२७ नक्षत्रामधील शेवटचे नक्षत्र म्हणजे रेवती नक्षत्र. शेवटचे नक्षत्र म्हणून शेंडेंफळ या अर्थाने खरेतर या नक्षत्राचा आकार लहान असायला हवा. परंतु प्रत्यक्षात मात्र या नक्षत्राने आकाशात विस्तीर्ण जागा व्यापली आहे.
आकाराने जरी हे नक्षत्र मोठे असले तरी ते शोधण्यासाठी एखाद्या नवख्या निरीक्षकास मात्र फार त्रास होतो. कारण या नक्षत्रातील सर्वच तारका मंदतेज आहेत. उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या थोडे पुढे दक्षिणपूर्व दिशेस पाहिल्यास आपणास वृषभ राशी प्रमाणे इंग्रजीतील 'व्ही' (V) आकाराचा एक फिकट तारकासमूह आढळेल. परंतु या व्हीचा आकार फार मोठा आहे व थोड्याशा तिरप्या अवस्थेत तो आपणास दिसतो. हेच रेवती नक्षत्र.
रेवती नक्षत्राचा समावेश मीन राशीमध्ये होतो. अगदी पुरातन काळापासून बॅबिलोनियन, पर्शियन आणि ग्रीक या संस्कृतीच्या लोकांनी ता विशिष्ट तारकासमुहास मत्स्याची कल्पना केली आहे. एका ग्रीक कथेनुसार व्हिनस आणि त्याचा मुलगा क्युपिड हे दोघे युफ्रेटिस या नदीच्या काठाने जात होते. त्याच वेळी टायफून नावाची एक राक्षसी त्यांच्यावर चालून आली. तिच्यापासून वाचण्यासाठी या पिता-पुत्राने स्वतःला युफ्रेटिसच्या पात्रात झोकून दिले आणि मासळीचे रूप धारण केले. मिनर्व्हा या देवतेने त्यांना आकाशात स्थान दिले.
या तारकासमुहाचे निरीक्षण केल्यास आपणास आढळेल की या तारकांच्या दोन विशिष्ट दोर्या तयार झाल्या आहेत. तसेच या दोर्या एका बाजूस मिळालेल्या आहेत तर दुसर्या बाजूकडील या तार्याच्या दोरीचे तोंड एकमेकांपासून दूर गेलेले आहेत. या दूर गेलेल्या दोन्ही टोकांच्या शेवटी आपणास काही तारे जवळजवळ आढळतील. त्यांनाच माश्यांची कल्पना केली आहे व या दोन माश्यांना दोन दोर्यांच्या साहाय्याने बांधून ठेवल्याची एक आकृती या रेवती नक्षत्रामध्ये आढळते.
आपल्या येथे देखिल पुराण कथांमध्ये रेवती नक्षत्रासंबंधी एक कथा आढळते. आपला मुलगा हूड आणि व्रात्य निघाला याचे ऋत्वाक मुनींना दुःख होते. जातक शास्त्राचे तज्ज्ञ गर्ग मुनींनी त्यांचे दुःख ऐकून मुलाचे जातक पाहिले आणि त्यांच्या मुलाच्या दुर्गुणांचे कारण म्हणजे त्याचा रेवती नक्षत्रावरील जन्म असे सांगितले. त्यावेळेस ऋत्वाक मुनींनी रेवतीला स्थानभ्रष्ट होण्याचा शाप दिला. रेवती नक्षत्र आकाशातून निखळून जमिनीवर पडली. जिथे पडली तिथे मोठा हादरा बसला आणि सरोवर तयार झाले. त्या सरोवरात जलरुपात राहणार्या रेवतीला पुढे मुलगी झाली. या मुलीचे पुढे दुर्गम नावाच्या राजपुत्राशी लग्न ठरले तेव्हा तिने रेवती नक्षत्रावर लग्न लावण्याचा प्रेमळ हट्ट धरला. तिचे पालन करणार्या प्रमुख ऋषींनी तो मान्य केला. म्हणजेच रेवती शापमुक्त होऊन आकाशात स्थानापन्न झाली.
रेवती नक्षत्राला खगोलशास्त्रात व कलगणनेत विशेष महत्त्व आहे ते संपात बिंदूमुळे. वसंत संपात बिंदू रेवती नक्षत्रात आहे. याच अर्थ असा की, खगोलीय विषुववृत्त व आयनिकवृत्त या नक्षत्रात एकमेकांना छेदतात. या दिवशी सूर्य आयनिकवृत्तावरून सरकत रेवती नक्षत्रावर आला की तो आपोआप आकाशाचे दोन समांतर भाग करणार्या खगोलीय विषुववृत्तावरही येतो. त्यामुळे या दिवशी (२२ मार्च) दिवस रात्र समान बारा बारा तासांची असतात.
माहिती स्रोत: अवकाशवेध.कॉम
अंतिम सुधारित : 1/30/2020
हस्त नक्षत्राच्या थोडे पुढे पाहिल्यास आपणास एक सुं...
२७ नक्षत्राची सुरुवात अश्विनी नक्षत्राने होते.
पुष्य नक्षत्राच्या बाजूलाच पाच थोड्याशा फिकट चांदण...
दक्षिणेच्या बाजूने झुकलेला हा तारकासमूह म्हणजे अनु...