राज्याच्या उत्तरेच्या पठारभागाची माती लाल आहे. इकडे ग्रॅनाइट खडक जास्त असल्याने त्याची रेती मातीत असते. या भागात पाणी धरून ठेवणाऱ्या चिकणमातीचेही काही प्रमाण जमिनीत आहे. मध्यपठारावरच्या मृदा विविध प्रकारांच्या आहेत. खडकापासून बनलेली माती, वाऱ्या-पावसाने वाहून आणलेली धूळ आणि गंजाम जिल्ह्याच्या ईशान्येतील व महानदीच्या दोन्ही काठांची कपाशीची काळी माती. आणखीही वेगवेगळ्या जातींच्या मृदा मध्यपठारावर सापडतात. किनाराभागात दुमट माती आहे. ओरिसाच्या मृदांची संपूर्ण पाहणी अजून झालेली नाही.
राज्यात लोहधातुकाचे प्रचंड साठे आहेत. ६० प्रतिशतपेक्षा अधिक लोहांश देणारे कच्चे खनिज विशेषत: सुंदरगढ, केओंझार व मयूरभंज जिल्ह्यांत सापडते. कटक जिल्ह्यातही नवे साठे मिळाले आहेत. भारतातले २० प्रतिशत मँगॅनीज केओंझार, सुंदरगढ, बोलानगीर व कालाहंडी जिल्ह्यांत निघते. केओंझार, धेनकानाल व कटक जिल्ह्यांत क्रोमाइट उपलब्ध आहे. धेनकानालच्या तालचेर तालुक्यात भरपूर कोळसा मिळतो. गंजाम जिल्ह्याच्या गंगपूर भागात डोलोमाइट व चुनखडक काढण्यात येतात.
महानदी, ब्राह्मणी व वैतरणी या राज्यांतल्या मुख्य नद्या वायव्येकडून आग्नेयीकडे जवळजवळ समांतर वहात जाऊन बंगालच्या उपसागराला मिळतात. त्यांच्याखेरीज राज्यात उत्तर भागात सालंदी, बुराबलंग व सुवर्णरेखा आणि दक्षिण भागात ऋषिकूल्या, वंशधारा, नागावली, इंद्रावती, कोलाब आणि मचकुंद या लहान नद्या आहेत. मध्य प्रदेशातून येणारी महानदी ओरिसात ८५३ किमी. लांब वाहते. ती येथील सर्वांत मोठी नदी असून १,३२,६०० चौ. किमी. क्षेत्रातले पाणी वाहून नेते आणि महापुराचे वेळी ४४,८०० घमी. से. किंवा जवळजवळ गंगेइतके पाणी बंगालच्या उपसागरात सोडते. अशा वेळी तिचे पात्र दीड किमी. पेक्षाही जास्त रुंदावते. ती अनेक मुखांनी सागराला मिळते. या व दुसऱ्या दोन नद्यांच्या मुखप्रवाहांचे एक जाळेच त्यांच्या त्रिभुजप्रदेशात बनले आहे. ओरिसातले मोठे जलाशय म्हणजे हिराकूद धरणाने झालेला तलाव आणि भरतीच्यावेळी खाऱ्या व ओहोटीच्यावेळी गोड्या पाण्याचे किनाऱ्याच्या आतले चिल्का सरोवर हे होत. राज्याचा ४८२ किमी. लांबीचा समुद्रकिनारा रेताड व नद्यांच्या गाळाने उथळ बनलेला आहे.
कर्कवृत्ताच्या दक्षिणेस एकच अंशावर उत्तरसीमा असणारे हे राज्य उष्ण कटिबंधात अतएव स्वाभाविकतः उष्ण वायुमानचे आहे. वातावरणाच्या कमी दाबाच्या पट्ट्यात येत असल्याने येथील पर्जन्यप्रमाण मध्यम आहे; वेगवेगळ्या भागांच्या उंचसखलपणामुळे त्यांत थोडेबहुत फेरफार होतात. उन्हाळ्यात पूर्वेकडील टेकड्या व उत्तरेकडचे पठार यांच्या उंचीवरची ठिकाणे वगळता सर्वत्र सामान्य तपमान ३८ से. असते व किनाऱ्याकडून अंतर्भागाकडे ते वाढत जाते. थंडीच्या दिवसात सरासरी तपमान २२·८० ते १५० से. पर्यंत उतरते. पावसाळ्यात सरासरी वार्षिक १४८ सेंमी. पाऊस पडतो. अरबी समुद्र व बंगालचा उपसागर या दोन्हींवरचे मान्सून प्रवाह या राज्यात एकत्र येतात. नैर्ऋत्य मान्सूनचे काळात बंगालच्या उपसागरावून किनाऱ्यावर पुष्कळदा तुफाने येतात. याच सुमारास ईशान्य मान्सूनचे काही झोत पूर्वेकडच्या टेकड्यांवर येतात. राज्यात झालेल्या १९७१च्या तुफानाने फार नुकसान झाले.
राज्याचा ४२ प्रतिशत, मुख्यत: पश्चिमेकडचा भूप्रदेश वनाच्छादित आहे. त्यात शाल, साग, शिसवी, पिआसाल, कुरूम, चाफा व गंभर या जातींचे वृक्ष आहेत. इमारती व इतर बहुमोल लाकडांखेरीज बाकीचा लाकुडफाटा जळणाच्या कामी येतो. बांबूची बेटेही विस्तीर्ण क्षेत्रांवर आहेत. त्यांचा विनियोग कागद-गिरण्या करतात. बिड्या वळण्यासाठी उपयोगी पडणाऱ्या तेंदूच्या पानांचे उत्पादनही बऱ्याच प्रमाणात होते. ओरिसाच्या जंगलातून सर्पगंधासारख्या कित्येक औषधी वनस्पती आणि थोड्याफार प्रमाणात मध व लाखजमा करण्यात येते. वन्यप्राण्यांपैकी या राज्यात वाघ, हत्ती व चित्ते विपुल आहेत. वायव्यभागात काही रानरेड्यांचे कळप आहेत. महानदी व ब्रह्मणी नद्यांच्या मुखाशी सुसरी आढळतात. चिल्का सरोवरात पाणबदके व स्थलांतर करणाऱ्या काही पक्ष्यांच्या जाती आढळतात. मयूरभंज जिल्ह्यात वन्यपशुसंरक्षणार्थ १,०४० चौ. किमी. क्षेत्राचे सिमिलीपाईगिरी अभयारण्य आहे. तशीच संरक्षित क्षेत्रे चंडका व खंडगिरी येथे करण्याची योजना आहे. कालाहंडी व कोरापुट जिल्ह्यांतील काही वनप्रदेश १९५८ साली सुरू झालेल्या दंडकारण्य निर्वासित-पुनर्वसन योजनेत गेला आहे.
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 7/19/2020
राज्याचे सामान्यत: चार नैसर्गिक विभाग पडतात. (अ) उ...
ओरिसा राज्यातील एक अध्यापनात्मक-निवासी विद्यापीठ.
ओरिसा राज्यातील ई-शासन व त्याच्या वेब लिंक्स येथे...
कटक : ओरिसा राज्याची १९५८ पूर्वीची राजधानी; आता कट...