राज्यात दि. १ जुलै २०१६ रोजी जनतेच्या सहभागातून २ कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प करण्यात आला होता तो उत्स्फुर्त लोकसहभागातून पूर्ण झाला एवढेच नाही तर या एकाच दिवशी राज्यात २ कोटी ८३ लाख झाडं लागली. याची नोंद लिम्का बुक ऑफ रेकार्डमध्ये घेण्यात आली. सर्व क्षेत्रातील सर्व वयोगटातील लोकांच्या प्रामाणिक आणि स्वयंस्फुर्त सहभागाने हे यश संपादन करता आले.
जागतिक तापमानातील वाढ आणि ऋतू बदल यामुळे आज अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टीचा सामना करावा लागत आहे. कधी अचानक गारांचा पाऊस पडत आहे. पर्यावरण समतोल राखण्यात झाडांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे हे लक्षात घेऊन वन विभागाने राज्याचं वनाच्छादन २० टक्क्यांहून वाढवून ३३ टक्के इतके करण्याचा निर्धार केला आहे. त्यानुसार राज्यात लोकसहभाग तसेच विविध शासकीय विभागांच्या सहकार्यातून येत्या ३ वर्षात ५० कोटी वृक्ष लावले जाणार आहेत. वृक्षारोपणाच्या या कार्यक्रमात अधिकाधिक लोकांचा सहभाग वाढावा, त्याचे लोकचळवळीत रुपांतर व्हावे म्हणून वन विभागाने ‘महाराष्ट्र हरित सेना’ स्थापन करण्याचे निश्चित केले आहे. एवढेच नाही तर या हरित सेनेत सहभागी होऊन नोंदणी करण्यासाठी http://www.greenarmy.mahaforest.gov.in हे संकेतस्थळही विकसित केले आहे. या संकेतस्थळावर दि. ३१ मार्च २०१७ पर्यंत किमान १ कोटी लोक स्वयंस्फूर्तीने स्वयंसेवक होतील अशी अपेक्षा आहे. याशिवाय http://www.mahaforest.nic.in/ या संकेतस्थळावर जाऊनही हरितसेनेचे सदस्य होता येते. वन विभागाच्या या संकेतस्थळावर हरितसेनेचे सदस्य होण्यासाठीची लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे.
वन विभागाने दि. १८ जानेवारी २०१७ रोजी महाराष्ट्र हरितसेनेचे संकेतस्थळ विकसित केले आणि ते सर्वांसाठी उपलब्ध करून दिले. १८ जानेवारी ते २७ फेब्रुवारी २०१७ या कालावधीत या संकेतस्थळाच्या माध्यमातून दुपारी ३ वाजेपर्यंत १ लाख ५६ हजार २६७ सदस्यांनी हरित सेनेसाठी आपले नाव नोंदवले आहे. त्यापैकी १ लाख ४३ हजार ७८७ व्यक्ती-संस्थांना हरित सेनेचे प्रमाणपत्र वितरित करण्यात आले आहे. वितरित करण्यात आलेल्या प्रमाणपत्रधारकांमध्ये वैयक्तिक सदस्यांची संख्या १ लाख ३७ हजार ६३६ इतकी आहे तर संघटनात्मक नोंदणीधारकांची संख्या ६१५१ इतकी आहे. हरित सेनेच्या सदस्यांची जिल्हानिहाय आकडेवारी ही यातून लक्षात येत असून जिल्ह्या-जिल्ह्यात आता कोणता जिल्हा हरित सेनेच्या नोंदणीत प्रथम क्रमांकावर येतो यादृष्टीने प्रयत्न होत आहेत. त्यातून एक निकोप स्पर्धा आणि एक सुंदर वातावरणनिर्मितीही होताना दिसत आहे.
हरित सेनेत सहभागी होण्याची संधी राज्यातील प्रत्येक व्यक्तीस, संस्थेस, संघटनेस मिळणार असून ज्यांना वृक्ष लागवड, संरक्षण आणि संवर्धन या कामाबरोबर वन, वन्यजीव, वनीकरण, निसर्ग, पर्यावरण, जैवविविधतेचे संरक्षण आणि संवर्धन या क्षेत्रात विशेष आवड आहे त्यांना वैयक्तिक किंवा सामूहिक स्वरूपात आपला सहभाग येथे नोंदवता येईल. यात शासकीय-निमशासकीय विभाग, अधिकारी-कर्मचारी, विविध अशासकीय संस्था, स्वयंसेवी, सहकारी संस्था, शैक्षणिक संस्था, औद्योगिक, खाजगी संस्थांचे कर्मचारी, व्यावसायिक, ज्येष्ठ नागरिक, शेतकरी, महिला, शालेय - महाविद्यालयीन व विद्यापीठांमधील विद्यार्थी, एन.सी.सी/ एन.एस.एस/स्काऊट गाईड अशा सर्व गटांचा आणि व्यक्तींचा सहभाग मोलाचा ठरणार आहे.
स्त्रोत - महान्युज
अंतिम सुधारित : 7/28/2023
वाढत्या नैसर्गिक आपत्तीत आपली शेती शाश्वत करण्यास...