अरे घरोटा घरोटा
तुझ्यातून पडे पीठी
तसं तसं माझं गानं
पोटातून येतं ओठी
खान्देशच्या कवयित्री बहिणाबाईंच्या कवितेच्या या ओळी. खान्देशी लोकजीवन आणि घरोटा म्हणजेच जातं यांचं नातं सांगतात. आजच्या आधुनिक काळात घरोटा संग्रहालयात पहायची वस्तू झाली असली आणि त्याजागी वीजेवर चालणाऱ्या पिठाच्या गिरण्या अस्तित्वात असल्या तरी जीवनाचं आणि या घरोट्याचं नातं काही बदललेलं नाही. जीवनचक्र चालविण्यासाठी घरोटा हा चाललाच पाहिजे. जळगाव शहरात शिवाजीनगर या श्रमिकांच्या वस्तीत एका गरीब कुटूंबातील महिलेनं या घरोट्यामुळे म्हणजेच पीठ गिरणीच्या व्यवसायातून आपलं जीवनचक्र सुरळीत ठेवलंय आणि या चक्राला मिळालीय मुद्रा बॅंक योजनेतून मिळणाऱ्या अर्थसहाय्याची जोड.
श्रीमती कल्पना चोरट. या सुरुवातीला उदरनिर्वाहासाठी इतरांच्या घरातील कामे भांडी घासणे, कपडे धुणे, स्वयंपाक करणे अशी कामे करत. प्रसंगी शेतात रोजंदारीने जात तरी देखील घरात पैशांची ओढाताणच होती. घरात कल्पना,दोन मुलं, पती आणि आई असे पाच लोक; पती ट्रक ड्रायव्हर परंतू त्यांच्या एकट्याच्या कमाईत घरखर्च चालवणं जिकरीचं होत होतं. जसजशी मुलं मोठी होत होती तसतसे खर्चही वाढत होते.
घरखर्चाची तोंड मिळवणी करण्यासाठी आपण स्वतंत्र व्यवसाय करावा, असं त्यांना प्रकर्षाने वाटु लागलं. पण मुख्य अडचण होती भांडवलाची. त्यासाठी त्यांनी महिला बचत गटात सदस्य होऊन कर्ज घेतलं. या कर्जरुपी भांडवलावर त्यांनी पिठाची गिरणी खरेदी केली. ही लहान चौदा इंची गिरणी होती. याच गिरणीवर त्यांनी व्यवसायाला सुरुवात केली. या व्यवसायाला चांगला प्रतिसाद मिळाला मात्र गिरणी नादुरुस्त झाली. पुन्हा आर्थिक समस्या उभी राहिली. मात्र आपण पीठ गिरणीचा व्यवसाय चांगल्या पद्धतीने करु शकतो; हा आत्मविश्वास त्यातून निर्माण झाला होता. त्यातच त्यांना पंतप्रधान मुद्रा योजनेच्या स्वरुपात आशेचा किरण दिसला.
सेंट्रल बॅंकेतून या योजनेविषयी त्यांनी संपूर्ण माहिती मिळवली. कर्जासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करुन सर्व प्रक्रिया पार पाडली आणि अवघ्या दहा दिवसातच 50,000 रुपये त्यांना कर्ज स्वरुपात मिळाले. ते ही विनातारण. या पैशातून त्यांनी सोळा इंची मोठी गिरणी विकत घेतली. या गिरणीतून पूर्वी जेवढे उत्पन्न मिळायचे त्यात दुप्पटीने वाढ झाली. त्या गिरणी चालवतात त्या शिवाजीनगर परिसरात श्रमिकांची वस्ती असल्याने पीठ गिरणीला चांगला प्रतिसाद मिळणं अपेक्षित होतं, त्याप्रमाणे सध्या सकाळी नऊ वाजेपासून सुरु होणारी गिरणी रात्री अकरा वाजेपर्यंत चालते.
दिवसभरात त्यांना सहाशे रुपयांपर्यंत उत्पन्न मिळते. त्यामुळे आता कुटूंबाच्या खर्चासाठी लागणारा खर्च सहज उपलब्ध होतो. शिवाय गिरणी चालविण्यासाठी लागणारा देखभाल दुरुस्तीचा, वीज बिलाचा व कर्ज हप्त्याचा महिना सुमारे साडेचार हजार रुपयांचा खर्च जाऊन महिन्याकाठी पाच ते सहा हजार रुपये शिल्लक उरतात. यामुळे आर्थिक स्वयंपूर्णता आल्याने त्यांचा आत्मविश्वास परत आला आणि हे सगळं शक्य झालं मुद्रा योजनेमुळे लाभलेल्या आर्थिक पाठबळामुळे. आणि त्यांच्या कुटूंबाचं जीवनचक्र…. घरोट्यावरचं गाणं…. पोटातून ओठावर येऊ लागलं आहे.
लेखक - देविका शोभा सपकाळे,
जळगाव.
स्त्रोत - महान्युज
अंतिम सुधारित : 8/10/2020
ग्रामीण भागात ज्या तरुणांना नोकरीऐवजी व्यवसाय आणि ...