वृक्ष लागवड मोहीम 31 जुलैपर्यंत राज्यभरात राबविण्यात येते आहे. या मोहिमेच्या उद्देशाच्या एक पाऊल पुढे जाऊन स्वयंस्फूर्तीने मराठवाडा विभागाने राज्यात अग्रेसर स्थान मिळवलं. वनाची गरज, उपाययोजना, जबाबदारी यावर विभागीय आयुक्त डॉ.पुरूषोत्तम भापकर यांनी जवळपास एक हजार अधिकारी यांना विभागीय कार्यशाळेत मार्गदर्शन केले. संत तुकाराम नाट्यगृहात नुकत्याच पार पडलेल्या या कार्यशाळेत अधिकाऱ्यांच्या शंकांचे निरसनही केले. कार्यशाळेत विभागातील जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, वनाधिकारी, वनपाल, टेकडी अधिकारी, शिक्षक आदींची उपस्थिती होती. कार्यशाळेत घेतलेला मराठवाड्यातील वृक्ष संवर्धन, लागवड व कामगिरीचा हा थोडक्यात आढावा.
पर्यावरणाचा सैनिक
सुजलाम् सुफलाम मराठवाड्यासाठी हरीत होणं महत्त्वाचं. राज्यात सर्वाधिक कमी वनक्षेत्र मराठवाड्यातच. या क्षेत्रात वनाची वाढ होणं अत्यावश्यक. हिरवेगार मराठवाडा करण्यासाठी पर्यावरणाचा सैनिक, वन सत्याग्रहातील सत्याग्रही म्हणून नागरिकांनी सहभागी व्हावं, असं आवाहन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नुकतंच औरंगाबादेतील बैठकीत केलं होतं. त्यानुसार नागरिक, प्रशासनाने आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला. राज्यातील सर्वाधिक वृक्ष लागवड करण्यात मराठवाडा विभाग अग्रेसर राहिला.
वृक्ष लागवडीची ‘वारी’
जागतिक मापदंडानुसार भौगोलिक क्षेत्राच्या 33 टक्के क्षेत्रावर वृक्षाच्छादन असणे आवश्यक आहे. तर इतर विभागाच्या तुलनेत मराठवाड्यात अत्यल्प असे 3 हजार 121 चौ.कि.मी. म्हणजेच 4.82 टक्के एवढेच वनक्षेत्र मराठवाड्यात आहे. वनक्षेत्र वाढावे यासाठी मराठवाडा विभागाने सातत्याने राज्याने दिलेल्या उद्दिष्टाच्या पुढे जाऊन उद्दिष्ट वाढवून घेतले. ते पूर्णही करण्यासाठी जिद्दीने, चिकाटीने कार्य केले. राज्यानेही विभागीय आयुक्त डॉ.पुरूषोत्तम भापकर यांच्या कल्पनेचे, केलेल्या कृतीचे, आराखड्याचे कौतुक केले. वारकऱ्यांचे पंढरीची वारी करणे व्रत आहे. तसेच वृक्ष लागवड, संगोपन, संवर्धन करण्याच्या जबाबदारीचे व्रत सर्व अधिकारी, कर्मचारी यांचे आहे. त्यांची एकप्रकारची ही ‘वारी’च असल्याचे यावेळी सांगितले. तसेच राज्यात वृक्ष लागवडीत मराठवाडा अग्रेसर असण्याची आवश्यकता डॉ.भापकर यांनी सांगितली.
वृक्ष संवर्धन
राज्यात पहिल्यांदाच वृक्ष लागवडीचे नियोजन, सनियंत्रणासाठी वृक्ष संवर्धन कक्षाची स्थापना वनमंत्री श्री.मुनगंटीवार यांच्याहस्ते 2 जून 2017 रोजी केली. 2017 साली 0.74 कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट असताना 1.03 कोटी वृक्ष लागवड मराठवाड्यात झाली. माझी शाळा, माझी टेकडी उपक्रमाद्वारे 42 लाख शालेय विद्यार्थ्यांच्या सहभागाने 40 लाख वृक्ष लागवड केले. यावर्षी मराठवाडा विभागाला 2.91 कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट आहे. विभाग ते पूर्ण करेलच. परंतू उद्दिष्टापुरतेच मर्यादित न राहता विभागाने 4 कोटी वृक्ष लागवड करण्याचे ध्येय ठेवले आहे. त्यादृष्टीने वन, सामाजिक वनीकरण, वन विकास, ग्राम पंचायत व इतर यंत्रणांनी प्रयत्न सुरू ठेवले आहेत. मराठवाडा हिरवागार करण्याचा निर्धार प्रत्येक जिल्ह्यानेच केलेला आहे.
अग्रस्थानी मराठवाडा
औरंगाबाद जिल्ह्यात 44.44, जालना 36.26, नांदेड 60.21, बीड 26.06, हिंगोली 29.47, उस्मानाबाद 27.68, लातूर 33.46 आणि परभणी 34.16 लाख असे एकूण 291.74 लक्ष वृक्ष लागवड उद्दिष्ट आहे. वन विभागाने 82.50 लक्ष, सामाजिक वनीकरण विभागाने 48 लक्ष, ग्राम पंचायतीने 65.40 लक्ष आणि इतर यंत्रणांनी 92.58 लक्ष वृक्ष लागवडीचा समावेश आहे. या वृक्ष लागवडीपैकी 92.79 टक्के रोपांची लागवड मराठवाड्यात 20 जुलैपर्यंत झाली आहे. विभागाला राज्याने दिलेले उद्दिष्टात इतर विभागाच्या तुलनेत याबाबतीत मराठवाडाअग्रस्थानी आहे, असे विभागीय आयुक्त डॉ.भापकर यांनी सांगितले. त्याचबरोबर सर्व जिल्ह्यांचे याबाबत कौतुकही केले. मात्र, मराठवाडा विभागाने चार कोटी वृक्ष लागवडीचे संकल्पित उद्दिष्ट ठेवलेले आहे. त्यानुसार उस्मानाबाद जिल्ह्याने 144.05 टक्के, लातूर 113.80 टक्के, नांदेड 112.55 टक्के उद्दिष्ट साध्य केलेले आहे. इतर जिल्ह्यांचीही प्रगतीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. ही अभिमानाची बाब असल्याचेही श्री.भापकर म्हणाले.
रोप लागवडीत अव्वल
राज्याच्या तुलनेत रोप लागवडीच्या उद्दिष्टातही मराठवाडा विभागाने अव्वल स्थान प्राप्त केले आहे. रोपनिर्मितीतही 2018-19 साठी पावसाळ्यात 1102.84 लाख उद्दिष्ट मराठवाड्यासाठी असताना प्रत्यक्षात 858.97 लक्ष रोपांची निर्मिती केलेली आहे. इतर विभागाच्या तुलनेत ही सर्वाधिक आहे. त्याचबरोबर आगामी काळात 14 कोटी रोपे निर्माण करण्याच्या दृष्टीनेही विभागाने कार्यवाही करणे अपेक्षित असल्याचे डॉ.भापकर म्हणाले.
इको बटालियन
राज्यात पहिल्यांदाच मराठवाड्यातील औरंगाबादेतील अब्दी मंडी येथे इको टास्क फोर्स बटालियनची स्थापना वनमंत्री मुनगंटीवार यांच्याहस्ते 4 जुलै 2017 रोजी झाली. या ठिकाणी 65 हेक्टरवर वृक्षांची लागवड माजी सैनिकांनी केली. यंदाही 65 हेक्टरवर लागवड करण्यात येते आहे. त्याचबरोबर शेंद्राबन येथील 57 हेक्टर जागेवर इको बटालियन वृक्ष लागवड करते आहे. नुकतंच कर्नल पी. व्यंकटेश यांनी औरंगाबादच्या ब्रिजवाडी येथील तारामती बाफना अंध विद्यालयाच्या सोबतीने या परिसरात रोपांची लागवड केली. दिव्यांग विद्यार्थ्यांनी वृक्ष लागवड करून कृतीतून वृक्ष लागवडीचे महत्त्व इतरांना सांगितले. इतरांनीही या विद्यार्थ्यांचा आदर्श घ्यायला हवा.
स्वयंसेवी संस्थांचा प्रतिसाद
औरंगाबादच्या वाघलगाव येथे इर्जिक फाऊंडेशनतर्फे सिने कलाकार सयाजी शिंदे यांच्या सहभागातून जुलै 2017 अखेर 17 हजार रोपांची लागवड झाली. ग्लोबल परळी मिशन अंतर्गत नाल्याच्या दुतर्फा 13 हजार 433 वृक्ष लागवड करण्यात आली. अनुलोम, दिलासा, वी फॉर इर्न्व्हामेंट, प्रेरणा आणि उगम व इतर संस्थांनीही वृक्ष लागवडीसाठी पुढाकार घेतलेला आहे. नदीच्या दुतर्फा वृक्ष लागवड, गायरान जमिनीवर फळबाग लागवड, बेलबन, जांभूळबन, पिंपळबन निर्मिती करण्याचेही प्रशासनाने प्रस्तावित केलेले आहे, असेही डॉ.भापकर म्हणाले.
आर्थिक समृद्धीसाठी रेशीम लागवड
मराठवाड्यात 5 हजार 56 एकर क्षेत्र रेशीम लागवड योग्य क्षेत्र आहे. तर 2018 साठी 3 हजार 700 एकर रेशीम लागवड लक्षांक आहे. सद्यस्थितीत तुतीची 4.86 कोटी रोपे तयार आहेत. त्यामुळे रेशीम लागवडीचा अवलंब शेतकऱ्यांनी करावा व आर्थिक समृद्ध होण्याच्या दृष्टीने पावले उचलावीत, असे आवाहन डॉ.भापकर यांनी केले. मनरेगांतर्गत वृक्ष लागवड, रेशीम लागवड, हरित टेकडी अभियान आदी कामे करण्यावर सर्व अधिकाऱ्यांनी भर द्यावा. ग्राम संपर्क अधिकारी, तालुका संपर्क अधिकारी यांनीही गाव, तालुका विकासासाठी शासनाच्या विविध योजनांची माहिती जनतेला द्यावी. त्यांचा लाभ मिळवून द्यावा, असेही डॉ.भापकर यांनी कार्यशाळेत सांगितले.
कार्यशाळेत फलदायी चर्चा झाली. उपस्थित अधिकारी, टेकडी अधिकारी, शिक्षक आदींचे शंकांचे निरसनही झाले. या कार्यशाळेतून प्रत्येकाने सकारात्मक संदेश घेतला. वृक्ष लागवडीसाठी आणि हरीत मराठवाड्यासाठी तो फलदायी ठरेलच, असा विश्वास डॉ.भापकर यांनी यावेळी व्यक्त केला.
- श्याम टरके
माहिती स्रोत: महान्युज
अंतिम सुधारित : 8/18/2019