शेतीची शाश्वतता टिकवून ठेवण्यासाठी आज मोठ्या प्रमाणावर सेंद्रिय खतांच्या निर्मितीची गरज आहे. ग्रामीण भागातील तरुणांनी पुढाकार घेऊन याच्या निर्मितीस व्यवसायाचे स्वरूप देण्याची गरज आहे. तसेच प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या शेतीच्या गरजेइतकी तरी सेंद्रिय खते आपल्या शेतावर उपलब्ध स्त्रोतांमधून तयार केल्यास खर्चात बचत होईल.
आपल्या राज्यात सेंद्रिय शेतीच्या धोरणांस शासनमान्यता मिळाली असून, त्यानुसार जवळपास 10 टक्के क्षेत्र सेंद्रिय शेतीखाली आणण्याचे उद्दिष्ट आहे. मुळातच कोणत्याही शेतीसाठी सेंद्रिय निविष्ठांची अत्यंत गरज असतेच. शेतीसाठी सतत तीव्रतेने वापर होत असणाऱ्या जमिनीत सेंद्रिय खतांचा वापर जवळपास नाहीसा किंवा तुलनेने कमी झाला आहे. त्यामुळे जमिनीची प्रत खालावली आहे. वापरण्यात येणाऱ्या कोणत्याही निविष्ठांचा कार्यक्षम वापर होत नाही. खरं तर जमीन आरोग्यासाठी नियमित सेंद्रिय खताच्या वापराच्या शिफारशी आधीपासून केल्या गेल्या; परंतु सेंद्रिय खतांच्या कष्टदायक निर्मितीस आळा देऊन बाजारात सहज उपलब्ध कृत्रिम खतांचा फक्त वापर केला गेला.
शेतीची शाश्वतता टिकवून ठेवण्यासाठी आज मोठ्या प्रमाणावर सेंद्रिय खतांच्या निर्मितीची गरज आहे. यामध्ये ग्रामीण भागातील तरुणांनी पुढाकार घेऊन त्या निर्मितीस व्यवसायाचे स्वरूप देण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या शेतीच्या गरजेइतके तरी सेंद्रिय खते आपल्या शेतावर उपलब्ध स्त्रोतांमधून निर्माण करण्याची गरज आहे.
शेतावरील उपलब्ध काडीकचरा, पिकांचे अवशेष आदींचा सेंद्रिय खतांच्या निर्मितीस मोठ्या प्रमाणात वापर करण्याची गरज आहे. शेतावर उपलब्ध पीक अवशेषांचे कर्ब-नत्र गुणोत्तर यावर त्यांचे कुजणे अवलंबून असते. सर्वसाधारणपणे द्विदल पिकांचे अवशेष किंवा मूग, उडीद, तूर, सोयाबीन आदींचे कुटार, त्यांच्यातील कमी कर्ब-नत्र गुणोत्तरामुळे सहजासहजी आणि लवकर कुजते. गव्हांडा, कापसाच्या पराठ्या, उसाचे पाचट यांच्यामधील कर्ब-नत्र गुणोत्तर तुलनेने जास्त असून, ते कुजायला जास्त वेळ लागतो. परंतु या सर्व पीक अवशेषांमध्ये जमीन सुधारण्याची मोठी क्षमता आहे. त्यांच्यामध्ये पिकांसाठी आवश्यक मुख्य, दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात. रासायनिक खतांना काही अंशी पर्याय म्हणून किंवा त्यांची मात्रा कमी करण्यासाठी या पीक अवशेषांचा शेतीत पुनर्वापर करणे गरजेचे आहे.
शेतीसाठी आज सर्वांत महत्त्वाची निविष्ठा म्हणजे सेंद्रिय खत असून, सध्या ते अतिशय दुर्मिळ आहे. कष्टाचे आणि त्रासदायक असल्यामुळे त्याची निर्मिती पाहिजे तेवढ्या प्रमाणात दिसत नाही. परंतु या निविष्ठांच्या नियमित वापरामुळे निश्चितच प्रथम जमिनीची प्रत सुधारता येईल. या निविष्ठांची प्रतदेखील चांगली असणे गरजेचे आहे. राज्याच्या कृषी विभागांतर्गत निविष्ठा व गुण नियंत्रण विभागाद्वारा सेंद्रिय निविष्ठा व त्यांच्या गुणवत्तेसाठी निकष ठरविले आहेत. त्यांचे पालन करून योग्य गुणवत्तेच्या निविष्ठा जमिनीत वापरावयास हव्यात. हळूहळू पुन्हा शेतकरी सेंद्रिय पदार्थाचे जमिनीसाठी महत्त्व जाणून घेऊन त्यांचा वापर वाढविण्यास काही ठिकाणी सुरवात झालेली दिसत आहे. पश्चिम विदर्भातील जिल्ह्यांमध्ये अलीकडील काही वर्षांत रासायनिक खतांच्या कमी झालेल्या वापरामागील हे एक महत्त्वाचे कारण आहे. सेंद्रिय खतांच्या वापराचे जमीनसुधारणेत महत्त्व आणि एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापनाबाबतचा प्रचार प्रसार आणि त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये वाढलेली जागरुकता याचा हा परिणाम आहे, असे म्हणावयास हरकत नाही.
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
पुणे येथील राजलक्ष्मी भोसले यांनी आपल्या 35 गुंठे ...
नैसर्गिक आपत्तीने अनेक वेळा दस्तक दिल्यानंतर आता र...
सांगली जिल्ह्यातील कासेगाव (ता. वाळवा) येथील संपतर...
ही गोष्ट आहे अकोल्याच्या ज्योतीताईंची...! अकोला जि...