অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मराठी साहित्य- कादंबरी

‘कादंबरी’ ला आज एक प्रधान वाङमयप्रकार म्हणून जागतिक मान्यता व लोकप्रियता लाभलेली असली, तरी तिचा विकास, प्रथमतः पाश्चात्य देशांमध्येच झाला. ह्या देशांतही, नाटक आणि कविता ह्या वाङमयप्रकारांप्रमाणे तिला शतकानुशतकांची दीर्घ परंपरा नाही. खऱ्या अर्थाने अठराव्या शतकातच तिचे रूप उत्क्रांत झाले आणि एकोणिसावे शतक उलटण्यापूर्वीच एक प्रधान साहित्यप्रकार म्हणून ती वाङमयविश्वात प्रतिष्ठित झाली.

मराठी कादंबरीचा आरंभकाल (१८८५ पूर्व)

मराठी वाचकलेखकांना ‘कादंबरी’ च्या अस्तित्वाची जाणीव झाली ती १८१८ नंतर म्हणजे पेशवाई जाऊन इंग्रजांची राजवट आल्यानंतर, ह्या कालखंडात पाश्चात्य वाङ्मयाच्या परिचयाने आणि परिशीलनाने, एतद्देशीयांना नव्या-जुन्या अशा सर्वच वाङमयप्रकारांच्या संदर्भात एक नवी जाग आणि जाण आली. कादंबरी हा साहित्यप्रकार पूर्णपणे नवा होता, तरी त्याच्या कथात्म रूपामुळे, इकडेही तो लवकरच लोकप्रिय झाला. एवढेच नव्हे, तर पाश्चाच्य कादंबरीच्या धर्तीवर मराठी कादंबरीच्या निर्मितीचे प्रयत्न हळूहळू मूळ धरू लागले.  ह्या काळातील एकूण वातावरण, कादंबरीच्या विकासाच्या दृष्टीने, अनुकूल-प्रतिकूल अशा संमिश्र स्वरूपाचे होते.  मुद्रणाची सोय उपलब्ध होती, मराठी गद्याचे अभिव्यक्तिसामर्थ्य दिवसेंदिवस वाढत होते; शिक्षणाच्या प्रसारामुळे वाचकांची संख्याही वृद्धिंगत होत होती; वाचनाची गोडी लागावी म्हणून शिक्षणक्रमात कथात्म वाङमयाचा मुद्दाम अंतर्भाव केला जात होता.

शिक्षणखातेदेखील कथात्म वाङमयाच्या अनुवादित, रूपांतरित आणि स्वतंत्र निर्मितीला प्रोत्साहन देत होते,  असे असले, तरी ह्या काळातील विद्वान, सुशिक्षित, प्रतिभासंपन्न व्यक्तींना कादंबरीच्या विकासात तितकेसे स्वारस्य नव्हते, किंबहुना तिच्याविषयीचा त्यांचा ग्रह काहीसा प्रतिकूल स्वरूपाचा होता. कादंबरीमध्ये आषुकमाषुकांच्या मोहक परंतु भ्रामक गोष्टी वर्णन केलेल्या असतात आणि त्यांच्यात कित्ता घेण्याजोगे काही नसते, म्हणून ज्या कोणाला देशोपयोगी, समाजोपयोगी कार्य करायचे नसेल, आपले मन बिघडवून घ्यायचे असले, वेळेचा अपव्यय करायचा असेल, त्यानेच तेवढी कादंबरी हातात धरावी, इतरांनी तिच्या नादी लागू नये ह्या धारणेमुळे कादंबरीचा समावेश अनीतिपर वाङमयात होऊ लागाल, उघडपणे तिचे वाचन अशक्य झाले आणि तिचे लेखन ही प्रतिष्ठेची बाब ठरली नाही. यमुना पर्यटन (१८५७) हा ग्रंथ लिहिणाऱ्या  बाब पद्ममनजींनी (१८३१-१९०६) मला कादंबऱ्याय वाचायची गोडी नव्हती आणि ही माझ्यावर देवाच्या आत्म्याची दयाच झाली असे मी समजतो, अशा आशयाचे उदगार आपल्य आत्मचरित्रात काढले आहेत.  म्हणूनच यमुनापर्यटनच्या निर्मितीमागील जाणिवा, कादंबरीची जाण असणाऱ्याच लेखकाच्या नाहीत.

अशा परिस्थितीतदेखील काही मोजक्या सुशिक्षित मंडळींनी, इंग्रजीतील लोकरंजक कथा, कादंबर्या् आणि ऐतिहासिक कादंबऱ्याय, रोमान्स इत्यादींच्या धर्तीवर ग्रंथ लिहिण्याचे प्रयत्न केलेले आहेत.  उदा., रामचंद्र भिकाजी गुंजीकर-मोचनगड (१८७१), विनायक कोंडदेव ओक (१८४०-१९१४) – शिरस्तेदार (१८८१), द्वा. ना. रणदिवे – शिक्षक (१८८३), रामकृष्ण बळवंत नाईक – काळपुरुष (१९८६) आणि नाहीचना ऐकायचं?(१८९२), गणेश महादेव लिमये – वेणू (१८८६), काशिबाई कानिटकर (१८६१ – १९४८) – रंगराव (प्रारंभ १८८६ : पुस्तकरूप १९०३), केशव रामचंद्र केळकर – सिंधुबाई किंवा आजकालची सदगुणी माणसे (भाग १-२, १८९०-९१), बळवंत मनोहर पंडित – सुशील यमुना – अथवा वासुदेव बळवंत फडके यांच्या बंडाची धामधूम (१८८७), शंकर विष्णु पुराणिकदेवी– सत्यभामा (१८८६) इत्यादी.  मराठीतील पहिली कादंबरी कोणती ह्याविषयी अभ्यासकांमध्ये दुमत असल्याचे आढळून येते.  काही अभ्यासक विधवांच्या दु:स्थितीचे निरूपण करणाऱ्या बाबा पदमनजींच्या यमुनापर्यटन ह्या कृतीला पहिल्या कादंबरीचा मान देतात, तर काही अभ्यासकांच्या मते लक्ष्मणशास्त्री हळबे ह्यांची मुक्तामाला (१८६१) ही ‘कल्पित गोष्ट’ हीच मराठीतील पहिली कादंबरी ठरते.

कादंबरीची कथावस्तू, घटना-प्रसंगांच्या साहाय्याने केले जाणारे व्यक्तिचित्रण, वातावरणनिर्मिती, कादंबरीची भाषाशैली ह्याबाबत मोचनगडकर्त्या गुंजीकरांची जाण बरीचशी प्रगल्भ होती.  म्हणूनच मराठीतील केवळ पहिली ऐतिहासिक कादंबरी म्हणून नव्हे, तर मराठीतील पहिली ‘कादंबरी’ म्हणून त्यांच्या ह्या कृतीचाच उल्लेख करणे उचित ठरावे.  कादंबरी हे एक संसारचित्र असल्याचे भान ह्या सुशिक्षित लेखकांना आलेले होते व त्यामुळे तिच्या रचनेसाठी सभोवतालच्या जीवनातूनच तपशील वेचण्याची प्रक्रियाही सुरू झालेली होती. परंतु कादंबरीच्या रचनातत्त्वांचे, अन्य साहित्यप्रकारांहून असणाऱ्याच तिच्या वेगळ्या प्रकृतीचे यथायोग्य आकलन न होऊ शकल्यामुळे त्यांच्या लेखनकृती प्रभावहीन निपजल्या.  ह्या कालखंडात पाश्चात्य कादंबरीकारांच्या कादंबऱ्याभची जी रूपांतरे-भाषांतरे झालेली आहेत,  तीही प्रगल्भ अभिरुचीची आणि बुद्धीची साक्ष क्वचितच पटवितात. कृष्णशास्त्री चिपळूणकरांचे रासेलस (पुस्तकरूप: १८७३) किंवा नंतरच्या काळातील ‘धनुर्धारी’ ह्यांचे वाईकर भटजी (व्हिकार ऑफ वेकफील्डचे रूपांतर, १८९८), ह्यांसारखे अपवाद थोडेच आढळतात.

सर्वसामान्यपणे, कोणत्याही कालखंडामध्ये रंजनाच्या प्रेरणेतून जन्माला येणारे वाङमय अस्तित्वात असतेच. एवढेच नव्हे, तर ते झपाट्याने समृद्ध होते कारण त्याच्या निर्मितीची प्रक्रिया सुकर असते. बहुसंख्या वाचकवर्ग ह्या अशा वाङमयाचा चाहता असतो.  प्रस्तुत कालखंडात, लक्ष्मणशास्त्री हळबेकृत मुक्तामाला, ना.स. रिसबूडकृत मंजुघोषा (१८६८) ह्यांसारख्या अनेक लोकप्रिय कल्पित गोष्टी, रंजक वाङमयाचे पारंपारिक लेखनादर्श समोर ठेवूनच जन्माला आलेल्या आहेत.  त्यामुळे बालिश अभिरूचीच्या द्योतक असलेल्या ह्या अद्भूत, कल्पनारम्य आणि वास्तवाची कास सोडणाऱ्या ‘कल्पित गोष्टीं’-मधून मराठी कादंबरीचे रूप उत्क्रांत होण्याचा संभव नव्हता.  तसे ते झालेच नाहीच. परंतु स्वभाषेतील ग्रंथ वाचण्याची गोडी निर्माण करण्यात त्यांचा महत्वाचा सहभाग आहे.

मराठी कादंबरीच्या विश्वातील ह्या काळातील एक लक्षणीय घटना म्हणजे १८७२ मध्ये का.बा. मराठे ह्यांनी लिहिलेला नावल व नाटक ह्याविषयी निबंध. ‘नावल’ चे मुख्य गुण लक्षात घेण्याचा, तिच्या रचनेच्या संदर्भात मार्गदर्शक तत्त्वे नमूद करण्याचा त्यांचा प्रयत्न होता.  तथापि वि.का. राजवाडे ह्यांनी १९०२ मध्ये लिहिलेल्या कादंबरीवरील विस्तृत निबंधात तिच्या वैशिष्ट्यांची उकल अधिक मार्मिकपणे झालेली दिसते.

हरिभाऊ आपटे ह्यांचा कालखंड (१८८५-१९२०)

विष्णुशास्त्री चिपळुणकरांनी ‘भाषापद्धती’ ह्या निबंधात लिहिल्याप्रमाणे हरिभाऊंच्या आधीची मराठी कादंबरी ‘कादंबऱ्याड व नाटके ही सध्या यदृच्छेने जो तो हवी तशी लिहितो’ – अशा प्रकारे निर्मात्याच्या मर्जीनुसार दिशाहीन अवस्थेत आकार धारण करीत होती.  कादंबरीची निर्मिती करू पाहणाऱ्या लेखकांना तिचे प्रयोजन नीटसे उमगलेले नव्हते आणि म्हणून तिच्या अभिव्यक्तीच्या संदर्भातील त्यांच्या जाणिवाही अस्पष्ट, धूसर होत्या.हरि नारायण आपटे (१८६४-१९१९) ह्यांनी पाश्चात्य कादंबरीच्या अंतरंगाशी सामरस्य साधून तिचे प्रयोजन, तिच्या निर्मितीचे घटक आणि तिच्या परिणामाचे मर्म अचूकपणे हेरले.  आपण जे जीवन जगतो, जे अनुभव घेतो त्यांतूनच वास्तववादी कादंबरी तिचा जीवनरस शोषून घेते. सभोवतालच्या वास्तवाचे यथातथ्य चित्रण करणे एवढेच मऱ्यादित उद्दिष्ट तिच्यासमोर नसते.

अन्य साहित्यप्रकारांच्या तुलनेने कादंबरीचा फलक विस्तृत असल्यामुळे व्यक्तींच्या गतिमान, भरघोस आणि विविध स्वरूपाच्या जीवनप्रवाहांचे दर्शन ती सहजपणे घडवू शकते.  व्यक्तिमनाबरोबरच समाजमनाची उकल करण्याचे सामर्थ्य तिच्या ठायी असते- नव्हे.  तिचे हे एक लक्षणीय वैशिष्ट्य आहे.  विशिष्ट स्थल-कालसंबद्ध अशा वास्तवाचा वेध घेत असताना, त्याचा अन्वयार्थ लावीत असताना ती मानवी जीवनाच्या अधिक व्यापक व शाश्वत सत्यांना स्पर्श करते.  त्यामुळे तिचे रूप अर्थसधन बनते व कालप्रवाहात पुसटून न जाता त्याच्यावर मात करू पाहते.  हरिभाऊंजवळ कलावंताची संवेदनशीलता असल्यामुळे कादंबरीच्या ह्या अनेकविध वैशिष्ट्यांचे त्यांना आकलन होऊ शकले आणि म्हणूनच आपल्या कादंबरीची घडणही त्यांना अधिक जाणतेपणाने करता आली. पण लक्ष्यांत कोण घेतो? (१८९३), वज्राघात (१९१५) ह्यांसारख्या त्यांच्या कादंबऱ्यारनी अपघाताने वा योगायोगाने कलारूप धारण केलेले नाही.

आपला देश, आपला समाज, आपली संस्कृती, आपल्या रूढी व परंपरा, आपला इतिहास, आपल्या समस्या, आपली जीवनमूल्ये ह्या सर्वांमुळे आपल्या जीवनाला येणारे रूप आपल्या कादंबरीविश्वाद्वारा – म्हणजे ‘आजकालच्या गोष्टी’ व ‘गतकालच्या गोष्टीं’ – द्वारा साक्षात करण्याचा हरिभाऊंचा प्रयत्न आहे.  त्याचप्रमाणे निर्मितीवृद्धि-क्षय ह्या शाश्वत गुणधर्मांमुळे मानवी जीवन ज्या अवस्थांतून जाते, त्याचाही आविष्कार ‘आजकालच्या गोष्टीं’ द्वारा ते करू पहात आहेत.  त्यांच्या कादंबरीची वीण एकरंगी-एकपदरी नाही, ह्याचे कारणही हेच आहे.  जीवनाचे बहुढंगी, अनेकपदरी, व्यामिश्र रूप साकार करण्याच्या तिच्या प्रयत्नामुळे तिचा विस्तार प्रचंड झालेला आहे.  असे जरी असले, तरी हरिभाऊंची कादंबरी दुर्बोध, अनाकलनीय बनली नाही.  सर्व स्तरांतील वाचकांशी सहजपणे संवाद साधण्याच्या तिच्या सामर्थ्यांमुळे ती कमालीची लोकप्रिय झाली.  त्यांच्या कादंबरीविश्वातील यमू, दुर्गी, शंकरमामंजी, भावानंद, गणपतराव, यशवंतराव इ. असंख्य व्यक्ती आपल्या जीवनाचाच अविभाज्य अंश असल्यासारख्या जाणवू लागल्या.  त्यांच्या कादंबरीतील व्यक्तिचित्रणामध्ये जे सामर्थ्य अवतरलेले आहे, ते विशिष्ट व्यक्तींच्या रूपांचे यथातथ्य चित्रण केल्यामुळे नव्हे, तर मानवी मनाच्या अवगाहनातून जी सत्ये त्यांना गवसलेली होती, त्यांचा भरभक्कम आधार त्यांना लाभल्यामुळे.  थोडक्यात, मानवी जीवन आणि मानवी मन ह्यांसंबंधीचे हरिभाऊंचे भान हे केवळ तात्कालिक किंवा नैमित्तिक स्वरूपाचे नव्हते, म्हणून विशिष्ट काळाचा संदर्भ सुटल्यानंतर त्यांची कादंबरी नामशेष झाली नाही आणि हरिभाऊंनी जे साध्य केले ते अजूनही दुसऱ्या एखाद्या मराठी कादंबरीकाराला त्या प्रमाणात साध्य करता आले नाही.

असे असले, तरी हरिभाऊंच्या कादंबरीलेखनामध्ये काही वेळा, कलाबाह्य प्रेरणांचा शिरकाव झाला.  त्याचे कारण बोधवादी संस्कारांवर, आदर्शांवर असलेली त्यांची निष्ठा आणि त्या काळाची महत्वाची गरज म्हणून त्यांनी स्वीकारलेली समाजसुधराकाची भूमिका. १८८५ साली मधली स्थिती ह्या कृतीने हरिभाऊंनी आपल्या कादंबरीलेखनाला आरंभ केला त्यावेळी मराठी भाषेचे अभिव्यक्तीचे सामर्थ्य वाढलेले होते, परंतु कादंबरीद्वारा विशिष्ट जीवनानुभूतीचे रूप पारदर्शी स्वरूपात व्यक्त करण्याची तिची क्षमता, मात्र तितकीशी प्रत्ययाला येत नव्हती.  हरिभाऊंच्या पहिल्या लेखनकृतीने, वाचकांचे लक्ष वेधून घेतले, त्यामध्ये त्याच्या प्रत्ययक्षम भाषाशैलीचाही फार मोठा वाटा आहे. बोलभाषेतील सहजता, अकृत्रिमता, नादमयता, प्रवाहित्व ह्या सर्वांचा त्यांनी अतिशय समर्थपणे उपयोग करून घेतलेला आहे.

एकोणिसाव्या शतकातच हरिभाऊ आपट्यांसारखा मराठी कादंबरीचे रूप सर्वांगाने समृद्ध करणारा कादंबरीकार जन्माला आल्यानंतर, वस्तुत: तिच्या एकूण निर्मितीमागील जाणिवांमध्ये देखील फार मोठे परिवर्तन घडून तिची जोमदार परंपरा निर्माण व्हायला हवी होती, पण तसे घडले नाही.  मराठीमध्ये ‘कादंबरी’ ह्या वाङमयप्रकाराला, हरिभाऊंनी जी प्रतिष्ठा आणि लोकप्रियता प्राप्त करून दिली, त्याचे मराठी कादंबरीविश्वावर झालेले परिणाम थोडे वेगळ्या स्वरूपाचे आहेत.  ह्या काळात असंख्या कादंबरीकार उदयाला आलेले असले तरी, हरिभाऊंप्रमाणे गंभीर वृत्तीने जीवनाचा वेध घेऊ पाहणाऱ्या कादंबरीकारांची संख्या नगण्य आहे.  सुधारणेचा मध्यकाळ (१९०६) ही लोकप्रिय कादंबरी लिहिणाऱ्या बाळकृष्ण संतुराम गडकरी ह्यांना ‘विदर्भाचे हरिभाऊ’ अशी उपाधी लावली गेलेली असली, तरी स्वत:च्या काळापलीकडे झेपावण्याचे सामर्थ्य त्यांच्या प्रतिभेत नव्हते. तत्कालीन सामाजिक समस्यांवर स्वत:चे भाष्य करण्यासाठीच त्यांनी कादंबरीचे माध्यम राबविलेले आहे.

नारायण हरि आपटे (१८८९-१९७१), सहकारी कृष्ण (१८८६-१९१६) असे आणखी काही थोड्या वेगळ्या प्रकृतीचे कादंबरीकार ह्या कालखंडात आढळत असले, तरी त्यांच्या कादंबरीलेखनामागील महत्वाची प्रेरणा बोधवादाचे बाळकडू देण्याची आहे. ⇨नाथमाधवांची (१८८२-१९२८) डॉक्टर ही तीन भागांतील कादंबरी (१९१८, १९१९, १९२०) ह्या काळात अतिशय लोकप्रिय झाली, कारण डॉक्टर झालेल्या एका सुशिक्षित स्त्रीने एका अल्पशिक्षित शेतकरी तरुणाशी विवाह केला आणि आर्य पतिव्रतेला साजेशा निष्ठेने त्याच्या सर्व उणिवांकडे डोळेझाक करून त्यांचा संसार सुखाचा केला, हे चित्र जितके कल्पनारम्य तितकेच आदर्श होते.

हरिभाऊंनी निर्माण केलेल्या कादंबरीच्या लेखनादर्शापासून दूर जाणारी कादंबरी ह्या काळात वाढली आणि झपाट्याने फोफावली ती कादंबरीवाचनासाठी उत्सुक बनलेल्या वाचकांच्या कादंबरीविषयक प्रचंड मागणीमुळे, गंभीर वृत्तीने लेखण करणाऱ्याय लेखकांना वाचकांच्या ह्या मागणीनुसार कादंबऱ्यागचा पुरवठा करणे शक्यच नव्हते; त्यासाठी एक वेगळी यंत्रणा अस्तित्वात आली. विविध वाङमयीन नियतकालिकांतून हप्ताहप्ताने कादंबरी देण्याची प्रथा तर सुरूच होती (ती पुढेही बरीच वर्षे चालू राहिली ). पण त्याशिवाय, ह्या काळात अनेक व्यावसायिक स्वरूपाच्या ग्रंथमाला, पुस्तकमाला वा कादंबरीमाला जन्माला आल्या. त्यांचा उदय हे या काळाचे एक महत्वाचे वैशिष्ट्य आहे. काही मालांची नावे अशी – (१) पोतदारांची मनोरंजक व नीतिपर पुस्तकमाला (आरंभ १८८१), सहविचारिणी सभेची ग्रंथमाला (१८९३), कादंबरी संग्रह पुस्तकमाला (१८९६), सुरस ग्रंथमाला (१९१४) इत्यादी.  नियतकालिकांप्रमाणे ह्या मालांचे वर्गणीदार असत आणि त्यांना किती मुदतीत किती आणि कोणत्या स्वरूपाच्या कादंबऱ्याव पुरवल्या जातील, हे मालांचे चालक आगाऊ जाहीर करीत.

वर्गणीदारांना आकर्षित करण्यासाठी त्यांच्यात जोरदार स्पर्धा चालत असे.  अशा परिस्थितीत, स्वाभाविकपणेच ह्या मालांनी कादंबऱ्यासच्या संख्येत खूप भर घातलेली असली, तरी त्यांच्या निर्मितीमागील प्रेरणा बाजारी व यांत्रिक स्वरूपाच्या बनल्या आणि म्हणून कादंबरीतील हरिभाऊनिर्मित चैतन्यही लुप्त झाले. ह्या मालांनी प्रकाशित केलेल्या कादंबऱ्या मध्ये स्वतंत्र, अनुवादित, भाषांतरित, रूपांतरित, आधारित अशा सर्वच प्रकारच्या कादंबऱ्याचा समावेश आहे. परभाषांमधील कादंबऱ्याशमध्ये इंग्रजी व बंगाली भाषेतील कादंबऱ्यायकडे लेखकांनी अधिक धाव घेतलेली दिसते. त्या काळातील एक लेखक नरहरि ह्यांनी सुधारणेचा मनु (१९१६) ह्या आपल्या कादंबरीच्या प्रस्तावनेत लिहिलेले आहे, ‘सध्या सरस, सुरस, गौरव वगैरे उपपदांनी भूषित पुस्तकांच्या मालांवर अथवा मनोरंजनादि मालिकांवर जशी वाचकांची उडी पडते, तशी ती इतर वाङमयावर पडत नाही, ही गोष्ट निराळी सांगण्यास नको.

या कथात्मक वाङमयाची अनिवार आवड उत्पन्न होण्याला एक कारण आम्हांस दिसते, ते प्रणय, प्रेम अथवा अनुराग ह्या गोंडस नावाखाली दिल्या जाणाऱ्यास आषुकमाषुकांच्या गोष्टी हे होय’. कादंबरी म्हणजे आषुकमाषुकांची गोष्ट नव्हे, हा भ्रम हरिभाऊंच्या कादंबरीने दूर केला, तरी त्यांच्याच काळात पुन्हा तो रूढ झाला. कारण रंजक कादंबरीचे लेखनादर्श कोणत्याही काळात फारसे बदलत नाहीत.  तरुण, सुंदर नायक- नायिका, त्यांचे परस्परांवरील स्वर्गीय प्रेम, त्यात दैवदुर्विलासामुळे किंवा खल व्यक्तिंच्या कारस्थानांमुळे निर्माण होणारे अडथळे, शेवटी प्रेमसाफल्य किंवा प्रेमभंग ‘चित्तवेधक’  ‘चटकदार’ ‘ह्रदयंगम’, कादंबरीचा सांगाडा होता. वाचकांच्या मनाची पकड घेणारा, त्यांचे स्वप्नरंजन करणारा अन्य तपशील त्यांत भरला जाऊन कल्पनारम्य प्रकृतीची कादंबरी सहजपणे निर्माण होई.  ह्या काळातील अशा कादंबरीवर वाचक लुब्ध होता, याचे आणखी एक कारण म्हणजे तिच्या रचनेतील चातुर्य. ह्या चातुऱ्यामुळे खऱ्यायखुऱ्याय, अस्सल जीवनानुभूतीतून स्फुरलेली कादंबरी आणि ही कल्पनारम्य कादंबरी ह्यांत सकृद्दर्शनी कोणताही फरक जाणत्या, सुबुद्ध वाचकांनाही जाणवत नसे.

त्यामुळे कादंबरीच्या मूल्यमापनातदेखील बरेच घोटाळे निर्माण झाले.  पुढे मराठी कादंबरीच्या विकासातील एक महत्वाचा टप्पा म्हणून नारायण सीताराम फडके (१८९४-१९७८) ह्यांचा निर्देश होऊ लागला तो ह्याच घोटाळ्यामुळे. कादंबरीच्या हुकमी निर्मितीसाठी तिचे रचनातंत्रदेखील तितकेच हुकमी असावे लागते त्यावर लेखकाची पूर्ण पकड असावी लागते.  ह्या काळात ‘मागणी तसा पुरवठा’ ह्या न्यायाने कादंबऱ्या लिहिणाऱ्या लेखकांनी नेमके हेच केले.  म्हणूनच कादंबरीचा आशय कोणताही असला, तरी तिचे रचनातंत्र सहसा बदलत नसे, नावीन्यासाठी जो काय थोडाफार बदल झाला असेल तेवढाच.  हुकमी परिणाम साधण्यासाठी ह्या काळात भावविवश चित्रणाला आणि अलंकृत भाषाशैलीला प्राधान्याने राबविण्यात आले.

हरिभाऊंचे एक समकालीन परंतु त्यांच्यापेक्षा वेगळ्या ढंगाची कादंबरी लिहिणारे कादंबरीकार म्हणून वामन मल्हार जोशी (१८८२-१९४३)) ह्यांचे नाव घेतले जाते.  हरिभाऊंची अखेरची कादंबरी वज्राघात आणि वामन मल्हारांची पहिली कादंबरी रागिणी ह्या एकाच वर्षी (१९१५) प्रसिद्ध झाल्या. हरिभाऊंप्रमाणे वा वामन मल्हारांचा पिंड संवेदनशील कलावंताचा नव्हता.  प्रगल्भ व्यक्तिमत्व, ज्ञानपिपासू वृत्ती, जीवनाकडे पाहण्याची स्वच्छ, समंजस, उदार भूमिका आणि जीवनातल्या कोणत्याही क्षेत्रातील प्रश्नांची, समस्यांची सखोल व निःपक्ष भूमिकेतून उकल करू पाहणारी चिंतनशक्ती ह्यामुळे वामन मल्हारांचे एकूणच व्यक्तित्व, ह्या काळातील अन्य कादंबरीकारांपेक्षा वेगळे उमटून दिसते होते.  वामन मल्हारांच्या सर्वच कादंबऱ्याब ह्या कमीअधिक प्रमाणात त्यांच्या व्यक्तित्वाचा आविष्कार करीत आहेत.  आपल्या कादंबरीविश्वातील व्यक्तींना, वामन मल्हारांनी ज्या विविध मतांच्या, विचारांच्या, वादांच्या, व्यक्तींच्या ‘वर्तन’  विषयक युक्तायुक्त भूमिकांच्या रिंगणात खेचले आणि मोठ्या कौशल्याने झुंजविले ती झुंज वाचकांनाही आवडली, एवढेच नव्हे तर तिने त्यांना विचारप्रवृत्तही केले.  मात्र वामन मल्हारांनी ज्या उद्दिष्टाने प्रेरित होऊन कादंबऱ्यात लिहिल्या, ते बरेचसे कलाबाह्य स्वरूपाचे असल्यामुळे त्यांची कादंबरी मराठी कादंबरीच्या विकासाच्या दृष्टीने कोणतेही महत्वाचे स्थित्यंतर घडवून आणण्यास असमर्थ ठरली.

फडके-युग (१९२०-१९५)

ह्या आधीच्या कालखंडात मूळ धरलेल्या रंजक कादंबरीची वाढ याही कालखंडात सातत्याने चालू राहिली. एवढेच नव्हे, तर तिला फार मोठी प्रतिष्ठाही प्राप्त झाली; कारण रंजक कादंबरीकारांचे अग्रणी ना.सी. फडके हेच कलाजीवन वादातील ‘कलेसाठी कला’ ह्या पक्षाचे प्रमुख पुरस्कर्ते होते. वाङमयीन निर्मितीमागे प्रचारकी, बोधवादी स्वरूपाचे कोणतेही उद्दिष्ट असू नये, ही त्यांची भूमिका योग्य होती. मात्र, कादंबरीच्या निर्मितीप्रक्रियेला त्यांनी जे यांत्रिक रूप दिले, त्यामुळे ती अचेतन, निष्प्राण बनली.  कादंबरीच्या अनेकविध घटकांचे मिश्रण आणि चित्रण तंत्रशुद्ध पद्धतीने फडके करू शकले, कारण त्यांना फक्त वाचकाचे मन आकर्षित करणारी ‘देखणी’ किंवा ‘मोहक’, वास्तवापासून दूर पण वास्तवसदृश, स्वप्नरंजनात्मक ‘कादंबरी’ च घडवायची होती.  अशा कादंबरीचा त्यांनी तयार केलेला साच विलक्षण प्रभावी ठरला, हे त्यांच्या जादूगार (१९२८), दौलत (१९२९), अटकेपार (१९३१) इ. अनेक कादंबऱ्या ना लाभलेल्या अमाप लोकप्रियतेवरून लक्षात येते.  ‘कलेसाठी कला’ ही भूमिका घेताना, ज्या कुशल कारागिरीसाठी (कथानकाची रचना, घटना-प्रसंग, व्यक्तिचित्रण, संवादलेखन, वातावरणनिर्मिती, भाषाशैली इ.) त्यांचे कादंबरीवाङमय वाखाणले जात होते, त्याच कारागिरीला ते कलेची प्रतिष्ठा देऊ पाहात होते.  ह्या कालखंडामध्ये, फडक्यांनी निर्माण केलेल्या लेखनसंकेतांचा मोह झुगारून देणे,  श्रीधर व्यंकटेश केतकर (१८८४-१९३७), मालीताबाई बेडेकर (विभावरी शिरूरकर- १९०५) यांसारखे काही मोजके अपवाद वजा जाता, अन्य कादंबरीकारांना फारसे जमले नाही आणि म्हणून एकूण मराठी कादंबरीलाही तांत्रिक चौकटीच्या दडपणातून मुक्त होऊन बनावट, कृत्रिम, निष्प्राण रूपाचा लवकर त्याग करता आला नाही.

पहिले महायुद्ध, १९१७ मध्ये रशियात झालेली साम्यवादी क्रांती व त्यामुळे मार्क्सवादी विचारसरणीचा वाढू लागलेला प्रभाव, फ्रॉइड व अन्य मानसशास्त्रज्ञांनी व्यक्तिमनाचे केलेले सखेल संशोधन, गांधीवाद इत्यादींमुळे ह्या काळखंडातील मराठी कादंबरीच्या अनुभवक्षेत्रात मात्र काही महत्वाची स्थित्यंतरे घडली.  मार्क्सवादाच्या प्रभावामुळे, श्रमजीवी कामगार व दलित वर्गाचे जीवन चित्रित होऊ लागले (नारायण विनायक कुलकर्णीकृत मजूर, १९२५).  आर्थिक विषमतेमुळे अस्तित्वात आलेली वर्गीय समाजरचना व ती उन्मळून टाकण्यासाठी आवश्यक असणारी क्रांती, ह्यांचे स्वरूप विशद केले जाऊ लागले (पु.य. देशपांडे, नवे जग,  १९४१).

गरीब-श्रीमंतांमधील संघर्षाला उठाव मिळू लागला (वि.स. खांडेकर, दोन ध्रुव, १९३४).  जातीयतेच्या खुळ्या समस्येचा वेध घेतला जाऊ लागला (ग.त्र्यं. माडखोलकर-चंदनवाडी), १९४३).  कोणत्याही गुलामगिरीविरुद्धच्या बंडाचे पडसाद उमटू लागले (वि.वा. हडप-गोदाराणी, १९४७).  पुरुषाप्रमाणेच स्त्रीच्या स्वतंत्र व्यक्तिमत्वाची दखल घेतली जाऊ लागली (कुमुदिनी प्रभावळकर-कुस्कुरलेलं ह्रदय,  १९३८).  त्याचप्रमाणे विशिष्ट सामाजिक परिस्थितीमुळे व्यक्तित्वविकासावर पडणार्या् मऱ्यादांचे दर्शन घडविले जाऊ लागले (ग.त्र्यं. माडखोलकर- मंगलेले देऊळ, १९३४).  मनोविश्लेषणात्मक पद्धतीने व्यक्तिमनाची गुंतागुंत, त्याचे पापुद्रे उकलण्याचे प्रयत्न होऊ लागले.  व्यक्तीच्या मनात दडल्या- दडपलेल्या वासना-विचारांचा मोकळेपणाने वाव मिळू लागला. स्त्री-पुरुषांमधील आकर्षण व प्रेमसंबंध पापपर न समजता निसर्गसुलभ मानले जाऊन त्यांची निःसंकोचपणे अभिव्यक्ती होऊ लागली (पु.य.देशपांडे – काळी राणी, १९४१).  शहरी जीवनाबरोबर ग्रामीण जीवनाचे रंगही खुलविले जाऊ लागले (भा.वि. वरेरकर –फाटकी वाकळ, १९४१). कादंबरीविश्वात वाहू लागलेले हे नवे वारे आणि ह्या काळात निर्माण झालेले अनेक वाङमयीन वाद ह्यांचा निकटचा संबंध आहे.

नवमतवाद- जीर्णमतवाद, पुरोगामी-प्रतिगामी वाङमय, वास्तववाद-ध्येयवाद, कलेचे आणि म्हणून वाङमयाचे व्यक्तिनिष्ठ आणि काल-परिस्थिती-समाजनिष्ठ रूप, श्लील-अश्लील, अशा अनेक वादांना तोंड फुटून कादंबरीकारांनाही पुरोगामी, प्रतिगामी, नवमतवादी, ह्यांसारखी विशेषणे जोडली जाऊ लागली.  उदा., विभावरी शिरूरकरांना नवमतवादी लेखिका मानले गेले; कारण आपल्या हिंदोळ्यावर (१९३४) ह्या पहिल्याच कादंबरीत त्यांनी लग्नबाह्य संबंध ठेवणारी परित्यक्ता स्त्री चित्रित केली.  ह्या कादंबरीमुळे तत्कालीन वाङमयीन विश्वात खूपच प्रक्षोभ उसळला होता.  रूढ, परंपरागत विचारसरणीला धक्का देणाऱ्या बंडखोर स्त्रिया, भार्गवराम विठ्ठल वरेरकरांच्या कादंबरीविश्वातही आढळतात परंतु निर्मात्याच्या आग्रही आणि अतिरेकी भूमिकेमुळे त्यांची प्रत्ययक्षमता उणावलेली आहे.

ह्या कालखंडातील वाचकांच्या अभिरुचीचे एक वैशिष्ट्य दिसते ते असे, की कलावादी फडके आणि जीवनवादी विष्णु सखाराम खांडेकर (१८९८-१९७६) हे दोघेही त्यांचे सारखेच आवडते कादंबरीकार होते. एकीकडे फडक्यांची कुशल कारागिरी त्यांना मोहवीत होती, तर दुसरीकडे खांडेकरांचा ध्येयवाद लोभवीत होता.  कादंबरीने स्वप्नरंजनात्मक विश्वात गुंग न होता, प्रत्यक्ष सभोवतालच्या प्रखर वास्तवाला सामोरे व्हावे, त्याचप्रमाणे जीवन कसे असावे याचेही उदबोधक चित्रण तिने करावे असे प्रामाणिकपणे जाणवत असताही खांडेकरांची कादंबरी फडक्यांनी निर्माण केलेल्या लेखनसंकेतांना बळी पडली आणि तिच्या प्रकृतीत एक आंतरिक विरोध निर्माण झाला.  आर्थिक विषमता, दारिद्र्य, गरीब-श्रीमंत संघर्ष, कामगार वर्गींचे जीवन, ह्या सर्वांना त्यांच्या कादंबरीविश्वात मिळालेले स्थान कलादृष्ट्या उपरे जाणवू लागले.  ह्याशिवाय, कल्पनाचमत्कृती, कोटीबाजपणा, अलंकारप्रियता,  सुभाषितवजा वाक्यांची बेसुमार पखरण, ह्यांच्यामुळे (त्यांच्या कादंबरीच्या लोकप्रियतेत भर पडली तरी) तिचे रूप अधिकच अवास्तव बनले.

फडके-खांडेकरांच्या कादंबरीने नवोदित लेखकांवर जे संस्कार केले, त्यामुळे फडके-खांडेकरी पद्धतीच्या लेखनाची एक परंपराच निर्माण झाली.  फडके –खांडेकराप्रमाणे ज्यांच्या कादंबरीने ह्या कालखंडावर आपला प्रभाव पाडला,  असे आणखी एक कादंबरीकार म्हणजे गजानन त्र्यंबक माडखोलकर.  माडखोलकरांची कादंबरी मुख्यत्वे एक पत्रकार म्हणून त्यांना आलेल्या अनुभवांवरच.पोसलेली आहे.  त्यामुळे स्वाभाविकपणेच चालू राजकारणाचा तपशील तीत बऱ्यालच प्रमाणात अवतरलेला आहे.  मुखवटे (१९४०) सारख्या एखाद्या कादंबरीचा थोडाफार अपवाद वजा जात, बहुतांश कादंबऱ्यातील तपशील इतिहासाच्या पातळीवर आहे.  फडके-खांडेकरांप्रमाणे माडखोलकरांनादेखील स्वप्नरंजनाचे वावडे नाही.  परंतु माडखोलकरांच्या कादंबरीविश्वातील व्यक्तिरेखा अगदीच कणाहीन नाहीत. पु.य देशपांडे (१८९९) ह्यांच्या बंधनाच्या पलीकडे (१९२७) झेपावणाऱ्यात पहिल्याच कादंबरीने वाङमयीन क्षेत्रात खूप खळबळ माजली.

साम्यवादी संस्कारांच्या संदर्भात त्यांची कादंबरी फारशी वेगळी जाणवत नसली, तरी तिचे दुसरे एक वेगळेपण आहे.  पु.यं. ची चिंतनशक्ती सभोवतालच्या वास्तवाचा अन्वयार्थ लावीत असतानाच विश्वाच्या अनाकलनीय गूढ कोड्याकडे वळते; त्यामुळे त्यांच्या कादंबरीतील व्यक्तिरेखाही कधी मानवी पातळीवर, तर कधी प्रतीकात्म रूपे धारण करून अ-मानवी पातळीवर हेलकावत असतात.  ह्या कालखंडातील मराठी कादंबरीच्या सर्वसामान्य प्रवृत्ती-प्रवाहांपासून श्री.व्यं. केतकरांची कादंबरी पूर्णपणे अलिप्त राहिलेली आहे.  केतकरांचे व्यक्तित्व, मूलतः एका समाजशास्त्रज्ञाचे व ज्ञानसंग्रहाची अनिवार ओढ असणाऱ्याक व्यक्तिचे आहे.  त्यामुळे त्यांची कादंबरी काही सामाजिक समस्या व प्रश्न उपस्थित करते व मानवी जीवनात त्यांची मुळे कुठे कुठे आणि किती खोलवर रुजलेली-गुंतलेली आहेत ह्याची सांगोपांग उकल करते.  मात्र ही उकल करताना केतकर, मानवी मनाच्या आणि जीवनाच्या व्यवहारांना समाजशास्त्रीय आडाख्यांच्या पलीकडे फारसे जाऊ देत नाहीत.  रूढ, परंपरागत विचारसरणीवर आघात करणाऱ्याव त्यांच्या ब्राह्मणकन्या (१९३०) ह्या कादंबरीतील कालिंदीने ह्या काळात एक मोठेच वैचारिक वादळ निर्माण केले.

प्रगत मानसशास्त्राच्या परिणामामुळे ज्या मनोविश्लेषणप्रधान कादंबऱ्या अस्तित्वात आल्या, त्यांत बाळ सीताराम मर्ढेकरांची रात्रीचा दिवस (१९४२) ही कादंबरी, प्रयोग करण्याच्या हेतूनेच लिहिली गेलेली आहे. जन्मल्यापासून मरेपर्यंत प्रत्येक व्यक्तीची जीवनयात्रा म्हणजे एक अखंड, अप्रतिहत मनोव्यापारांनी व त्यांच्या गुंतागुंतीच्या परस्परसंबंधांनी बनलेला संज्ञाप्रवाह असतो, ह्या जाणिवेपोटी मर्ढेकरांनी, एका व्यक्तिच्या, काही कालातील तीन थरी (सुप्त, जागृत व अर्धजागृत) संज्ञाप्रवाहाचे चित्रण करण्याचा प्रयत्न केला; परंतु तो अत्यंत यांत्रिक व म्हणून निर्जीव बनला.  मर्ढेकरांपेक्षा वसंत कानेटकरांनी, त्यांच्या घर (१९५१) ह्या कादंबरीत ह्या पद्धतीचा अधिक कलात्म उपयोग केलेला आहे.   ह्या युगामध्ये कादंबरीच्या कलात्मरूपाचा खऱ्या अर्थाने प्रत्यय आणून देणारी एकमेव कादंबरी म्हणजे विश्राम बेडेकरांची (१९०६) रणांगण (१९३९). मराठी कादंबरीविश्वात आजही तिचे स्थान अनन्यसाधारण आहे.  युद्ध ही मानवी जीवनातील एक तात्कालिक स्वरूपाची घटना; परंतु ह्या घटनेमुळे समग्र जीवनाला मुळापासूनच कसे हादरे बसतात, तडे जातात, ह्याचे अतिशय प्रत्ययक्षम दर्शन ह्या कादंबरीद्वारा बेडेकरांनी घडविलेले आहे.

१९५०–१९७५: सर्वसामान्यपणे १९५० च्या आसपास मराठी कादंबरीच्या निर्मितीमागील प्रेरणांमध्ये पुन्हा काही महत्वाचे फेरबदल घडले. श्रीपाद नारायण पेंडसे (१९१३), व्यंकटेश माडगूळकर (१९२७), गोपाल नीलकंठ दांडेकर (१९१६), उद्धव शेळके (१९३१) असे जे कादंबरीकार ह्या सुमारास उदयाला आले, त्यांच्यासमोर फडकेयुगातील कादंबरीचे लेखनादर्श नव्हते. ह्या कादंबरीकारांची व्यक्तित्वे ज्या प्रदेशात घडलेली होती, तो प्रदेश त्यांच्या अनुभवविश्वाचा एक अविभाज्य घटक बनला होता.  आपल्या कादंबरीद्वारा ह्या अनुभवविश्वाची प्रामाणिकअभिव्यकती करण्याचा प्रयत्न त्यांनी केल्यामुळे विशिष्ट प्रदेश अगदी सहजपणेच त्यांच्या कादंबरीविश्वाचाही घटक बनला आणि श्री.ना. पेंडसेकृत हद्दपार (१९५०), गारंबीचा बापू (१९५२); व्यंकटेश माडगूळकरांची बनगरवाडी (१९५५), दांडेकरांची पडघवली (१९५५) आणि उद्धव शेळक्यांची धग (१९६०), ह्यांसारख्या कादंबऱ्या जन्माला आल्या. फडके-युगातील कादंबरीच्या साचेबंद रूपाची जाणीव अशा प्रकारे बरीचशी विरल्यामुळे, ह्या कालखंडातील मराठी कादंबरीला मुक्त वातावरणात स्वत:च्या वेगवेगळ्या रूपांचा शोध घेणे शक्य झालेले आहे.

ह्याचा अर्थ पलायनवादी, स्वप्नरंजनात्मक, उदात्तीकरणाच्या प्रेरणेतून जन्माला आलेल्या कादंबऱ्याचे आकर्षण पूर्णपणे संपुष्टात आलेले आहे, असा नव्हे.  थोरले माधवराव पेशवे ह्यांच्या जीवनावर लिहिलेल्या रणजित देसाई ह्याच्या स्वामी (१९६२) ह्या कादंबरीला जी अमाप लोकप्रियता लाभली, तिचे इंगित माधवरावांच्या उदात्त प्रतिमेत आणि रमा, - माधवांच्या कल्पनारम्य चित्रणातही आहे.  ह्या कादंबरीनंतर इतिहासातील व्यक्तिरेखांवर आधारलेल्या कादंबऱ्यातची (उदा., झेप, १९६३, झुंज, १९६६) लाट उसळली. इतिहासाप्रमाणेच व्यक्तींच्या चरित्रांवर आधारलेल्या कादंबऱ्यासचाही एक गट आता तयार होऊ लागला.  श्री.ज. जोशी ह्यांच्या आनंदी गोपाळ (१९६८) ह्या कादंबरीला वाचकांचा चांगला प्रतिसाद लाभल्यामुळे ह्या अशा चरित्रात्मक कादंबऱ्या च्या निर्मितीला प्रेरणा मिळाली.  १९५९ मध्ये वि.स. खांडेकरांची ययाति कादंबरी अवतरली आणि पुराणांतरीच्या व्यक्तिरेखांकडे विशेषतः कर्णाकडे-कादंबरीकारांचे लक्ष वेधले गेले. पौराणिक कथेला वर्तमानाच्या संदर्भात अर्थपूर्ण करण्याची प्रक्रिया अवघड असल्यामुळे ह्या कादंबऱ्या तितक्याशा यशस्वी झालेल्या नाहीत.  विज्ञान, भय, ह्यांच्यावर आधारलेल्या कथात्मवाङमयात रंजनाचे सामर्थ्य असल्यामुळे काही कादंबरीकारांचा कल, अशा कादंबऱ्याचच्या निर्मितीकडे झुकू लागलेला आहे.

अनेकविध कारणांमुळे अत्यंत गुंतागुंतीच्या बनलेल्या वर्तमान युगातील माणूस आणि त्याचे जीवन आजच्या मराठी कादंबरीतही, अनेकविध परिमाणांसह चित्रित केले जात आहे.  ह्या माणसाच्या आणि त्याच्या जीवनाच्या रूपाची अभिव्यक्ती करण्यासाठी केवळ पूर्वापार चालत आलेल्याच नव्हे, तर कादंबरीविषयक लेखनसंकेतांच्या कोणत्याही कुबड्या अत्यंत अपुऱ्याण आणि अनावश्यकही असल्याची जाणीव काही कादंबरीकारांना तरी निश्चितपणे झालेली आहे.एवढेच नव्हे, तर ज्या भाषेद्वारा ही अभिव्यक्ती साधायची, ती भाषादेखील नव्याने घडविण्याची गरज त्यांना जाणवू लागली आहे. अशा परिस्थितीत ह्या कादंबरीकारांनी जन्माला घातलेल्या कादंबऱ्याची रूपे एकसाची, एकजिनसी दिसणे अशक्यच आहे. जयवंत दळवी ह्यांनी आपल्या चक्रद्वारा (१९६३) मुंबईमधील झोपडपट्टीत राहणाऱ्याव व्यक्तींच्या जीवनाचा वेध घेताना, कादंबरीच्या सांकेतिक चौकटीत ते कोंबण्याचा प्रयत्न केला नाही. ह्याचा अर्थ, ह्या कादंबरीच्या निर्मितीमागे कलात्म जाणिवाच नाहीत, असा नाही; उलट त्या अधिक संपन्न आहेत.  हकीकत व जटायु (१९७२) लिहिणाऱ्या केशव मेश्रामांनी, गावकुसाबाहेरच्या जीवनात घडणाऱ्यात स्थित्यंतरांचे चित्रण करताना अभिव्यक्तीबाबत वेगळ्या पऱ्यायाची निवड केलेली आहे.

स्वत:ची विशिष्ट संवेदनशीलता व त्यामुळे प्रतीत होणाऱ्या अनुभवविश्वाशी अधिक प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न केल्यामुळे भालचंद्र नेमाडे ह्यांच्या कोसलाच्या (१९६३) अभिव्यक्तीचा ढंगही अगदी वेगळा झालेला आहे.  ह्या संदर्भात पु.शि. रेगे –सावित्री (१९६२), चिं.त्र्यं. खानोलकर-अजगर (१९६३), ए.वि. जोशी काळोखाचे अंग (१९६६), व.ह. पिटके-शिदोरी (१९६९), वि.ज. बोरकर-अनाहत (१९७०), मनोहर शहाणे-पुत्र (१९७१), आनंद यादव–गोतावळा (१९७१), वसंत वरखेडकर – प्रतिनिधी (१९७१), अरुण साधू –मुंबई दिनांक (१९७२), किरण नगरकर–सात सक्कं त्रेचाळीस (१९७४) ह्या व अशा अनेक कादंबऱ्या ६ चा निर्देश करता येण्यासारखा आहे.  थोडक्यात, वर्तमान युगातील मराठी कादंबरी अनेकविध अंगांनी जीवनाला सामोरी होत असल्यामुळे आणि तिची प्रत्ययक्षमता उणावणाऱ्या साचेबंद लेखनसंकेतांना फाजील महत्व देत नसल्यामुळे तिच्या वृत्तीत अधिक प्रयोगशीलता आलेली आहे.

मराठी कादंबरीच्या विकासाबाबत साफल्याने विचार करता असे म्हणावे लागते, की उत्तुंग प्रतिभेच्या कादंबरीकारांचा अभाव अजूनही तीव्रतेने जाणवतो आहे.  पण असे असले तरी, सध्या अत्यंत संवेदनाशील वृत्तीच्या, तीव्र बुद्धिमत्तेच्या, धीटपणे कोणत्याही अनुभवाचे दर्शन घडवू शकणाऱ्याध आणि जागतिक पातळीवरील वाङमयाच्या क्षेत्रातील विविध प्रवृत्ती-प्रवाहांची जाण असणाऱ्यार कादंबरीकारांची संख्या हळूहळू वाढत असल्यामुळे, मराठी कादंबरीचे, अधिक मोठी आव्हाने पेलण्याचे सामर्थ्य वृद्धिंगत होत आहे.

 

लेखिका :  उषा हस्तक

माहिती स्रोत :  मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 3/8/2024



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate