(१८ जानेवारी १७९३-४ ऑक्टोबर १८४७). महाराष्ट्रातील एक सद्गुणी,प्रजाहितदक्ष पण दुर्दैवी राजा. हा छत्रपती दुसरा शाहू (कार. १७७७-९८) व आनंदीबाई यांचा थोरला मुलगा. छत्रपती शाहूनंतर साताऱ्याच्या गादीवर आला. सवाई माधवराव (कार. १७७४-९५) पेशवेपदावर असताना नाना फडणीस मुख्य कारभारी होता आणि छत्रपती पहिला शाहू यांनी स्वहस्ते लिहून दिलेल्या दोन याद्यांप्रमाणे मराठी राज्याचे पुढारीपण पेशव्यांकडे आले होते, तरी सवाई माधवरावाने छत्रपतिपदाची प्रतिष्ठा सामान्यतः राखली; परंतु दुसरा बाजीराव (कार १७९५-१८१८) पेशवेपदी आल्यावर त्याने हळूहळू छत्रपतिपदाचा अवमान करण्यास प्रारंभ केला व अखेरीस छत्रपती प्रतापसिंहांना त्याने प्रायः सातारच्या किल्ल्यात नजरकैदेत टाकले. हे सहन न होऊन छत्रपतींचा सेनापती चतुरसिंग भोसले याने पेशव्यांविरुद्ध बंड केले (१८०९).
ते बंड पेशव्यांतर्फे सेनापती बापू गोखले याने मोडले पण त्यामुळे दुसऱ्या बाजीरावाने प्रतापसिंहाची नजरकैद अधिकच कडक केली. त्या वेळचा इंग्लिश रेसिडेंट मौंट स्ट्यूअर्ट एल्फिन्स्टन याने या परिस्थितीचा फायदा घेऊन दुसऱ्या बाजीरावाशी युद्ध सुरू केले. हे करताना त्याने प्रकटे केले, की ‘मी छत्रपतींना पेशव्यांच्या जाचातून सोडविण्याचा प्रयत्न करीत आहे. मला पेशव्यांचे राज्य बुडवावयाचे असून छत्रपतींची सत्ता राखावयाची आहे.’ परिणामतः अष्टी (सोलापूर जिल्हा) येथे झालेल्या शेवटच्या इंग्रज-मराठे लढाईत (१८१८) प्रतापसिंह इंग्रजांच्या सैन्याबरोबर होते. पेशवाईच्या अस्तानंतर एल्फिन्स्टनने प्रतापसिंह यांना छत्रपतींच्या गादीवर पुन्हा नेऊन बसविले.
एल्फिन्स्टनने प्रतापसिंहांशी तह करून त्यांच्या अनेक वाजवी हक्कांत काटछाट केली; तरी साताऱ्यात नेमलेल्या ग्रँट डफसारख्या रेसिडेंटने साताऱ्याची राजकीय व्यवस्था लावून प्रतापसिंहास सुशिक्षित आणि सुसंस्कृत केले, राज्यकारभारात उत्तजेन दिले व राज्यात शिस्त आणली. प्रतापसिंहांनी सातारा शहरात अनेक सुधारणा केल्या : शहरात नवा राजवाडा, जलमंदिर यांसारख्या काही वास्तू बांधल्या; शहराला पाणीपुरवठा व्हावा म्हणून यवतेश्वर डोंगरावर तलाव खोदून खापरी नळाने गावात पाणी आणले तसेच मुलांच्या शिक्षणासाठी पाठशाळा काढली आणि तीमधून संस्कृत-मराठीबरोबर इंग्रजी भाषेच्याही अध्ययनाला उत्तेजन दिले; छापखाना काढून अनेक उपयुक्त ग्रंथ छापविले. याशिवाय मराठा तरुण-तरुणींना लष्करी शिक्षण देण्यास प्रारंभ केला. त्यांत महाराजांची कन्या गोजराबाईही होती.
या लोकहितवादी राजाच्या कार्यक्षम प्रशासनाविषयी ग्रँट डफने गव्हर्नरकडे शिफारस केली. तेव्हा त्यांच्या काही अधिकारांत ईस्ट इंडिया कंपनीने ५ एप्रिल १८२२ च्या जाहीरनाम्याने वाढ केली. ग्रँट डफ हा रेसिडेंट म्हणून प्रतापसिंहाच्या दरबारी १८१८-२२ दरम्यान होता; त्याने या काळात मराठ्यांच्या इतिहासाची साधनसामग्री जमा करून पुढे हिस्टरी ऑफ द मराठाज हा ग्रंथ लिहिला (१८२६). एल्फिन्स्टनची कारकीर्द संपल्यावर इंग्रजांचे प्रतापसिंहाविषयीचे एकूण धोरण बदलले. मुंबईचा गव्हर्नर रॉबर्ट ग्रँट (कार. १८३५-३८) याने कर्नल ओव्हान्स या रेसिडेंटच्या सांगण्यावरून प्रतापसिंहांचे राज्य बुडविण्यासाठी हीन वृत्तिनिदर्शक अनेक कटकारस्थाने रचली.
शेवटी इंग्रजांविरुद्ध कट केल्याचा खोटा आरोप लादून ४ सप्टेंबर १८३९ रोजी त्यांना पदच्युत करून त्यांचा धाकटा भाऊ आप्पासाहेब (शहाजी) यास नामधारी छत्रपती म्हणून सातारच्या गादीवर बसविले व काशीला (बनारस) प्रतापसिंहांना स्थानबद्धतेत राजकुटुंबासह ठेवण्यात आले. प्रतापसिंहानी ईस्ट इंडिया कंपनीचे डायरेक्टर व ब्रिटिश पार्लमेंट यांपुढे रंगो बापूजी गुप्ते यांस इंग्लंडमध्ये पाठवून व इंग्लंडमधील काही प्रतिष्ठित इंग्रजांमार्फत आपली सत्य बाजू मांडण्याचा खूप प्रयत्न केला; पण यश आले नाही. अखेर रंगों बापूजी परत येण्यापूर्वीच काशी येथे प्रतापसिंह स्थानबद्धतेत मरण पावले.
आप्पासाहेबाच्या मृत्यूनंतर सातारा संस्थान दत्तक वारस नामंजूर करून खालसा करण्यात आले (१८४८).
संदर्भ : 1. Basu B. D. Story of Satara, Calcutta, 1922.
२. ठाकरे, केशव सीताराम, प्रतापसिंह छत्रपति आणि रंगो बापूजी, मुंबई, १९४८.
खरे, ग. ह.
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 10/7/2020