অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

बहमनी सत्ता

बहमनी सत्ता

(इ. स. १३४७-१५३८). मध्ययुगात द. भारतात स्थापन झालेली एक मुसलमानी सत्ता. चौदाव्या शतकात द. भारतावर दिल्लीच्या मुहंमद तुघलकाचा अमंल होता. त्याच्या विरूद्ध इ. स. १३२७ पासून बंडाळीला सुरूवात झाली होती. ती शमविण्यासाठी मुहंमद तुघलक याने दक्षिणेतील अमीरांना विश्र्वासघाताने ठार मारण्याचा कट रचला; पण तो उघडकीस येऊन सुलतानाने पाठविलेल्या दूतासच ठार मारण्यात आले (इ. स. १३४५) आणि अमीरांनी आपला पुढारी अमीर जफरखान ऊर्फ ⇨हसन गंगू (कार. १३४७-५८) याला दोलताबाद येथे राज्याभिषेक केला (१३४७). त्याने अबुल मुझफ्फर अलाउद्दीन बहमनशाह हे नाव धारण करून ३ ऑगस्ट १३४७ रोजी बहमानी राज्याची स्थापना केली. त्याच्या मूळ घराण्यविषयी तसेच नावाबद्दल इतिहासकारांत एकमत नाही. बुर्हान-इ-मआसिर व तबकात-इ- अकबरी या ग्रथांनुसार इस्फंदयारचा मुलगा बहमन त्याचा हसन गंगू हा मुलगा. हे दोन्ही ग्रंथ फिरिश्ता (१५५० - १६२३ ?) पूर्वी लिहिले गेले; तरी फिरिश्ताच्या मते बहमन हा इराणचा प्राचीन राजा असून त्याच्या वंशातील हसन गंगू होता. काहींच्या मते हसन गंगूचा मालक ब्राह्मण होता, म्हणून त्याने बहमन हे नाव धारण केले असावे.

हसन गंगूने आपली राजधानी दौलताबादहून गुलबर्म्यास नेली. राज्यात सर्वत्र स्थिरस्थावर करून त्याने स्थानिक बंडे शमविली. त्यांपैकी बहुतेक मोहिमांचे त्याने स्वतः नेतृत्व केले. एकदोन पराभव वगळता उर्वरित स्वार्यां त त्याने जय मिळविला. त्याने प्रशासनाच्या सोयीसाठी राज्याची चार सुभ्यांत विभागणी केली आणि प्रत्येकावर एक स्वतंत्र अधिकरी नेमला. तो ११ फेब्रुवारी १३५८ मध्ये मरण पावला.

त्याच्यानंतर त्याचा ज्येष्ठ मुलगा पहिला मुहंमदशाह (कार. १३५८-७५) गादीवर आला. गुलबर्गा सुभ्याचा अधिकारी आणि मुख्य वजीर मलिक सैफुद्दीन घोरी याची मुलगी सुलताना हिच्याबरोबर त्याने विवाह केला. मलिक सैफुद्दीन बहुश्रुत होता. त्याने राज्यशास्त्रावर एक ग्रंथ लिहिला होता. त्याने सुभ्यांची पुनर्रचना लष्करी तत्त्वांऐवजी मुलकी तत्त्वांवर केली आणि प्रशासनात काही सुधारणा केल्या. मुहंमदाला या सुमारास विजयानगर व तेलगंण येथील राजांबरोबर लढावे लागले. या संघर्षात कुणाचीच सरशी झाली नाही. नव्या मुसलमानी सत्तेचे वाढते सामर्थ्य हेच या संघर्षाचे कारण होते. मुहंमदशाह कलाप्रेमी व विद्वानांचा चाहता होता. गुलबर्गा किल्ल्यातील जामा मशीद आणि शहरातील शाहबजार दर्गा व उस्मानाबादमधील हजरत शमसुद्दीनची कबर ह्या वस्तू त्याच्या कलाप्रेमाची साक्ष देतात.

मुहंमदशाह २१ एप्रिल १३७५ रोजी मरण पावला आणि त्याचा मोठा मुलगा अलाउद्दीन मुजाहिद (कार. १३७५-७८) हा गादीवर आला. त्याने तत्काळ विजयानगरवर आक्रमण केले (१३७८); पण बहमनी सैन्याला पराभव पतकरून नामुष्कीने माघार घ्यावी लागली. परतताना वाटेत १६ एप्रिल १३७८ रोजी मुजाहिदशाहचा खून झाला. त्यामुळे झालेल्या गडबडीचा फायदा मुजाहिदचा चुलतभाऊ दाऊद (कार. १६ एप्रिल १३७८-२१ मे १३७८) याने त्याच दिवशी तख्त बळकाविले; परंतु लवकरच मृत सुलतानाची बहीण रूह-ए-परवर हिने बादशाहचा खून घडवून आणला (२१ मे १३७८) आणि मुहंमदशाहचा पुतण्या दुसरा मुहंमद (कार. १३७८-९७) याला तख्तावर बसविले.

त्याने पुन्हा मलिक सैफुद्दीन घोरी याचीच राज्याच्या मुख्य वजीरपदी नेमणूक केली. मुजाहिदशाहच्या कारकीर्दीत विजयानगर बरोबर सुरू झालेला संघर्ष अजून मिटला नव्हता. या संघर्षात मुहंमदशाहलाही यश लाभले नाही. त्याच्या कारकीर्दीतील विशेष घटना म्हणजे माळवा, गुजरात आणि खानदेश येथील नव्या राज्यांचा उदय आणि उत्तरेचा दक्षिणेकडील राजकारणावर असलेल्या प्रभावाचा अस्त. आपल्या चुलत्याप्रमाणेच हा शिक्षणप्रेमी आणि विद्वानांचा चाहता होता. त्याच्या कारकीर्दीत गुलबार्गा, बीदर, कंघार, एलिचपूर, दौलताबाद, जुन्नर, चौल आणि दाभोळ ही नगरे कलाविद्यांची केंद्रस्थाने बनली; तसेच इराण, इराक आणि अरबस्तान यांतून मोठ्या संख्येने परदेशी मुसलमान दक्षिणेत आले आणि पुढील दोनशे वर्षे दक्षिणेतील राजकारणावर त्यांनी आपला प्रभाव पाडला. मुहंमदने आपला मोठा मुलगा धियासुद्दीन याची निवड वारस म्हणून केली होती. तो मुहंमदाच्या मृत्यूनंतर गादीवर आला (२० एप्रिल १३९७).

त्याची कारकीर्द अल्पकाळच टिकली. धियासुद्दीन याने इराणी उमरावांना प्राधान्य दिल्याने तुर्की उमरावांपैकी तघलचीन याने सुलतानाला आपल्या मुलीच्या नादी लावून कैद करविले (१४ जून १३९७) आणि त्याचा सावत्र भाऊ शमसुद्दीन दुसरा दाऊदशाह यास गादीवर बसविले (जून १३९७). तघलचीनकडे राज्याचे अधिकार सोपविण्यात आले. या घटना तख्तावर हक्क सांगणाऱ्या फिरोझखान आणि अहमदखान या धियासुद्दीनच्या चुलत भावांना न पटणाऱ्या होत्या. त्यांनी या सत्तांतरास विरोध करण्याचे ठरविले; पण तघलचीनपुढे त्यांचा टिकाव लागला नाही. पुढे त्यांनी तघलचीनच्या विरोधकांशी संगनमत करून दरबारात सक्तीने प्रवेश केला. तघलचीन आणि त्याच्या दोन मुलांना ठार मारले (१३९७).

शमसुद्दीन याचे डोळे काढण्यात आले. फिरोझखान याने ताजुद्दीन फइरोझ (कार. १६ नोव्हेंबर १३९७ – २२ सप्टेंबर १४२२) या नावाने स्वतःला राज्याभिषेक करून घेतला. बहमनी राज्यात जी उलथापालथ चालली होती, तिचा फायदा राज्याच्या अंतर्गत व बाह्य शत्रूंनी घेतला. मांडव्याच्या सुलतानाच्या मदतीने राज्यावर आक्रमण करणाऱ्या खेडल्याच्या नरसिंगदेवरायाचा मोड करताना खुद्द बहमनींच्या फौजांचा पराभव होण्याची वेळ आली होती; पण नरसिंगदेवरायाचा पराभव करण्यात अखेर फिरोझशाहला यश आले (१३९८).

विजयानगरबरोबरचा कलह हाही धुमत होता. १४०७ मध्ये फिरोझशाहाने विजयानगरवर चाल केली. दोन्ही राज्यांत तात्पुरता तह झाला; पण काही वर्षांनी बहमनींनी पुन्हा विजयानगरविरूद्ध आक्रमण केले. यावेळी बहमनी सैन्याचे अतोनात नुकसान होऊन फिरोझशाहला माघार घ्यावी लागली (१४१७-२०). त्याने आपला मुलगा हसन याला वारस नेमले. फिरोझशाहचा भाऊ अहमदखान याने गादीसाठी हक्क सांगितला, तेव्हा फिरोझशाहने त्याला पकडण्याचा हुकूम दिला; परंतु अहमदखानने त्याच्यावर चालून आलेल्या सैन्याचा पराभव केला आणि युद्धभूमीवर स्वतःला राज्याभिषेक करून घेतला (२२ सप्टेंबर १४२२). फिरोझशाहने नाईलाजाने सत्तात्याग केला. या घटनेनंतर ३ ऑक्टोबर १४२२ रोजी फिरोझशाह मरण पावला. बहमनी घराण्यातील एक विद्वान आणि व्यासंगी सुलतान म्हणून तो प्रसिद्ध होता. त्याला अनेक भाषा अवगत होत्या व अनेक विषयांत तो पारंगत होता. त्याच्या कारकीर्दीत व्यापार-उदीम यांची भरभराट झाली. चौल आणि डभई झाली. चौल आणि डभई ही दोन बंदरे आयातनिर्यात व्यापाराची केंद्रे बनली. इतर सर्व गुणांत श्रेष्ठ असलेला हा सुलतान मनाने अतिशय भोकड होता. ⇨तैमूरलंगाची हिंदुस्थानवर स्वारी होणार, अशी अफवा उठताच त्याने तैमूरशी राजनिष्ठा व्यक्त केली.

आपल्या राजवटीला गुलबर्ग्यात धोका आहे, असे वाटून पहिला अहमदशाह (कार. १४२२-३६) याने आपली राजधानी बीदर येथे हलविली (१४२४), बीदरचे नाव बदलून मुहंमदाबाद असे ठेवण्यात आले. राज्य मिळविण्याच्या कामात त्याच्याबरोबर सहभागी असणाऱ्या खलफ हसन बसरी याची मुख्य वजीराच्या जागेवर नेमणूक करून त्याला मलिक-उत्-तुज्जार हा किताब दिला. अहमदशाहच्या कारकीर्दीत प्रथमच बहमनींचा गुजरात, माळवा आणि खानदेश या राज्यांच्या सुलतानांबरोबर संघर्ष ओढवला. प्रथम अहमदशाहने विजयानगरचा सूड घेण्याचे ठरवून त्यावर चाल केली (१४२३). विजयानगरच्या राजाने खंडणी देण्याचे कबूल केल्यावर दोन्ही राज्यांत तात्पुरता तह झाला. यानंतर अहमदशा-हने तेलंगणावर स्वारी करून नलगोंडच्या राजाचा पराभव केला आणि तेलंगणाचा सुभेदार म्हणून खान-इ-आजम याची नेमणूक केली.

अशा प्रकारे दक्षिणेकडे आपली सत्ता स्थिर करण्यात बहमनींना यश आले; तरी राज्याच्या उत्तर विभागात मात्र त्यांची सत्ता स्थिर झाली नव्हती. ती स्थिर करण्याच्या उद्देशाने अहमदशाहने १४२६ मध्ये माहूरच्या राजा-विरूद्ध चाल केली. ही स्वारी अयशस्वी झाली पण पुढे तिसऱ्या स्वा-रीच्या वेळी त्यांचा मोड करण्यात आला (१४३६). पुढे खेडल्याचा नरसिं-गदेव याने माळव्याच्या सुलतानाबरोबर संगनमत करून बहमनींनी खंड-णी देण्याचे नाकारले. अहमदशाहने ६,००० फौज घेऊन खेडल्यावर चाल केली. तेव्हा माळव्याचा होशंगशाह याने ३०,००० फौज घेऊन खेडल्याच्या दिशेने कूच केले. बहमनी फौजांनी केलेल्या हल्ल्यात माळव्याच्या होशंगशाहचा पूर्ण पराभव झाला.

होशंगशाहने रणांगणातून पलायन केले. नरसिंगदेवही शरण आला. या संघीचा फायदा घेऊन आणि आपले स्थान मजबूत करण्यासाठी अहमदशाहने खानदेशचा सुलतावन नासिरखान फारूकी याच्या मुलशी विवाह करून फारूकी घराण्याशी नाते जोडले (१४२९). पुढे त्याने गुजरातच्या सुलतानाबरोबर .युद्ध केले (१४३०). गुजरातच्या एका मांडलिक राजाने बंड करून अहमदशाहकडे मदत मागितली. मदत करणाऱ्या बहमनी फौजेचा गुजरातच्या फौजांनी पूर्ण पराभव केला. इतकेच नव्हे तर बहमनी फौजेच्या मदतीला आलेल्या खानदेश आणि माळव्याच्या फौजांचा देखील माणिकपुंज घाटात मोड करण्यात गुजरातच्या फौजांना यश आले. पुढे अहमदशाहने प्रचंड सैन्य घेऊन गुजरातच्या सरहद्दीकडे कूच केले. दोन्ही सुलतानांत चौल येथे तह होऊन दोन्ही राज्यांनी परस्परांच्या कारभारात हस्तक्षेप करावयाचा नाही, असे ठरले. याच सुमारास माळव्याच्या होशंगशाहने खेडल्यावर हल्ला करून नरसिंगदेवाला ठार मारले (१४३४). अहमदशाहने आपले सैन्य घेऊन माळव्याच्या रोखाने चाल केली; पण खानदेशच्या मध्यस्थीने दोन्ही सुलतानांत तह झाला (१४३४-३५).

तहाच्या अटीनुसार खेडल्याचा ताबा माळव्याकडे गेला. वरील घटना होत असतानाच राज्याच्या इतर भागांत विशेषतः तेलंगणात राजमहेन्द्रीचा प्रमुख दोडचा अल्ला; वेलमा यांची बंडे उद्-भवली. या बंडांचा बीमोड अहमदशाहने केला. त्याने आपला मोठा मुलगा अलाउद्दीन अहमद (कार. १४३६- ५८) याला वारस नेमून गादीवर बसविले (१७ एप्रिल १४३६). त्यानंतर लवकरच १४ जुलै १४३६ रोजी अहमदशाहचे निधन झाले. अहमदशाहच्या कारकीर्दीत अनेक महत्त्वाच्या घटना घडल्या : त्याने राजधानीत रूग्णालय उभारले; त्याच्या काळात परदेशी मुसलमानांचे फार मोठ्या प्रमाणावर आगमन झाले. पूर्वी येऊन स्थायिक झालेले मुसलमान आणि नव्याने आलेले मुसलमान यांचे आपापसांत कधीच पटले नाही. अहमदशाह हा स्वतः विद्वान आणि सुसंस्कृत होता. त्याने सर्व स्तरांतील व्यक्ती आणि विद्वान यांना आश्रय दिला.

अलाउद्दीन अहमदशाहपुढे दोन समस्या होत्या : दरबारातील जुन्या नव्या मुसलमानांतील (अफाकी-दख्खनी किंवा शिया-सुनी) संघर्ष मिटविणे आणि परकीय आक्रमणांना तोंड देणे. त्याची संपूर्ण कारकीर्द विजयानगर, तेलंगण, गुजरात, खानदेश आणि माळवा या राजांबरोबर झगडण्यात गेली. विजयानगरबरोबरचा पहिला संघर्ष विजयानगरच्या देवरायाने खंडणी देण्याचे कबूल केल्यामुळे मिटला.

दरम्यान त्याचा भाऊ महमूद याने बंड केल्याची बातमी आली (१४३६). तेव्हा विजयानगरच्या राजाच्या मदतीने रायचूर,सोला-पूर, नळदुर्ग आदी ठिकाणे त्याने काबीज केली व कृष्णातीरावर स्वतःला राज्याभिषेक करून घेतला (१४३६). यावर अलाउद्दीन अहमदने स्वतः सैन्य घेऊन महमूदवर चाल केली आणि त्याचा पराभव केला (१४३६). अलाउद्दीनशाहचा मुख्य वजीर दिलावरखान याने कोकणवर यशस्वी स्वारी केली (१४३६). बहमनींचा आता संघर्ष ओढवला तो खानदेश-बरोबर. त्याला कारण म्हणजे सुलतान अलाउद्दीन याने खानदेशच्या सुलतानाची मुलगी-आपली पहिली बायको, हिचा संगमेश्वराच्या राजाच्या मुलाशी विवाह करून घेतलेला घटस्फोट, हे होते. यावर खानदेशच्या सुलतानाने वऱ्हाडावर स्वारी करून तो प्रांत आपल्या ताब्यात घेतला (१४३६-३७). त्याला गुजरातचा सुलतान व गोंडवनचा राजा यांनी पाठिंबा दिला होता. सुलतानने नवागत मुसलमानांकडे मोहिमेची सर्व सूत्रे सोपविली. मलिक-उत्-तुज्जार खलफ हसन याने मोहिमेची तयारी केली. दोन्ही फौजांची गाठ रोहनखेड येथे पडून बहमनींनी विजय मिळाला. खलफ हसन याला मिळालेल्या विजयामुळे नवागतांचे पारडे जड झाले. त्यानंतर विजयानगरबरोबर खंडणीच्या निमित्ताने बहमनींना युद्ध करावे लागले.

दोन्ही सैन्यांत अखेर तह झाला. बहमनींना विजयानगरबरोबर समझोता केल्याखेरीज गत्यंतर नव्हते. विजयानगरने खंडणी देण्याचे कबूल केले; पण प्रत्यक्षात त्यांनी खंडणी कधीच दिली नाही आणि पुढे या कारणासाठी सुलतान अलाउद्दीन याने ओरिसाचा राजा कपिलेंद्रदेव याच्याशी संगनमत करून विजयानगरवर आक्रमण केले; तेव्हा त्याला लांछनास्पद पराभव पतकरावा लागला (१४४३). कोकणात बहमनी सत्तेस खड्या सैन्याअभावी कधीच पाय रोवता आला नाही. तेव्हा खलफ हसन याने प्रथम राजा शंकरराव शिर्के याचा पराभव करून त्याच्या साहाय्याने संगमेश्र्वर जिंकण्याच्या हेतूने कूच केले. शंकररावाने बहमनी सैन्याला फसवून संगमेश्र्वरच्या राजाला बहमनी सैन्यावर चारी बाजूंनी तुटून पडण्याचा निरोप पाठविला. खुद्द खलफ हसन ठार झाला (१४४७). वरील दुर्घटनेमुळे पुन्हा एकदा नवागत आणि जुने मुसलमान यांच्यामधील तेढ वाढली. नवागतांनी जुन्या मुसलमानांना कोकणच्या स्वारीवरील अपयशाला जबाबदार धरले आणि सुलतानाच्या कानावर जुन्या मुसलमानांनी कसा दगा दिला, हे सांगण्यासाठी जासूद रवाना केले; पण त्या अगोदरच जुन्या मुसलमान पक्षाच्या पुढाऱ्यांनी सुलतानाचे कान नवागतांविरूद्ध भरविले. सुलतान त्या वेळी बेहोष अवस्थेत होता.

सुलतानाने कोकणच्या स्वारीवरून परत आलेल्या सर्व नवागतांची कत्तल करण्याचा हुकूम दिला (१४४८). जुन्या मुसलमानांनी चाकणला वेढा दिला आणि विश्र्वासघाताने बहुतेकांची कत्तल केली. फक्त कासिम बेग हा काही अनुयायांसह निसटून राजधानीत येऊन पोहोचला. त्याने सुलतानाकडे जाऊन घडलेल्या गोष्टींची इत्थंभूत माहिती त्याला दिली. तेव्हा सुलतानाने जुन्यांवर सूड उगविला. कासिम बेगला मुख्य वजीराचे जागी नेमून मलिक-उत्-तुज्जार हा किताब देण्यात आला. जुन्या आणि नवगत मुसलमानांमधील हा संघर्ष पुढाल काळात वाढतच गेला आणि त्यातच बहमनी राज्याचा शेवट झाला. सुलतान अलाउद्दीनचा मेहुणा जलालखान याने तेलंगणात बड करून स्वतःला राज्याभिषेक करून घेतला (१४५६) आणि कट करून सुलतान महमूद खज्जीची मदत मागितली. महमूदाने मुबारकखान फारूकी याला या कारस्थानात सामील करून घेऊन १४५६ मध्ये बहमनी राज्याची सरहद्द ओलांडली. अलाउद्दीनने जवळजवळ १८,००० फौज घेऊन कूच केले. महमूदाने अखेर माघार घेतली. नवागतांपैकी महमूद गावान याच्याकडी जलालखानाने बंड मोडण्याची कामगिरी सोपविण्यात आली. आपला मुख्य आधार गेला आहे, हे पाहताच जलालखान गावानला शरण आला. यानंतर सुलतान मरण पावला (३ एप्रिल १४५८). अलाउद्दीनची संपूर्ण कारकीर्द अंतर्गत बंडाळी आणि बाह्य आक्रमणे यांत खर्ची पडली.

अल्लाउद्दीनच्या मृत्यूनंतर गादीवर आलेल्या हुमायून (कार. १४५८-६१) आणि निजामुद्दीन यांच्या राजवटी अल्पकाळ टिकल्या. हुमायूनच्या राज्यारोहणाला एक सरदार शाह हबीबुल्ला याचा विरोध होता. त्याने हुमायूनचा धाकटा भाऊ हसन याला गादीवर बसविले (१४५८); परंतु हुमायूनने सैन्य जमवून हसनला पदच्युत केले आणि त्याच्या पुरस्कर्त्यांना कैदेत टाकले (१४५८). हुमायूनने ख्वाजाजहान महमूग गावान याची नेमणूक वकील-ए-सल्-तनत म्हणून केली. हुमायून गादीवर आल्यावर तेलंगणाचा सिपहसालार सिकंदरखान याने बंड केले; पण त्याचा मोड करण्यात आला. सिकंदरखानच्या बंडात वेलम राजांनी त्याची बाजू घेतली होती. त्यांना शासन करण्यासाठी हुमायूनने ख्वाजाजहान व निजामुल्मुल्क यांचा रवानवगी केली; पण त्यांचा पराभव झाला (१४५९). हुमायूनने तेलंगणात स्वतः कूच केले (१४६०); पण त्याचा फारसा उपयोग झाला नाही. दरम्यान राजपुत्र हसन याला सिंहासनावर बसविण्याचा शाह हबीबुल्ला ह्याने प्रयत्न केला पण तो फसला. हसनला पुन्हा एकदा कैद झाली (१४६०). हसन आणि त्याच्या साथीदारांना हालचाल करून ठार करण्यात आले.

यानंतर ४ सप्टेंबर १४६१ रोजी हुमायूनचा खून झाला. क्रूरकर्मा म्हणून त्याची इतिहासात ख्याती आहे. त्यानंतर त्याचा अल्पवयीन मुलगा निजामुद्दीन (कार. ४ सप्टेंबर १४६१-३० जुलै १४६३) गादीवर आला. सुलतान अज्ञान असल्यामुळे राजमाता नर्गिस बेगम, ख्वाजाजहान तुर्क आणि महमूद गावान या त्रयीने राज्यकारभार चालवावा, असा निर्णय घेण्यात आला. सुरूवातीलाच बहमनींना ओरिसाच्या गजपती कपिलेश्र्वर याच्या आक्रमणाला तोंड द्यावे लागले (१४६१). त्यानंतर माळव्याच्या सुलतान महमूद खल्जी याने उचल खाल्ली (१४६१). गजपती कपिलेश्र्वर आणि खानदेशचा सुलतान यांजबरोबर संगनमत करून महमूद खल्जीनेबहमनी राज्यावर आक्रमण केले (१४६२). तिन्ही राज्यांच्या संयुक्त फौजा बीदरपासून सु. ३२ किमी. वर येऊन ठेपल्या. दोन्ही फौजांची गाठ कंधार येथे पडली. महमूद खल्जीचा तीत विजय झाला. महमूद खल्जीने ताबडतोब बीदरचा किल्ला आणि वऱ्हाड, बीड व दौलताबाद हे विभाग ताब्यात घेतले. अशा परिस्थितीत सुलतानच्या वतीने गुजरातच्या महमूदशाहला मदत पाठविण्याबद्दल विनंती करण्यात आली. महमूदशाह दक्षिणेच्या राजकारणात हस्तक्षेप करण्याच्या संधीची वाटच पहात होता. बहमनी आणि गुजरात यांच्या संयुक्त सैन्याबरोबर तोंड देणे जड जाईल, म्हणून महमूद खल्जीने माघार घेतली (१४६३). यानंतर १४६३ मध्ये पुन्हा एकदा महमूद खल्जीने मागील इतिहासाची पुनरावृत्ती करून बहमनी सैन्याचा पराभव केला. बहमनींनी गुजरातच्या महमूदशाहकडे मदतीची याचना केली. गुजरातचे सैन्य येत आहे, असे कळताच महमूद खल्जी माघारी फिरला. बहमनींची स्थिती गुजरातच्या मांडलिक संस्थानासारखी झाली होती; मात्र बहमनींना पुन्हा पूर्वीचे वैभव काहीसे प्राप्त झाले. निजामुद्दीन याच्या मृत्यूनंतर (१४६३) त्याचा धाकटा भाऊ तिसरा मुहंमद (कार. १४६३ — ८२) गादीवर आला. तो केवळ ९-१० वर्षाचा होता. बहमनींच्या दरबारात आता महमूद गावानशिवाय दुसरा कर्ता मुत्सद्दी उरला नव्हता. खुद्द सुलतान व राजमाता यांनादेखील ही जाणीव झाली. १४६६ मध्ये सुलतानाने एक फतवा काढून ⇨ महमूद गावानला वकील-ए-सल्-तनत हे पद दिले व राज्याचे सर्वोच्च अधिकार त्याच्या स्वाधीन केले. या पदावर तो १४८१ म्हणजे मरेपर्यंत होता. तिसरा निजामुद्दीन याचा मृत्यू व ख्वाजाजहान या सरदाराचा खून यांचाफायदा घेऊन माळव्याच्या महमूद खल्जीने पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला; परंतु खेडल्याच्या लढाईत बहमनी सेनापती मलिक युसूफ तुर्क याने माळव्याच्या सैन्याचा पराभव केला (१४७०). सतत चाललेल्या युद्धाला दोन्ही बाजू कंटाळल्या होत्या. अखेर बहमनी आणि खल्जी यांच्यामध्ये कायम स्वरूपाचा तह झाला. या तहानुसार वर्हालडचा ताबा बहमनींकडे आला आणि खेडल्याचा माळव्याकडे गेला. महमूद गावानने लगतची हिंदू आणि मुसलमान राज्ये यांच्यात सामोपचाराचे धोरण ठेवून वातावरणात एक प्रकारचा समतोल साधण्याचा प्रयत्न केला. यानंतर त्याने पश्र्चिम किनारपट्टीकडे मोहीम काढून तो भाग मिळविला. खेळणा, संगमेश्र्वर, विशाळगड इ. ठाणी ताब्यात घेऊन त्याने बहमनींचा कोकणपट्टीवर अंमल बसविला. १ फेब्रुवारी १४७२ रोजी बहमनी फौजांनी गोव्याचा कब्जा घेतला. कोकणपट्टीवरील विजय आणि शेजारच्या हिंदु-मुसलमान राजांशी सीमातंट्याबाबत सलोख्याचे धोरण, यांमुळे बहमनी राज्याला एक निश्र्चित दिशा आणि स्वरूप प्राप्त झाले होते. महमूद गावानच्या (table)

खुनानंतर बहमनी सत्ता कमकुवत झाली. परदेशी अमीर राजधानीत राहण्यास नाराज होते. ते आपापल्या प्रदेशांत परत फिरले. त्यांपैकी काही युसूफ आदिलखानला मिळाले. मुहंमदशाहने हसन निजामुल्मुल्क याला मलिक-ए-नायब करून राज्याची सर्व सूत्रे त्यांच्या हाती दिली. अखेरच्या दिवसांत गावानच्या खुनाचा त्याला पश्र्चात्ताप झाला. दारूच्या व्यसनातच त्याचा अंत झाला. त्याचा अल्पवयीन मुलगा शिहाबुद्दीन महमूद (कार. १४८२—१५१८) गादीवर आला; पण प्रत्यक्षात सर्व सत्ता कासिम बरीद या मलिक-ए-नायबच्या हाती होती. राज्याभिषेकाच्या दिवशी दख्खनी मुसलमानांनी आदिलखानला मारण्याचा कट रचला. तो उघडकीस आला. त्यातूनच पुढे सु. एक महिना बीदरमध्ये अनागोंदी माजली.

आदिलखानने विजापूरला जाण्याचे मान्य केले; तथापि मलिक-ए-नायबची कारकीर्द फारशी सुखावह झाली नाही व त्याचा बीदरच्या अंबिसिनियन राज्यपालाकडून खून झाला (१४८६). यामुळे पुन्हा परदेशी मुसलमानांचे वर्चस्व दरबारात वाढले. त्यांनी सुलतानच्या खूनासाठी कट रचला; पण तो फसला. यानंतर महमूदशाहने राज्यकारभारातील लक्ष काढून घेतले आणि शासनाची सर्व जबाबदारी कासिम बरीद या तुर्की मुख्यमंत्र्यावर टाकली. तेव्हा प्रांतीय राज्यपालांनी त्यास विरोध केला. मलिक-ए-नायबचा मुलगा मलितक अहमद निजामुल्मुल्क याने दुहीचे बीज पेरले. महमूदशाह बहमनीने राज्यातील दुफळी मिटविण्याचा प्रयत्न केला. महमूदशाहनंतर दुसरा अहमद (कार. १५१८—२१), अलाउद्दीन (कार. १५२१—२२), बलिउल्ला (कार. १५२२—२५) व कलिमुल्ला (कार. १५२५—२७) हे चार सुलतान गादीवर आले; पण ते नामधारी होते आणि खरी सत्ता अमीर बरीदकडे होती. अखेर १५३८ मध्ये ⇨ बरीदशाही, ⇨ इमादशाही, ⇨निजामशाही, ⇨आदिलशाही आणि ⇨

कुत्वशाही या पाच स्वतंत्र शाह्या निर्माण होऊन बहमनी सत्ता संपुष्टात आली.

बहमनी घराण्याचा अमंल संपूर्ण दक्षिण भारतावक किंवा म-हाराष्ट्रावर कधीच नव्हता. दक्षिणेकडील अनेक हिंदू व मुसलमान राज्यां-पैकी ते एक राज्य होते. सर्वकष अशी सत्ता त्यांना कधीच उपभोगता आली नाही. त्यांच्या राज्याचे स्वरूप लष्करी होते. त्यांच्या सैन्यात

एतद्देशीयांबरोबर परकीय मुसलमानांचा भरणा होता. त्यामुळेच पुढे परदेशी व दख्खनी असा वाद निर्माण झाला आणि परदेशी मुसलमानांचे मोठ्या प्रमाणावर आगमन झाले. साहजिकच सत्ता नवागतांच्या ताब्यात गेली. त्यातही शिया व सुन्नी असे दोन पंथ होते आणि धर्मातरात खूपच भर पडली. अहमदनगर व वर्हानड येथील शाह्यांचे संस्थापक मूळचे हिंदू होते. या राज्याच्या दक्षिणेमधील संस्कृती, शिल्प आणि समाजजीवन यांवर मोठ्या परिणाम झाला. फार्सी भाषेला त्यांच्या दरबारात प्राधान्य मिळाले.

राज्यव्यवस्था

हसन गंगूने प्रशासकीय व्यवस्थेसाठी राज्याची चार सुभ्यांत विभागणी करून प्रत्येकावर एकेक राज्यपाल नेमला. या सुभ्यांना पुढे पहिल्या मुहंमदाच्या वेळी (कार. १३५८-७५) तरफ म्हणत आणि त्याच्या राज्यपालांना तरफदार म्हणत, आपापल्या प्रांतांत हे सर्वाधिकारी असत. लष्कर व नागरीव्यवस्था त्यांच्याकडे असे. ते सारा गोळा करीत आणि तेथील सैन्याचे नेतृत्व करीत. मध्यवर्ती सुलतान प्रभावी असेपर्यत ही तरफदारी पद्धत व्यवस्थित चालली. फिरोझशाह बहमनीच्या वेळी (कार. १३९७-१४२२) गुलबर्ग्याहून राजधानी बीदर येथो हलविण्यात आली, तेव्हा या पद्धतीत काही किरकोळ फेरफार झाले. बादशाह हा सर्वोच्च न्यायाधीश, राज्यकर्ता, प्रशासक व सेनापती होता. इस्लामी धर्माप्रमाणे तो देवाचा प्रेषित आहे, असा दावा मुजाहिदशाह (कार. १३७५-७८) याने केला होता. बहमनी राजांनी तात्त्विक दृष्टया अब्बासो खलीफांचे [→ अब्बासी खिलाफत] वर्चस्व मानले होते. त्याप्रमाणे त्यांच्या तख्तावर काळी छत्री आणि नाण्यांवर खलिफांचा उजवा हात असे. राज्याचे सर्व प्रशासन मंत्रिमंडळातर्फे चालत असे. राज्याचे सर्व प्रशासन मंत्रिमंडळातर्फे चालत असे. मुख्य मंत्र्याला वकील-ए-सलतनत म्हणत. अर्थमंत्र्याला अमीर-इ-जुम्ला, तर परराष्ट्र व्यवहार पाहणाऱ्या मंत्र्यास वझीर-इ-अश्रफ हे बिरूद्ध होते. यांशिवाय वझीर-इ-जहान, सद्र-इ-जहान व पेशवा ही आणखी काही पदे असत. सद्र-इ-जहान याच्याकडे न्यायदान व धार्मिक बाबी सोपविलेल्या असत. कोतवाल व नाझर हे नागरी व्यवस्थेसाठी दुय्यम अधिकारी असत.

वरील व्यवस्थेत तिसऱ्या मुहंमदशाहच्या वेळी त्याचा मुख्यमंत्री महमूद गावान याने आमूलाग्र बदल केले. त्याने राज्याचे विभाजन आठ सरलष्करांत (सुभ्यांत) केले. तरफदारांची बदली तो एका सुभ्यातून दुसऱ्या सुभ्यात करीत असे. एवढेच नव्हे,तर काही तरफदार हे मंत्रीही असत. उदा., ख्वाजाजहान हा तेलंगणचा राज्यपाल, तसेच महमूद गावान हा अमीर-इ-जुम्ला आणि वझीर-इ-अश्रफ या दोन्ही पदांवर काम करीत असे. पुढे तरफचे उपविभाग करण्यात आले. त्यांना सरकार म्हणत. त्यांचे पुन्हा परगणे पाडत. ही प्रशासकीय व्यवस्था सुरूवातीची काही वर्षे ठीक चालली; पण गावानच्या मृत्यूनंतर व विशेषतः मध्यवर्ती सत्ता कमजोर बनताच, राज्यपालांचे वर्चस्व वाढले आणि अखेरीस हे राज्यपाल स्वतंत्र होऊन बहमनी राज्याचे पाच स्वतंत्र शाह्यांत रूपांतर झाले.

कला

बहमनी राजांच्या वेळी वास्तुशास्त्र, शिल्प, वाङ्-मय, सुलेखनकला इत्यादींत प्रगती झाली. त्याची माहिती सय्यिद अली तबातबा, निजामुद्दीन, फिरिश्ता, अँथानाशिअस न्यिक्यितीन (रशियन प्रवासी), खाफीखान इत्यादींच्या लेखनांतून मिळते. अँथानाशिअस न्यिक्यितीन हा रशियन प्रवासी काही वर्षे (१४६९-७४) बीदरला होता. त्याने तेथील वास्तूंबरोबरच दैंनदिन जीवनाची माहितीही लिहिली आहे. त्याच्या मते बीदर हे एक समृद्ध शहर होते. बहमनी काळात दौलताबाद, गुलबर्गा व बीदर अशा तीन राजधान्या आलटून पालटून होत्या. या शहरांतून तसेच आसपासच्या भागांत अनेक राजवाडे, मशिदी,थडगी व इमारती बांधण्यात आल्या. त्यांच्या शैलीत त्यांचे खास वेगळेपणा नाही; त्यांनी इराणी शैलीचे अनुकरण केले. धार्मिक वास्तूंव्यतिरिक्त इतर बांधकामात त्यांनी हिंदू कल्पना उचलल्या आणि एक मिश्रवास्तुशैली निर्माण केली. त्यांपैकी अनेक वास्तू अवशिष्ट काहींवरील कलाकाम-विशेषतः सुलेखन, जाळीकाम-विलक्षण आकर्षक आहे. बीदर येथील महमूदशाह अलवालीचा तख्तमहाल, हजार कोठारी नौवताखाना, शस्त्रागार, वीरसंगय्या मंदिर इ. वास्तू विशेष उल्लेखनीय आहेत.

गुलबर्ग्याच्या मूळ किल्ल्यांत बहमनी सुलतानांनी फेरफार करून तो अधिक मजबूत केला. सुरूवातीच्या वास्तूंच्या बांधकामात दिल्लीच्या तुघलक घराण्याची छाप दिसते; परंतु पहिल्या मुहंमदाने इराणी शैलीचा वापर करून मन्सूर-अल् कझवीनी या इराणी वास्तुविशारदाच्या मदतीने जामा मशीद बांधली. भव्यता, कलाकुसर व सुलेखन यांमुळे ती भारतातील एक नामांकित मशीद समजली जाते. तिला मीनार नाहीत; पण ६८ घुमट आहेत. तसेच गुलबर्ग्याच्या पूर्व-पश्र्चिमेस राजघराण्यातील व्यक्तींची तुघलकीनशैलीत बांधलेली थडगी आहेत. पुढे फिरोझशाहच्या वेळी हिंदू कल्पना वास्तूंत आल्या. त्याने मीमेच्या काठी फिरोझाबाद हे नवीन शहर वसवून तेथे एक उन्हाळी राजवाडा बांधला; पुढे बीदरला राजधानी नेल्यानंतर तेथील जुन्या किल्ल्यात लष्कराच्या दृष्टीने अनेक सुधारणा करण्यात आल्या आणि एकापेक्षा एक भव्य असे पाच दरवाजे बांधण्यात आले. या दरवाजांचे सुशोभन, भौमितिक रचनाबंध आणि सुलेखन यांनी केले आहे.

तसेच किल्ल्याच्या भोवती खंदक खणण्यात आला होता. येथील वास्तूंतत तख्तमहाल, शाह बुरूज, लालबाग, सोळा कुंभ मशीद इ. प्रसिद्ध आहेत. अहमदशाहच्या वेळी बंदा नवाझ या साधूंचे थडगे गुलबर्ग्यात बांधण्यात आले. त्याची भव्य कमान पुढे दुसऱ्या अहमदाच्या काळात बांधली गेली. पहिला अहमद याने तख्त-इ-किर्मानी नावाची मदरसा बीदर येथे बांधली. यांशिवाय बीदरचा निमताबाद राजवाडा व दौलताबाद येथील चार मीनार, तसेच पंधराव्या शतकातील बीदर येथील गगन, तर्कश, चिनी, नागीन इ. महालांचे बांधकाम बहमनी काळातच झाले. हा बहमनी कलेच्या उत्कर्षाचा काळ होता. यावेळी महमूद गावान याने बीदरमध्ये एक भव्य मदरसा बांधली. किल्ल्याच्या दरवाजांवर चकचकीत फरशा बसविल्या. या काळाती काही सचित्र हस्तलिखिते उपलब्ध झाली आहेत. फिरोझशाहने दौलताबाद येथे हाकीम हसन व सय्यिद मुहंमद (काझीरून) या गीलान (इराण) येथील दोन प्रसिद्ध ज्योतिषज्ञांच्या मार्गदर्शनाखाली वेधशाळा बांधण्याचे काम सुरू केले होते.

दक्षिणेतील बहमनी सत्तेचा काळ हा लढाया आणि अंतर्गत संघर्ष, तसेच परकीय व दख्खनी मुसलमान यांमधील झगड्यांचा काळ होता; तथापि काही सुलतानांनी कला क्षेत्रात केलेली प्रगती विशेषतः सुलेखनकला आणि त्यांनी बांधलेल्या वास्तू व सुरू केलेल्या मदरसा यांमुळे मागे ठेवलेली सांस्कतिक ठेवा वैशिष्टयपूर्ण आहे.

 

संदर्भ : 1. Government of Karmataka, Bidar District Gazetteer, Bang-alore, 1977.

2. Majumdar, R. C. Ed., The Delhi Sultanate,Bombay, 1972.

3. Sherwani, H. K.; y3wuohi, P. M. Early History of Medieval Deccan, Vols. I & II, Hyderabad, 1973-1974.

4. Yazdani, Gulam, Bidar : Its History and Monuments, Hyderabad, 1947.

५. कुंटे, भ. ग. भाषां. बहमनी राज्याचा इतिहास, मुबंई,१९६६.

कुंटे, भ. ग.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 5/26/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate