महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक वनांचे प्रमाण विदर्भात आहे. त्यातही गडचिरोली जिल्हा सर्वाधिक वनांचा जिल्हा आहे. या जिल्हात 78 टक्के क्षेत्र जंगलाचे आहे. मात्र संपूर्ण राज्याचा विचार करता नैसर्गिक समतोलासाठी आवश्यक असणारे वनक्षेत्र राज्यात नाही.समतोल असण्यासाठी एकूण भूक्षेत्राच्या साधारण 33 टक्के क्षेत्र वनांखालीत असणे आवश्यक आहे. याच दृष्टीकोनातून राज्यात 50 कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट 3 वर्षात गाठण्याचा निर्णय वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला असून त्याचा पहिला टप्पा या वर्षी 1 ते 5 जुलै या कालावधीत संपूर्ण राज्यात एकाचवेळी घेण्यात येणार आहे.
वनमंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर मुनगंटीवार यांनी या कामाला गती दिली. गेल्या वर्षी 1 ते 5 जुलै या कालावधीत 2 कोटी वृक्ष लागवड करण्याची विशेष मोहिम घेण्यात आली. याला वन विभागासह सर्व शासकीय विभाग तसेच स्वयंसेवी संस्था, समाजसेवी संस्था, शाळा आणि महाविद्यालये तसेच राज्यातील नागरिकांनी चांगला पाठिबा दिला. या सर्वाच्या पाठिब्यांने 2 कोटी वृक्ष लागवडीचा टप्पा सहजरित्या पार झाला आणि त्याहीपेक्षा अधिक झाडे लावली गेली.महाराष्ट्रातील जनतेमध्ये निर्माण झालेला उत्साह त्यांचे पर्यावरणाप्रती असणारे प्रेम दाखविणारा असाच होता. या उपक्रमाची नोंद प्रतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सह अनेक नेत्यांनी तसेच चित्रपट सृष्टीतील तारकांनीही घेतली. ही 2 कोटी वृक्ष लागवडीची चळवळ यशस्वी मोहीम म्हणून लिम्का बूक ऑफ रेकॉर्डसमध्ये देखील एक विक्रम म्हणून नोंदली गेली. या यशातून येणाऱ्या काळात सातत्यपूर्ण प्रयत्नांनी महाराष्ट्र राज्य 'हरित महारष्ट्र' करण्याची मुहूर्तमेढ रोवली गेली.
जुलै 2016 मध्ये करण्यात आलेली लागवड संरक्षित क्षेत्रात असावी असे नियोजन करण्यात आले होते. यामुळे लावण्यात आलेल्या झाडांचे संगोपन आणि त्यांच्या वाढीच्या काळामध्ये आवश्यक असणारे सरंक्षण सहजशक्य झाले. परिणामी त्यावेळी लावण्यात आलेल्या वृक्षांपेकी 90 टक्के वृक्ष जिवंत राहू शकले. विशिष्ट कालावधीचे सरंक्षण झाडांना आवश्यकच असते. यंदाच्या उन्हाळ्यात सर्वत्र उन्हाचा पारा 40 अंश सेल्सिअसच्यावर असला तरी झाडे लागली हे मोठे यशच आहे.आता 50 कोटी वृक्ष लागवड करण्याची मोहिम हाती घेण्यात आली आहे. यातील पहिल्या टप्प्यामध्ये सन 2017 च्या 1 ते 5 जुलै या काळात 4 कोटी वृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. यापैकी 2 कोटी 25 लाख झाडे स्वत: वनविभाग आपल्या क्षेत्रात लावणार आहे. 1 कोटी झाडे ग्रामपंचायतींच्या सहभागातून तर 75 लाख झाडे इतर सर्व शासकीय कार्यालयांनी लावायची आहेत.
या वृक्ष लागवडीसाठी साधी रोपे न लावता साधारणपणे 2 ते 3 वर्षे वाढलेली रोपे लावावित असे ठरविण्यात आले असून वन विभागाच्या विविध ठिकाणी नर्सरीत या प्रकारची रोपे तयार करुन वाढविण्याचे काम 3 वर्षांपूर्वीच सुरु झालेले आहे. प्रत्येक वर्षाची मागणी लक्षात घेऊन यांच्या संख्येत वाढ करण्यात येत आहे.दोन वर्षापेक्षा अधिक काळ वाढविलेला रोपांच्या जगण्याची श्क्यता सर्वाधिक असते. याचे नियोजन जसे आधी करण्यात आले तसेच आगामी दोन वर्षामध्ये ठरविण्यात आलेला उद्दिष्टानुसार आताच रोपांची लागवड करुन त्यांना वाढविण्यात येत आहे. याच दिर्घकालीन नियोजनाचा फायदा आगामी काळात उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी होणार आहे.
इतक्या मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करायची तर त्याला सर्वच साधनांचे नियोजन आवश्यक ठरते. झाडांची जितकी संख्या आहे तितके खड्डे खोदून तयार ठेवणे हे देखील आवश्यक आहे. यासाठी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना जागा निश्चित करणे व तेथे खड्डे खोदून घेणे याचे वेळापत्रक ठरवून देण्यात आले.जसा लागवडीचा कालावधी जवळ येत आहे तसा या कामासाठी वेग देण्यात येत आहे. याचा संदेश राज्यातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहचावा आणि त्यांचाही या राज्यव्यापी मोहिमेत सहभाग असावा यासाठी जनसंपर्कावर भर देण्यात येत आहे. सामाजिक, स्वयंसेवी संस्था, शाळा महाविद्यालये आणि नागरिकांनी यात सहभाग नोंदवावा यासाठी आवाहन करण्यात आले आहे.
झालेल्या वृक्ष लागवडीची योग्य पद्धतीने नोंद करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने माहिती भरण्यात येणार आहे आणि हीच अधिकृत आकडेवारी राहणार याची सूचना सर्वांना देण्यात आली आहे.राज्यातील या महत्वाकांक्षी मोहिमेत सर्वांचा सहभाग असावा यासाठी ‘हरीत सेना’ तयार करण्यात आली आहे. याची अधिकाधिक नोंदणी करण्यावर भर देण्यात आला आहे. या मोहिमेचा प्रचार करण्यासाठी 1 मे रोजी महाराष्ट्र दिनी चंद्रपूर येथून ‘चांदा ते बांदा’ असा विशेष चित्ररथ देखील सुरु झाला. ही बस स्वरुपातील प्रदर्शनी राज्यातील सर्व जिल्ह्यांमधून वृक्ष लागवडीचा संदेश देत फिरत आहे.अटकेपार झेंडे लावणाऱ्यांचा हा मराठी प्रांत गेल्या काळात पर्यावरणाची झालेली हानी भरुन काढण्यासाठी सज्ज होत आहे. आपला यात सहभाग आवश्यकच आहे. आपण स्वत:ला उद्दिष्ट द्यायचय झाडं लावण्याचं... मग किती झाडं लावताय ते ठरवा आणि लागा कामाला.
लेखक: प्रशांत अनंतराव दैठणकर
जिल्हा माहिती अधिकारी, गडचिरोली
माहिती स्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 8/10/2020
मोठी गुंतवणूक करून एखादा कृषी प्रक्रिया उद्योग उभा...
या भागात महाराष्ट्र राज्याविषयी माहिती दिली आहे.
सन १८८१ च्या फ़ेमीन कमीशनने शिफ़ारस केल्यानुसार जुर्...
उस्मानाबाद येथे हजरत शमशुद्दीन गाझी यांचा दर्गा प्...