उपयोग सालाचे लाकूड फार कठीण, मजबूत, मध्यम जड, भरड व फार टिकाऊ असून त्याला वाळवीपासून हानी पोहोचत नाही. मध्यकाष्ठ प्रथम फिकट तपकिरी व नंतर गर्द पिंगट होते. रसकाष्ठ (बाह्यकाष्ठ) प्रथम फिकट, परंतु नंतर काळपट होऊ लागते; मध्यकाष्ठ फार टिकाऊ असते. योग्य खबरदारी घेतल्यास त्याचे खांब २५–४० वर्षे टिकतात. उ. व पू. भारतात व्यापारामध्ये मोठ्या प्रमाणात असणारे लाकूड म्हणून ते प्रसिद्घ आहे; मात्र कापण्यास व रंधण्यास ते अवघड जाते. पूलबांधणी, घरबांधणी, खाणकाम, हत्यारांचे दांडे, नावा, वल्ही, खांब, सजावटी सामान, शेतीची अवजारे, पिपे, जळण इ. विविध प्रकारे ते उपयोगात असते. खोडावरची साल तिच्यातील सु.९०% टॅनिनामुळे कातडी कमविण्यास वापरतात. पानांत सु. २०%, पानांसह डहाळ्यांत २२ % आणि भुशात जवळपास १२% टॅनीन असते. खोडापासून फळ्या, पट्ट्या इत्यादींकरिता तासणी, कापणी इ. होत असताना साल व भुसा भरपूर मिळतो. त्यामुळे पाने, डहाळ्या व भुसा यांचा टॅनिनाकरिता बराच उपयोग होतो. टॅनीनमिश्रित अर्क काढून घेतल्यावर उरलेल्या चोथ्यातून तूलीर (सेल्युलोज) वेगळा करून उरलेला भाग तक्ते करण्यास वापरतात. भुसा मिसळूनही चोथा तक्त्यासाठी वापरतात. पानांत सु. ०·९४% नायट्रोजन व २·७९% राख (खनिजे) असल्याने गुरांना खाद्य (चारा) म्हणून ती उपयोगाची नाहीत.
खोडापासून काढलेले ‘साल-डामर’ नावाचे ओलिओरेझीन बूटाचे पॉलिश, कार्बन कागद, टंकलेखनाच्या फिती, हलके रंगलेप, रोगण, धूप इत्यादींत वापरतात. प्रत्येक वृक्षापासून दरवर्षी साधारणतः ४ ते ५ किग्रॅ. रेझीन मिळते. रसकाष्ठातील गुहारुधांमुळे (वाहक नलिकांत बाहेरून वाढणाऱ्या अनेक कोशिकांमुळे) रेझिनाचा प्रवाह निर्बंधित होतो. तसेच साल-डामरापासून ऊर्ध्वपातनाने ‘चुआ तेल’ (४१–६८%) मिळते; ते सुगंधी द्रव्यात वापरतात तसेच नावा व गलबते यांतील भेगा बुजविण्यास व धूपाकरिता हे तेल वापरतात. ते स्तंभक (आकुंचन करणारे) व निरोधक असल्याने आमांशात देतात; शिवाय धुरी देण्यास वापरतात. मंद पचनक्रिया व परमा यांवर ते देतात. ते वाजीकर (कामवासना वाढविणारे) आहे. ते जड अत्तरात स्थिरत्व आणण्यास घालतात आणि स्वादाकरिता तंबाखूत वापरतात. चर्मरोगांवर व कानदुखीवरच्या औषधांत ते घालतात.
रुचीच्या दृष्टीने बिया साधारणच असल्या, तरी विशेषतः अन्नतुटवडा असताना, गरीब लोक त्या भाजून खातात. त्यांची टरफले काढून सु. ५%मक्याबरोबर मिसळून त्या कोंबड्यांच्या खाद्यात समाविष्ट करतात. सुक्या बियांत प्रतिशत प्रमाणात पाणी ५·२३, प्रथिने ६·१३, ईथर अर्क १६·७७, भरड धागा ४·८१, नायट्रोजन विहित अर्क ६३·२५, कॅल्शियम ०·१८, राख ३·७८ व अम्लात न विरघळणारी राख ०·९५ हे घटक असतात. बियांत १९-२०% स्थिर तेल (साल-लोणी) असते. बिनटरफलाच्या बिया पाण्यात उकळल्यास तेल वेगळे होते. थंड हवेत त्यापासून घन स्वरूपात लोणी मिळते. ते हिरवट किंवा नितळ दिसते. दिव्यांकरिता किंवा स्वयंपाकात ते उपयोगात येते; तुपात त्याची भेसळ करतात. इतर काही तेलांबरोबर त्याचा साबणांत वापर करतात, तसेच कोको बटरऐवजी चॉकोलेट बनविण्यातही त्याचा वापर करतात. तेल काढून घेतल्यावर सालाच्या पेंडीचा उपयोग गुरे व कोंबड्या यांच्या खाद्याकरिता करतात; त्यात १०–१२% प्रथिने व सु. ५०% स्टार्च असतो.
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 10/7/2020