অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

लेणीच्या कोंदणातली त्रिंगलवाडी

वेशीवरच्या पाऊलखुणा : लेणीच्या कोंदणातली त्रिंगलवाडी

एखाद्या गावाच्या दारात सुंदर रांगोळी अवतरलेली असेल अन् त्या रांगोळीच्या रंगछटांपासून गावमन कोसो दूर भरकटलेलं असल्याचा अनुभव अनेकदा येतो. मूलभूत गरजा अन्‌ विकासाशी त्रांगड असल्याने या ऐतिहासिक रांगोळीच्या सौंदर्याकडे सर्वांचच दुर्लक्ष झाल्याने हेच वैभव आपलं शक्तिस्थळ याचा विसर त्रिंगलवाडीला पडलेला दिसतो. लेणीचं कोंदण लाभलेल्या त्रिंगलवाडीचा प्रवास पुरातन अन् ऐतिहासिक असला तरी उपेक्षित ठरतो.

नाशिक परिसरातील वारसास्थळे जितकी पुरातन तितकी दुर्लक्षित असं समीकरण होऊ पाहत असल्याने पावलोपावली विखुरलेल्या वारसास्थळांची अवस्था पाहून अस्वस्थ व्हायला होतं. नद्यांवरचे प्राचीन घाट, यादवकालीन विहिरी व अहिल्याबाईंच्या बारव, जमीनदोस्त झालेल्या गढ्या, वाडे अन् कोनाड्यात पडून असल्यागत उभे असलेले, देह ठेवू पाहणारे गड-किल्ले, इतिहासाला पारख्या होत असलेल्या गाववेशी, परंपरेचा पदर सोडत जमिनीत गाडल्या जात असलेल्या वीरगळी, हेमाडपंती, नागर शैलीतील मोडकळीस आलेली जिह्याभरातील अनेक मंदिरे तसेच असंख्य मंदिरांमधील भग्न झालेल्या अन्‌ सौंदर्याने ओतपोत सजलेल्या भग्न मूर्ती तसेच तपश्चर्येचा इतिहास सांगणाऱ्या असंख्य समाधींकडे, त्याच्या इतिहासाकडे झालेल्या दुर्लक्षाचा फटका लेणीचे कोंदण व गडकिल्ल्यांच्या वैभव लाभलेल्या त्रिंगलवाडीलाही सोसावा लागतो आहे. बौद्धांप्रमाणे जैनांनीही आपल्या धर्माच्या प्रचारार्थ देशाच्या वेगवेगळ्या भागांत जैन साधूंना पाठवत धर्मप्रसाराचे कार्य केले. जैन लेण्यांत तीर्थंकर व जैन दैवतांची शिल्पे दिसतात. मात्र, त्यातील सहजाविष्कार जाणवत नाही. त्रिंगलवाडीच्या लेणींवर बौद्ध व ब्राह्मणी लेण्यांची छाप जाणवते. मात्र त्रिंगलवाडी ग्रामस्थांच्या मते ही लेणी पांडवलेणी आहे. पांडवांनी बोटांच्या नखांनी डोंगर कोरून ही लेणी खोदल्याचे ते सांगतात अन् त्याचे वय हजारोवर्ष असल्याचे ते सांगतात.

टाके

मुंबई-आग्रा महामार्गावर नाशिकहून घोटीचा टोलनाका ओलांडला की, उजव्या हाता लागणारे पहिले गाव म्हणजे टाके. टाके या गावाला घोटीटाके असेही म्हटले जाते. महाराणा प्रतापांनंतर राजस्थान व उत्तर भारतातून विस्थापित झालेला आग्री समाज टाके गावात स्थिरस्थावर झाला. यांना आग्री अन्‌ आगळी असेही म्हटले जाते. त्यावेळी आजूबाजूच्या ग्रामस्थांनी या समाजाला वेगळे टाकले असावे, म्हणून त्यांच्या वस्तीला टाकून दिलेले गाव म्हणून टाके नाव पडले असावे, असे अर्जून आडोळे सांगतात. टाके गाव मोठे असले तरी येथे फक्त मारूतीचे एकमेव मंदिर आहे. त्यामुळे हनुमान जयंती एवढाच उत्सव गावात होतो. तर गावाला सहा वेसदेव आहेत. यात यळोबा, वाघोबा, माऊल्याआई, बडेबुवा, शंकर अन्‌ म्हसोबा या गावाच्या रक्षणकर्ते असल्याचे पूनजा आडोळे व कोंढाजी आडोळे सांगतात. मारूती मंदिराशेजारी काही विरगळी आहेत.

त्रिंगलवाडीत कसे पोचाल ?

टाकेगावातून त्रिंगलवाडीकडे जाणाऱ्या रस्त्याने निघाले की पुढे बलायदुरी व त्यानंतर पारदेवी हे गाव लागते. तेथून दोन तीन किलोमीटरवर त्रिंगलवाडी धरणाच्या कवेत वसलेले गाव लागते.

त्रिंगलवाडीचे वैभव

त्रिंगलवाडीचे वैभव अशासाठी वेगळे आहे की, त्याच्या आजूबाजूला भास्करगड, उतवड, ढोऱ्या डोंगर, वैतरणा धरणाजवळील डोंगररांगा, कसारा घाटाचा प्रदेश, कळसूबाई, अलंग-मदन-कुलंग अन्‌ त्रिंगलगडाचा सहवास या गावाला लाभला आहे. त्रिंगलवाडी हे गाव पत्र्याचा पाडा, तळ्याचा पाडा अन्‌ निशाणवाडी या तीन वाड्यांनी बनलेले आहे. त्यामुळे याला त्रिंगलवाडी म्हटले गेले असावे, असे तुकाराम पारधी सांगतात. आदिवासीबहुल असलेल्या गावात ठाकूर व कोळी समाज राहतो. तळ्याच्या वाडीत गाडी लावून पाण्याने भरलेल्या तळ्याच्या डावीकडून गावाच्या आधाराला पहुडलेल्या त्रिंगलगडाकडे जाता येते. गडाच्या पायथ्याला सहा तर गडाच्या कपारीत दोन लेणी आहेत. येथे घोटीपासून इतक्या आत लेणी का बांधली असावी असा प्रश्न अनेकांना पडतो. मात्र पूर्वी नालासोपारा-कल्याण-कसारा-अंजनेरी (नाशिक) हा व्यापारी मार्ग होता. आजही याच्या खाणाखुणा पहायला मिळतात. या व्यापाऱ्यांकडून लेणीसाठी दाने दिली जायची म्हणून येथे ही लेणी कोरलेली दिसते. इंग्रजांमुळे व पुढे धरणांमुळे या मार्गात बदल झाले. त्यामुळे व्यापारी मार्गावर त्रिंगलगड हा टेहळणीचे ठिकाण असावे. नंतरच्या काळात या टेहळणी डोंगराचा किल्ला म्हणून वापर झाला.

जैनांनी महाराष्ट्रात आठव्या शतकात लेणी बांधायला सुरुवात केली. त्यातील त्रिंगलवाडी ही शेवटच्या टप्प्यातील म्हणजेच शके १२६६ मध्ये कोरल्याचे लेणीतील शिलालेखातून दिसते. म्हणजेच ही लेणी १३ व्या शतकातील असल्याचे दुर्ग अभ्यासक सुदर्शन कुलथे सांगतात. तळ्याच्या वाडीकडून डाव्या अंगाच्या पायवाटेने एक किलोमीटर शेतातून गेल्यावर गडाच्या पायथ्याच्या कातळात कोरलेले अद्भुत लेण पाहिलं की नवल वाटायला लागतं. लेणीच्या बाहेर भग्न अवशेषांचा खच पडलेला दिसतो. ही वास्तू केंद्रीय पुरातत्त्व विभागाच्याअंतर्गत असल्याने परिसरात स्वच्छता दिसते; मात्र कोणताही फलक दिसत नाही. त्यामुळे पर्यटकांना ही लेणी कोणती व तिचे महत्त्व लक्षात येत नाही. त्रिंगलगडाच्या पायथ्याजवळची मुख्य लेणी आयताकार आहे. लेणीचा व्हरांडा, सभामंडप आणि गाभारा असे तीन भाग आहेत. व्हरांडा लांबलचक असून, द्वारशाखेपूर्वी छतावर सुशोभित छताच्या तुळ्या हातात हात गुंफलेल्या गण-यक्षांनी पेलल्याची शिल्प मन मोहून टाकते. हे शिल्प कसे घडविले असेल हा प्रश्न त्या कलाकारांच्या मेहनतीला आणि चिकाटीला सलाम करतो. तर उजव्या बाजूला कातळात फूल कोरले आहे. छताला आधार देण्यासाठी कोरलेले खांब आता पडले असून, वरची बाजू फक्त शिल्लक आहे. त्यावर यक्ष दिसतात. व्हरांड्याच्या आतील भागात नक्षीकाम आहे. सभामंडपाच्या प्रवेशद्वारावर नक्षीकाम करण्यासाठी जसे पाच सुशोभित चौकटी एकात एक गुंफून त्यावर नाजूक काम केले असावे. हे करताना त्या कलाकारांना हे करताना किती कालावधी लागला असेल हा प्रश्न त्यांच्या प्रतिभेचे कौतुक करतो. व्हरांड्यात उजव्या व डाव्या बाजूला चौकोनी आकाराच्या बसण्यासाठी जागा दिसते. तर द्वारपट्टीवर दोन चौकटी तीर्थंकरांच्या मूर्ती व गणांची देखणी शिल्पे आहेत. ललाटपट्टीवर खंडित झालेली गजलक्ष्मीची प्रतिमा तर प्रवेशद्वाराच्या हातील बाजूस लाकडी दरवाजांसाठी खोबणी असल्याचे दिसते. म्हणजेच लेणीला पूर्वी लाकडी दरवाजांची व्यवस्था असावी. लेण्यांचा सभामंडप प्रशस्त आहे. लेणीच्या मुख्य मंडपाला सालंकृत असे चार स्तंभ होते. त्यापैकी फक्त एकच खांब आता शिल्लक असून, त्याच खांबावर लेणी उभी आहे. त्यावर सुंदर नक्षी आहे. उरलेल्या खांबांचा स्तंभशीर्षाचे अलंकृत हस्त (ब्रॅकेट्‌स) अजूनही पहायला मिळतात. त्यावरील यक्ष अजूनही लेणीला उचलून आधार देत असल्याचे पाहता येते. हा आविष्कार अनुभवण्यासारखा आहे. हे यक्ष नसते तर लेणीचा महाकाय दगड अंगावर आला असता असे वाटायला लागते. सभामंडपात हवा आणि उजेड येण्यासाठी नऊ चौकोनी झरोके असलेल्या दोन खिडक्या कातळात कोरलेल्या आहेत. गाभाऱ्याच्या प्रवेशद्वारावर नक्षी कोरलेली आहे. त्रिंगलवाडीच्या लेणीत बौद्ध लेणींप्रमाणे कलेचा मुक्त आविष्कार दिसत नसला तरी जैन लेणीतील स्तंभांवरची सजावट, त्यांना दिलेले विविध आकार, छतावरची कामे, वेलबुट्टी, भौमितिक आकार जैन कलाकारांचे वैशिष्ट्‌य दाखवून देते. गाभाऱ्यात जैन धर्मीयांचे प्रथम तीर्थंकर भगवान आदिदेव ऊर्फ वृषभनाथांची पद्मासनात बसलेली मूर्ती असून, मूर्तीच्या आसनावर दानाचा शिलालेख कोरलेला आहे. मात्र तो आता झिजला आहे. हा शिलालेख प्राकृत संस्कृत असून, नागरी लिपीत आहे. त्रिंगलवाडी लेणी अपूर्ण व पडक्या अवस्थेत असली तरी तिचे सौंदर्य पर्यटकांना मोहिनी घालते. गडावरही दोन लेणी असून, त्याही भग्नाअवस्थेत आहेत.

त्रिंगलगड आणि इतिहास

ऐतिहासिक त्रिंगलगडही भग्नाअवस्थेत आहे. पडक्या वाड्याचे अवशेष, कातळातील तुटलेल्या पायऱ्या, कातळात कोरलेले प्रवेशद्वार व पाच फुटाची हनुमानाची मूर्ती, बुरजांचे अवशेष पहायला मिळतात. हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात केव्हा आला ते कळत नाही. पण १६८८ च्या शेवटी मोघलांनी फितुरीने हा किल्ला मराठ्यांकडून जिंकून घेतला. १८१८ साली पेशवाई बुडाल्यावर मराठ्यांनी पुन्हा प्रतिकार करू नये म्हणून इंग्रजांनी तोफा डागून व सुरूंग लावून हा किल्ला उद्धवस्त केला. हा किल्ला कोणी बांधला व त्रिंगलगडाच्या पराक्रमाच्या नोंदी मिळत नसल्या तरी हा किल्ला टेहळणी चौकची काम करीत असल्याचे दिसते. कळवण तालुक्यातील मार्केंडेय पिंपरी येथील मूळचे असलेले कवि जयराम पिंड्ये यांच्या ‘पर्णाल-पर्वत-ग्रहणाख्यान’ या काव्यात त्रिंगलवाडीचा उल्लेख आलेला दिसतो.

अलंकुरंगतिंगलवाटिका नामथोध्दतम् |

अहिवंतोऽचल गिरिर्मार्कण्डेयाभिधानकः॥

१६८८ मध्ये मुघलांनी फितुरी घडवून हा किल्ला मराठ्यांकडून घेतला. मातब्बरखानाने औरंगजेबाला

पाठविलेल्या पत्रात त्रिंगलवाडीला वेढा घातल्याचा उल्लेख मिळतो. पेशवे काळात त्रिंगलवाडीने आपला दबदबा कायम ठेवल्याचे दिसतो, असे दुर्ग अभ्यासक सुदर्शन कुलथे सांगतात. त्रिंगलवाडी ताब्यात घेतल्यानंतर कॅप्टन ब्रिग्ज यावर एक रिपोर्ट लिहिला होता. यातून या गडाबद्दल चांगली माहिती मिळते. १८१८ ला पेशवाई अस्तानंतर ब्रिग्जने जे किल्ले ताब्यात घेत उद्धवस्त केले. यात त्रिंगलवाडीचाही समावेश होता. १६३६ पासून हा किल्ला शहाजी महाराज व छत्रपती शिवाजींच्या ताब्यात असल्याचे त्याने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. कॅ. ब्रिग्जनेही येथील लेणीचे सौंदर्य अनुभवल्याचे त्याने म्हटले आहे.

त्रिंगलवाडीचे बोहाडे आणि इतर उत्सव

लेणीचे कोंदण असलेल्या त्रिंगलवाडी गावचे मूळ वैभव आहे ते बोहाडे. चैत्रात निशाणवाडीत होणारे बोहाडे तिन्ही वाड्या अन् आजूबाजूंच्या गावांसाठी उत्सुकतेचा विषय असतो. गावात संप्तश्रृगी देवी ही गावची ग्रामदैवता आहे. तर हनुमान हा संरक्षणकर्ता, असे शांताराम शेलार सांगतात. होळी, पोळा, हनुमान जयंती व दिवाळी हे उत्सव त्रिंगलवाडीकर जल्लोषात साजरे करतात. १९८२ मध्ये धरण झाल्यावर पाण्यासाठी कासावीस झालेल्या त्रिंगलवाडीला ओलावा मिळाला अन् बागायती शेतीमुळे आर्थिक स्थैर्यही मिळाले. भात, विविध डाळी, नागली ही पिके घेणारे त्रिंगलवाडीकरांना बेंजू अन् कापडनाथ ही आदिवासी वाद्ये वाजवायला आवडतात. मात्र ऐतिहासिक वैभव लाभलेल्या त्रिंगलवाडी विकासापासून अजूनही वंचित असून, निशाणवाडीला स्वातंत्र्यानंतर सत्तर वर्षे उलटूनही रस्ता अन् वीज अजूनही मिळालेली नाही. हा उपेक्षितपणा सोबत घेऊन त्रिंगलवाडीकर गावात येणाऱ्या पर्यटकांचे स्वागताला सज्ज असते. लेणीचे कोंदण मिळाले आता विकासाचेही कोंदण मिळाले तर धन्य होऊ, अशी प्रतिक्रिया त्रिंगलवाडीकर व्यक्त करताना दिसतात. त्रिंगलवाडीच्या ऐतिहासिक वारशाला विकासाचे कोंदण लाभले तर हे लेण जगभर पोहचेल.

लेखक : रमेश पडवळ

rameshpadwal@gmail.com

contact no : 8380098107

 

अंतिम सुधारित : 8/25/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate