অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

त्वचारोग आणि आयुर्वेद

त्वचाविकार

आयुर्वेदाच्या दृष्टीने अनेक त्वचारोग हे आंतरिक दोषांचे बाह्य स्वरूप आहेत. यासाठी काही पथ्येही सांगितली आहेत. एक सर्वसाधारण नियम म्हणजे दूध, मिठाई यांच्याबरोबर आंबट पदार्थ खाऊ नयेत असा आयुर्वेदाचा सल्ला आहे. दूध-खिचडी, दूध-मासे हे पदार्थही एकत्र घेणे वर्ज्य आहे. मीठ व खारट पदार्थांवरही नियंत्रण आवश्यक आहे. लोणचे, खारवलेल्या मिरच्या, सांडगे, शेवया, इत्यादी पदार्थ या दृष्टीने कमी खावेत. अशी काळजी घेतल्यास त्वचारोग लवकर नियंत्रणात येतात असा अनुभव आहे. ठेवल्यावर आपोआप पाणी सुटणा-या दही, गूळ, इत्यादी वस्तूही त्वचारोग वाढवतात असा आयुर्वेदाचा विश्वास आहे. पोटात जंत असणे, कोठा साफ नसणे हा त्रास असेल तर त्यावर लवकर व नियमित उपचार करणे आवश्यक आहे. या विकारामुळे त्वचारोग लवकर आटोक्यात येत नाहीत.

पावसाळयाच्या शेवटी होणारे त्वचाविकार हे शरीरातील थोडे रक्त काढल्यास (रक्तमोक्षण) लवकर बरे होतात. यासाठी जळवांचा वापर करता येईल. त्वचारोगाच्या आजूबाजूला किंवा रोगग्रस्त त्वचेवर जळवा लावल्यास लवकर आराम पडतो असा अनुभव आहे.

आयुर्वेदानुसार साबणाऐवजी बेसनपीठ व तेल वापरल्यास त्वचा निरोगी व स्निग्ध राहण्यास मदत होते. विशेषकरून कोरडी त्वचा असलेल्या व्यक्तींनी अशी काळजी घेणे आवश्यक आहे.

त्वचाविकारावर इतर उपचार चालू असताना करावयाचे उपचार

(अ) आरोग्यवर्धिनी 500 मि.ग्रॅ. दोन वेळा

(ब) मंजिष्ठा चूर्ण पोटातून रोज दिल्यास आराम पडतो. (मात्रा : 1.5 ते 3 ग्रॅ. याप्रमाणे दिवसातून दोन वेळा)

 

लेखक : डॉ. श्याम अष्टेकर

(MBBS, MD community Medicine)

संदर्भ : आरोग्यविद्या

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate