रंग ही होळीची अलिकडे झालेली ओळख. परंतु होळीसह रंगपंचमीचा खरा अर्थ जो समजून घेईल तो नक्कीच पर्यावरणपूरक होळीचा, रंगपंचमीचा पुरस्कर्ता ठरेल. सण हे आनंदाने साजरे करण्यासाठी असतात. ते साजरे करताना आपण आनंद शोधतो तसाच सभोवतालच्या पर्यावरणाचा विचार करणेही गरजेचे आहे.
होळी म्हणजे रंगांची उधळण तर आपल्या मनातल्या, परिवारातल्या इतकेच काय तर समाजातल्या नकारात्मतेला जाळून टाकण्याचा सण. पण आज भावना कितीही पवित्र असल्या तरीही त्या पावित्र्याने साजऱ्या केल्या जातातच का ? याचा विचार प्रत्येकाने करण्याची गरज निर्माण झाली आहे. आज रासायनिक रंग आणि मोठमोठ्या जळणाऱ्या होळ्या यामुळे पर्यावरणाचा मोठा प्रश्न निर्माण होत आहे. आपल्या पर्यावरणाचे संवर्धन कसे करता येईल हे पाहणे आपल्या सर्वांचीच नैतिक जबाबदारी आहे. त्यामुळे आपापल्या संस्कृती जपत होळी कशी इकोफ्रेंडली होईल यासाठी सर्वांकडून प्रयत्न व्हायला हवा.
होळी म्हटलं की लाकडं आली व आजच्या घडीला इतकी लाकडं कुठून आणायची. त्यामुळे कितीतरी “एरंडाच्या” झाडांची कत्तल आणि पाण्याचा मोठ्या प्रमाणावर होणारी नासाडी हे कदापि पटणारे नाही. पर्यावरणावर परिणाम करणारी दुष्काळ, अतिवृष्टी, गारपिटी या माध्यमातून संकटे जाणवतात. तिथे आपल्याला पर्यावरणाला हानी पोहोचवणारे उत्सव साजरे करण्याचा अट्टाहास योग्य आहे का ? याचाही विचार आपणाला करायला हवा. इकोफ्रेंडली होळी साजरी करण्यासाठी आपल्यासमोर अनेक मार्ग असतील पण असे मार्ग निवडायला हवेत, ज्यामुळे नक्कीच परिवर्तन होईल आणि पर्यावरणाचा ऱ्हास रोखता येईल. हा प्रयत्न आपल्याकडे या होळीला झाला आहे याचे समाधान वाटत आहे. आज संपूर्ण भारताचा विचार करता साजरी केलेली होळी इकोफ्रेंडली होती. मोठ्या प्रमाणावर होणारी “एरंडाच्या” झाडांची कत्तल कमी झाली असून होळी ही छोटी करून हवेचे प्रदूषण होणार नाही याची काळजी सर्वांकडून घेण्यात आली आहे. इकोफ्रेंडली होळी साजरी करण्यासाठी ही चांगली सुरुवात आहे.
महत्वाची आणि चिंतेची बाब म्हणजे होळीच्या दुसऱ्या दिवशी खेळली जाणारी धूळवड. यादिवशी मोठ्या प्रमाणावर पाण्याची नासाडी केली जाते. पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत असताना पाण्याची अशी नासाडी करणे योग्य नाही. याची जाणीव आज संपूर्ण राज्याला झाली असून यावेळी राज्यासह देशातील विविध ठिकाणी होळी असेल किंवा आपल्याकडील धुळवड ती पाण्याविना करण्यात आली आहे. एकमेकांना पाण्याने भिजविण्यापेक्षा फक्त प्रतिमात्मक स्वरुपात थोडेफार सुके रंग लावून तरुणांसह आबालवृद्धांनी धुळवड साजरी केली आहे.
पूर्वी काही ठिकाणी तर शॉवर लावून रंगात चिंब भिजण्याची हौस पूर्ण केली जात असे. पण यावेळी यावर आळा घालण्यात आला आहे. पर्यावरणस्नेही होळी आणि धुळवड साजरी केली असून आता रंगपंचमीही अशाच पर्यावरण पूरक विचारांचे आणि कृतींची काळजी घेऊन खेळायला हवी. सुके रंग, फुलांच्या, पानांच्या रंगांची होळी आपण खेळली असून तशीच रंगपंचमीही खेळू शकतो. यावेळी एकमेकांवर गुलाबाच्या पाकळ्या टाकून होळीच्या रंगाच्या शुभेच्छा देऊन बघा... तुम्ही कधीच ही रंगपंचमी विसरू शकणार नाही.
आपली रंगपंचमी ही अनेक रंगांची असते यामध्ये रासायनिक रंग वापरले जातात तर आनंदाने ते तोंडावर माखले ही जातात. रासायनिक रंगाचे धोखेही खूप आहेत, त्वचेसह डोळ्यांना यातून इजा होऊ शकते. इकोफ्रेंडली रंगपंचमी खेळण्यासाठी नैसर्गिक रंगांचा वापर करणे चांगले असते. रासायनिक रंगांपेक्षा गुलाल, हळद, बेसन पीठ आणि अन्य नैसर्गिक पाणीयुक्त रंग आपल्यासाठी सुरक्षित असतात.
रासायनिक रंगाचे दुष्परिणाम
रासायनिक रंग म्हणून आज बाजारपेठेत डाय किंवा ऑईलपेंट, साड्यांना द्यायचा रंग यासह इतर घातक घटकांचा वापर केला जातो. यामुळे आपल्याला त्वचेचे विकार होऊ शकतात. केस राठ होतात. अनेकदा त्वचेवरील डाग हा लवकर जात नाही तर त्याला सारखे धुवावे लागते. यामुळे दोन किंवा अधिक दिवस तो आपल्या त्वचेवर राहिल्याने त्याचा त्वचेवर परिणाम होतो.
घ्यावयाची काळजी
रासायनिक रंगांचे परिणाम पाहता आपल्याला कानात कापूस ठेवणे. रंग डोळ्यात जाऊ नये म्हणून चष्मा वापरणे, चष्मा नसताना जर रंग डोळ्यात गेला तर आपले डोळे स्वच्छ पाण्याने धुणे गरजेचे ठरते. तर मग रासायनिक रंगांपासून बाजूला होऊन खेळूया... इको फ्रेंडली होळी.
लेखक - अस्लम शानेदिवाण
स्त्रोत - महान्युज