बोथट शस्त्रे, यंत्रे, रस्त्यावरील व इतर अपघात, युद्धांतील शस्त्रे वगैरे गोष्टींच्या आघातामुळे अशा जखमा होतात. या प्रकाराच्या जखमांत त्वचेखालची ऊतके व अंतस्त्ये (छातीच्या आणि पोटाच्या पोकळीतील इंद्रिये) यांना इजा झालेली असते. त्वचा अथवा श्लेष्मकला वेडीवाकडी फाटलेली असते. अशा जखमांमध्ये मोठ्या रक्तवाहिन्यांना बहुधा इजा होत नाही; लहान रक्तवाहिन्या त्वरित आकसून बंद होतात व त्यामुळे रक्तस्राव फार होत नाही. आतील इंद्रियांना किती इजा होईल हे आघाताच्या जोरावर अवलंबून असते. जखम वेडीवाकडी असल्यामुळे जंतुसंसर्गाचा संभव अधिक असतो. शिवाय आघाताच्या वेळी बाह्य पदार्थ जखमेत घुसणे शक्य असते. अशा जखमांमध्ये मुख्य भीती अवसादाची (शॉकची) असते. रक्तस्रावामुळे गंभीर अवसाद होतो. विदारित जखमा बऱ्या होण्यास किती काळ लागेल ते जंतुसंसर्गाच्या तीव्रतेवर आणि ऊतकनाश किती झाला आहे त्यावर अवलंबून असते.
बंदुकीच्या वा पिस्तुलाच्या गोळ्यांनी झालेल्या जखमा ‘अंतर्वेधित’ प्रकारच्याच असतात. घुसलेल्या गोळ्या कित्येक वेळा आरपार जातात. गोळी जेथे आत घुसते ती जखम लहान असून जेथून बाहेर पडते ती मोठी असते. गोळी आत कोणत्या दिशेने गेली असेल त्याची कल्पना करून त्यावरून आतल्या कोणकोणत्या इंद्रियांना इजा झाली असेल ते ओळखावे लागते. गोळी शरीरातच राहिली असेल, तर क्ष-किरण परीक्षेने तिचे स्थान निश्चित करावे लागते.
विषारी : साप, नाग, विंचू, मधमाशी, गांधील माशी वगैरे चावल्यास होणाऱ्या जखमांत त्या प्राण्यांचे विष जात असल्यामुळे अशा जखमांची तीव्रता त्या विषांवर अवलंबून असते. या जखमा खोल नसतात, विषारी प्राण्याचे दात किंवा नांगी घुसलेल्या ठिकाणी एक किंवा दोन लहान जखमा असून त्यांवर रक्ताचा एकएक थेंब दिसतो किंवा मोठी गांध आलेली दिसते.
रोहिणीभेद झाल्यास रक्तस्राव फार होतो, रक्ताच्या चिळकांड्या उडतात. नीलाभेद झाल्यास काळसर रक्ताचा प्रवाह सारखा वाहिल्यासारखा दिसतो. केशवाहिन्या (सूक्ष्म रक्तवाहिन्या) तुटलेल्या असल्यास रक्त पाझरल्यासारखे दिसते. जखमेवर दाबून धरले असता रक्तस्राव थांबतो. रक्तस्रावाचा वेग व त्यामुळे शरीरातील किती रक्त बाहेर पडते ते पाहणे फार महत्त्वाचे आहे.
चिमटणे, ठेचणे, चेंगरणे या प्रकारांत अवसाद होतो. त्यात रोग्याला घाम सुटून चेहरा पांढरा फटफटीत पडतो. नाडी जलद आणि हाताला न लागण्याइतकी क्षीण होते. वेळीच उपचार न झाल्यास मृत्यू ओढावतो.
(२) विदारित जखमांमध्ये अवसादावर उपाय करणे हे पहिले काम असते. त्यासाठी नीलेवाटे रक्तद्रव किंवा रक्त देणे, अफूच्या अर्काच्या (मॉर्फिनाचे) अंतःक्षेपण (इंजेक्शन) हे उपाय करतात. स्राव होणाऱ्या वाहिन्या शोधून बांधून टाकतात. धनुर्वात आणि वायुकोथ (रक्तप्रवाह बंद झाल्यामुळे एखाद्या भागाचा मृत्यू होऊन जंतुसंसर्गामुळे वायू उत्पन्न होणे) यांवर प्रतिबंधक लस देणे अगत्याचे असते. यांशिवाय पेनिसिलिनासारखी प्रतिजैव (अँटिबायॉटिक) औषधेही द्यावी लागतात. जखमेमध्ये मृत ऊतक आणि बाह्य पदार्थ असल्यास ते काढून टाकतात. नंतर जखम स्वच्छ करून पट्टी बांधतात. अशा जखमा निर्जंतुक असल्याची खात्री असल्यासच टाके घालतात.
(३) अंतर्वेधित जखमा झाल्या असता धनुर्वात-प्रतिबंधक लस टोचणे महत्त्वाचे असते. आतील इंद्रियांना किती इजा झाली आहे त्यावर चिकित्सा अवलंबून असते. आंत्रासारखे (आतड्यासारखे) अंतस्त्य फाटले असल्यास पोट उघडून अंतस्त्य शिवावे लागते. मोडलेल्या सुईसारखे पदार्थ त्वचेखाली हाताला लागत असल्यासच अंतस्त्य काढण्याचा प्रयत्न करतात. असे पदार्थ स्नायुक्रियेमुळे शरीरात दूरवर जाऊ शकतात. क्ष-किरण परीक्षा व लोहचुंबक यांचा उपयोग होतो.
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 7/10/2020
चारा खाताना एखादी तार, सुई, खिळा, पत्रा किंवा कोणत...
अपाय किंवा नुकसान.
निरनिराळ्या कामधंद्यांमुळे वेगवेगळ्या प्रकारचे धोक...
कापल्यामुळे, पडल्यामुळे, कठीण पदार्थाच्या (दगड, का...