"गाव करील ते राव काय करील?‘ ही म्हण आपण अनेकदा ऐकतो. आपल्याच महाराष्ट्रातली दोन गावं आहेत राळेगणसिद्धी आणि हिवरेबाजार. या गावांतल्या प्रयोगांचं देशभरात कौतुक होतं. राळेगण सिद्धीचा आदर्श घेऊन राजेद्रसिंह यांनी राजस्थानातल्या 200पेक्षा जास्त गावांचा पाण्याचा प्रश्न सोडवू शकतात, त्याच महाराष्ट्रातल्या अनेक गावांना आज पाण्यासाठी लढावं लागतंय! आपण जर आपापसातले हेवे-दावे बाजूला सारले आणि एकीनं कामाला लागलो, तर पाण्याचा प्रश्न निश्चितच शाश्वत रूपानं सोडवू शकतो.
गाव : भिकमपुरा - किशोरी
तालुका : थानागाजी जिल्हा - अलवार
1985 ते 88 मध्ये भयंकर दुष्काळ पडला होता. जगताना टिकून राहण्यासाठी पाणी ही खूप मोठी समस्या होती. राळेगण सिद्धीहून प्रेरणा घेऊन गेलेले राजेंद्रसिंह यांनी गोपाळपुरा गावातून कामाला सुरवात केली. आज इतक्या वर्षांनंतर अरवरी, जहाजवाली, भगानी अशा अनेक नद्यांचं पुनरुज्जीवन झाल आहे. लोकांच्याच सहभागातून बांध-बंधारे घालून पाण्याचे नैसर्गिक स्रोत जिवंत ठेवण्यात आले; म्हणूनच फेब्रुवारी महिन्यातही इथल्या नद्या पाण्यानं भरून वाहताना दिसतात. कोणत्याही धरणातून पाणी न सोडता.
नगदी पिकं घ्यायची नाही, असा इथल्या लोकांनीच घालून घेतलेला नियम. "तरुण भारत संघ‘च्या मदतीनं आज पाच जिल्ह्यांत आणि 200 पेक्षा जास्त गावांत पाण्याची कामं उभी राहिली. जीवनदात्री नदीमायचं महत्त्व ओळखून तिची नैसर्गिक व्यवस्था संवर्धित करण्यात आली आहे. नद्या "जिवंत‘ राहतील, हे पाहण्यात आलं आहे; म्हणूनच राजेंद्रसिंह यांना "पाणीवालेबाबा‘ म्हणूनच ओळखलं जातं. वरील सर्व गावं आहेत राजस्थानमधली. राजस्थान म्हटलं, की डोळ्यांसमोर चित्र उभं राहतं ते रखरखीत वाळवंटाचं. पाण्याच्या दुर्भिक्ष्याचं. दूरवरच्या ओसाड, उजाड रानाच. "गरज ही शोधाची जननी आहे,‘ ही उक्ती आपण एरवी वारंवार ऐकलेली असते. मात्र, वर उल्लेखिलेल्या अनेक गावांतून या उक्तीचा रोकडा प्रत्यय येतो.
लोकांचा सहभाग, पारंपरिक-अनुभवजन्य ज्ञानाचा वापर करून प्रत्येक ठिकाणी आपापली पाण्याची समस्या आपापल्या पद्धतीनं सोडवण्यात आल्याची ही काही उदाहरणं. कुठं चौका सिस्टिम, कुठं बांध, कुठं तालाब-तळं, तर कुठं नद्यांचं पुनरुज्जीवन अशा वेगवेगळ्या प्रकारांनी पाणी टिकवण्यात आलं आहे. संवर्धित करण्यात आलं आहे आणि गरज पडेल तेव्हा वापरण्यातही आलं आहे. म्हणूनच उन्हाळ्यातही तिथं नद्यांमधून पाणी वाहतंय...तळी भरलेली आहेत...भूजलाची पातळी वाढलेली आहे... आपल्याकडचं सरासरी वार्षिक पर्जन्यमान आहे 300 ते 400 सेंटिमीटर; तर राजस्थानातलं पर्जन्यमान आहे 45 ते 50 सेंटिमीटर; पण आपल्याला उन्हाळ्याच्या सुरवातीलाच अनेक गावांत पिण्याच्या पाण्यासाठी टॅंकर सुरू करावे लागतात.
"पाण्याचं आगार‘ असणाऱ्या गावांमधली ही स्थिती असते.
गेल्या काही वर्षांत पावसाचं प्रमाण कमी कमी होताना दिसतंय. संपूर्ण महाराष्ट्राला दुष्काळाचा सामना करावा लागतोय. आताही आपले डोळे उघडले नाहीत, तर यापेक्षाही भीषण परिस्थितीला सामोरं जावं लागणार आहे.
अंतिम सुधारित : 7/28/2019