गावातील अनेक जुनी घरे कूस बदलत आहेत. गावात प्रवेश केल्यावर हनुमान मंदिर, म्हसोबा मंदिर, वज्रेश्वर माता मंदिर, पुरातन श्रीराम मंदिर व सिद्धेश्वर महादेव मंदिर ही अगदी जवळजवळ असणारी मंदिरे आपले स्वागत करतात. श्रीराम मंदिराशेजारीच सीतासरोवर आहे. म्हसरूळमध्ये राम व सीता राहिल्याचा पुराणात उल्लेख मिळतो. त्यामुळे येथील कुंडाला सीतासरोवर असे नाव पडले. जिवंत पाण्याचे झरे हे सीता सरोवराचे वैशिष्ट्य आहे. सीतासरोवर परिसर शांत आणि मनाला वेगळ्या विश्वात घेऊन जातो. मात्र सीतासरोवराच्या परिसराची विद्यमान अवस्था मात्र भीषण आहे. सरोवरालगत आणखी एक कुंड आहे. हे कुंड तर चक्क कचऱ्याने तुडुंब भरले आहे. त्यामुळे हा परिसर गलिच्छ वाटतो. गावचा हा पौराणिक वारसा जपण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. हा परिसर सुशोभित झाला, तर पर्यटकांची पावले आपोआप या परिसराकडे वळतील.
सीतासरोवरच्या लगत असलेल्या राम मंदिरात राम, सीता व लक्ष्मणाच्या आकर्षक मूर्ती आहेत. या मंदिरात राम भारतात कोठे कोठे गेले, याचा एक फलकही लावण्यात आला आहे. राम मंदिराच्या जवळच महादेव मंदिर आहे. महादेव मंदिर पूर्वी दगडाचे असावे; कारण मंदिराच्या अवतीभवती प्राचीन मूर्तीचे अवशेष विखुलेले आहेत. हनुमान मंदिरातील काही वर्षांपूर्वी भिंतीवर काढलेले श्रीरामाचे चित्र अनोखे व पाहण्यासारखे आहे. गावातून बाहेर पडताना सुमारे शंभर वर्षांचा इतिहास असणारे राजस्थानी शैलीतील श्री दिगंबर जैन मंदिर आकर्षित करते. मंदिराच्या आतील भागावर काचेचे नक्षीकाम केले असून मंदिर परिसरात तीर्थंकरांच्या अनेक मूर्ती उभारण्यात आल्या आहेत. हे मंदिर जैनांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. मंदिरासमोरच दिंडोरी रस्ता ओलांडला की, म्हसरूळचे ग्रामदैवत महालक्ष्मी मंदिर पाहायला मिळते. दरवर्षी अक्षय तृतीयेला महालक्ष्मीचा उत्सव गावात साजरा केला जातो. या मंदिरात महालक्ष्मीची सुरेख मूर्ती आहे. महालक्ष्मीचे नव्याने मंदिर बांधण्यात आले असून मंदिराबाहेर महालक्ष्मीचा लाकडी रथ आहे.
म्हसरूळ गावठाणातून बाहेर पडले की, समोरच्या डोंगरावरील चामरलेणी आकर्षित करते. चामरलेणीकडे नाशिक-पेठ रस्ता वा नाशिक-दिंडोरी रस्त्यावरूनही जाता येते. चामर लेणी हे जैनांचे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. चामरलेणी अकराव्या शतकात दक्षिणेतला राजा चामराज याने बनवली. म्हणूनच या लेणीला चामरलेणी म्हटले जाते. अनेकजण त्याचा उच्चार चांभार लेणी करतात. मात्र तो उच्चार चुकीचा आहे. बलभद्रांच्या काळात गजकुमार नावाचे मुनीराज या ठिकाणाहून मोक्षास गेल्याचे जैन बांधव सांगतात. म्हणून या ठिकाणाला गजपंथही म्हटले जाते. राष्ट्रकूटांच्या काळात राजा वीरप्पदेव याने जैन दीक्षा घेतली आणि तो आचार्य वीरसेन नावाने प्रसिद्ध झाला. त्याने नाशिकच्या चामरलेणीत विद्याकेंद्र स्थापन केल्याचा उल्लेख इतिहासात मिळतो.
जैन धर्मातल्या नऊ ब्रलभद्रांपैकी सात बलभद्र हे गजपंथ सिद्धक्षेत्रातून निरनिराळ्या तीर्थंकराच्या काळात मोक्षास गेल्याची आख्यायिका आहे. चामरलेणीच्या पायथ्याला पारसनाथांचे जैन मंदिर आहे. चामर लेणीच्या पायथ्यापाशीच क्षेमेंद्र किर्ती यांची समाधीही आहे. ही लेणी साधारण ४०० फूट उंचीवर आहे व लेणीपर्यंत जाण्यासाठी ४३५ पायऱ्या चढून जावे लागते. पायऱ्या चढून गेल्यावर इंद्र व अंबिका देवीच्या मूर्ती प्रथम दर्शनी पडतात. इथं तीन गुहा आणि एक मंदिर आहे. पहिल्या गुहेत पार्श्वनाथ भगवानांच्या तीन मूर्ती आहेत. भगवान महावीर स्वामी, गुहेच्या बाहेर भगवान नेमीनाथ, चंद्रप्रभू आणि आदिनाथ यांच्या मूर्ती पाहायला मिळतात. दुसऱ्या गुहेत शांतीनाथ, कुंथूनाथ आणि अरहनाथ यांच्यासहीत अनेक सुबक मूर्ती आहेत. तिसऱ्या गुहेत अकरा फूट उंचीची भगवान पार्श्वनाथांची पद्मासनातील अप्रतिम मूर्ती आहे. लेणीतून बाहेर पडल्यावर या डोंगराला फेरीही मारता येथे. येथून ब्रह्म्रगिरी, रामशेज, बोरगड नजरेस पडतो. तर चामरलेणीच्या कुशीत वसलेले म्हसरूळचे विहंगम दृश्यही पाहायला मिळते. चामरलेणीच्या पायथ्याच्या जैन मंदिरात प्राचीन मूर्तीचा अनोखे संग्रहालय आहे. दुर्मिळ कलाकुसरीच्या मूर्ती, भुजपत्रावरील हस्तलिखिते आणि पोथ्या, शिलालेख, ब्राँझ धातूच्या विविध मूर्ती असा मनाला मोहून टाकणारा खजिना येथे पाहायला मिळतो.
दिंडोरी रस्त्याने पुन्हा नाशिककडे परतताना छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराष्ट्रातील हे एकमेव मंदिर पाहायला विसरू नका. दीड दशकापूर्वी स्थापन करण्यात आलेल्या या मंदिरात छत्रपती शिवाजी महाराज यांची पंचधातूपासून बनविलेली ३५० किलो वजनाची मूर्ती आहे. या मंदिराने नाव शिवराम मंदिर, असे ठेवण्यात आले आहे. मंदिराच्या आत प्रवेश केल्यावर समोर सिंहासनाधीश छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नेत्रदीपक मूर्तीचे दर्शन होते. डॉ. रामचंद्र महाराज पारनेरकर यांनी देशभरात छत्रपती शिवाजी महाराजांची मंदिरे उभारण्याचा संकल्प केला. या संकल्पातील पहिले मंदिर नाशिकच्या म्हसरूळमध्ये उभारण्यात आले आहे. सीतासरोवर, जैन तीर्थक्षेत्र, छत्रपतींचे मंदिर हा म्हसरूळचा अनोखा वारसा आहे. हा जपण्यासाठी आणि अधिकाधिक पर्यटकांनी गावाकडे आकर्षित व्हावे, यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याची गरज आहे. म्हसरूळची ही सफर अनुभवताना दमला असाल, तर सोहमची मिसळ हा एक चांगला पर्याय पोटपुजेसाठी आहेच.
लेखक : रमेश पडवळ
इमेल - rameshpadwal@gmail.com
contact no : 8380098107
अंतिम सुधारित : 7/15/2020