ठिकाण - जयपूर किल्ला
गाव / जिल्हा - जयपूर
अरवरी पर्वतरांगांच्या माथ्यावर वसलेला जयगड किल्ला 18 व्या शतकाच्या पूर्वार्धात बांधलेला आहे. किल्ल्याच्या पश्चिमेला दूरवर डोंगरांकडं धावत जाणारं बांधकाम दिसलं. वाटलं, किल्ल्याची तटबंदी असेल; पण जवळ गेल्यावर लक्षात आलं, तर ते होते पक्कं बांधकाम केलेले पाण्याचे कालवे. पावसाळ्यात डोंगरावरून वाहून जाणारं पावसाचं पाणी किल्ल्यात वळवून आणून साठवण करण्याची महत्त्वाकांक्षी योजना... प्रत्यक्षात अवतरलेली!
कालवे नेताना सरळसोट न नेता मुद्दाम वळसे घालून नेलेले; म्हणजे तिथल्या झाडा-झुडपांनाही पाणीपुरवठा व्हावा आणि वनराईही हिरवी राहावी. उपलब्ध नैसर्गिक भूरूपाचा अतिशय कल्पकतेनं वापर करून पाण्याच्या समस्येवर केलेला रामबाण उपाय. किल्ल्यात आलेलं पाणी स्वच्छ करून साठवण्यासाठी केलेलं नियोजन पाहून आपण थक्क झाल्याशिवाय राहत नाही. दऱ्या-खोऱ्यांत राहणाऱ्या "मीना‘ या आदिवासी समूहाच्या पारंपरिक ज्ञानाचा, निसर्गाशी असलेल्या तादात्म्याचा आणि राज्यकर्त्यांच्या दूरदृष्टीचा, लोकहितदक्षतेचा सुरेख संगम किल्ल्यवरचं पाणीव्यवस्थापन पाहिल्यावर लक्षात येतो.
माहिती लेखक - नीलिमा जोरवर
अंतिम सुधारित : 11/17/2019