অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

लांजा तालुक्यातील माचाळ

खेड तालुका ऐतिहासिक पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. विशेषत: ट्रेकींगची हौस असणाऱ्या तरुणाईसाठी या तालुक्यातील भटकंती आनंद देणारी असते. मुंबई-गोवा महमार्गावर भरणे नाक्यापासून उजव्या बाजूस तालुका मुख्यालय आहे. खेड तालुक्यातील किल्ले सह्याद्रीच्या रागांमध्ये असून किल्ल्याला भेट देण्यासाठी बरेच अंतर दुर्गम वाटवरून पायी चालावे लागते. गिर्यारोहणाची आवड असणाऱ्यांसाठी ही भेट स्मरणीय ठरते. इतर पर्यटकांसाठी सह्याद्रीच्या कुशीतील निसर्गसहल आनंददायी असते. हिरव्यागार निसर्गातील ग्रामीण लोकजीवनाचा आनंद देण्यासाठी आंबवली येथे हिवाळ्यात पर्यटक आवर्जुन येतात.

रसाळगड

खेडपासून 20 किलोमीटर पूर्वेस रसाळगड किल्ला आहे. खेडपासून सुकवली-तळेमार्गे घेरारसाळगडपर्यंत वाहन नेता येते. मात्र गावापासून 3 किलोमीटर पर्वतरांगा चढून वर जावे लागते. किल्ल्याचा विस्तार फारसा नसून क्षेत्रफळ 5 एकर आहे. मात्र किल्ल्यावर कोठार, बालेकिल्ला, तट, बुरुज आदी किल्ल्यात आवश्यक असणाऱ्या सर्व रचनांचे अवशेष पाहायला मिळतात. किल्ल्याच्या मध्यभागी पेशवेकालीन मंदिर आहे. येथे दोन वर्षातून एकदा यात्रा भरते.

महिपतगड

खेड तालुक्याच्या ठिकाणापासून 30 किलोमीटर पूर्वेस हा किल्ला आहे. रसाळगडहून वडगावमार्गे आणि खेडहून दहिवली, जैतापूर आणि वडगावमार्गे जावे लागते. किल्ल्याच्या पायथ्याशी 'बेलदारवाडी' गाव आहे. किल्ल्याची उभारणी विजापूरकरांच्या काळात झाली. 1661 मध्ये शिवाजी महाराजांनी किल्ला स्वराज्यात सामावून घेतला. दाट झाडीने वेढलेल्या किल्ल्याचा परिसर पर्यटकांना निसर्ग सहलीचा आनंद देणारा आहे. किल्ल्यावर जाताना स्थानिकांची मदत अवश्य घ्यावी. याच परिसरात सुमारगडचे दर्शन घडते. चारही बाजूंनी नैसर्गिक तटबंदी असल्याने या गडावर पोहचणे कठीण असते.

खेडची लेणी

खेड बसस्थानकापासून जवळच ही लेणी आहेत. त्यामध्ये दोन स्तंभ, एक अर्धस्तंभ आणि एक चैत्य आहे. चैत्यगृहाच्या दोन्ही बाजूस खिडकी आहे. लेण्यांमध्ये तीन कक्ष आहेत. लेण्यांचे काम अर्धवट करण्यात आले असून बौद्धकालीन शिल्पाशी या लेण्यांचे साम्य आहे.

लांजा तालुका

लांजा तालुक्यात फारशी पर्यटनस्थळे नसली तरी मुंबई-गोवा महामार्गावरील आंबा आणि काजूच्या बागांमुळे हा प्रवास सुखद वाटतो. या मार्गावर अनेक ठिकाणाी काजू प्रक्रीया उद्योग सुरू झाले आहेत. काजूच्या बागामधील कृषी पर्यटन केंद्रे पर्यटकांना आकर्षित करतात. रत्नागिरी-लांजा 35 किलोमीटर अंतर आहे.

थंड हवेचे ठिकाण माचाळ

सह्याद्रीच्या रांगेतील थंड हवेचे ठिकाण म्हणून हे पर्यटनस्थळ विकसीत होत आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने या स्थळाचा 'ब' वर्ग पर्यटन स्थळात समावेश केला आहे. 4 हजार फूट उंचीच्या या पठारावर मुचकुंदी ऋषींच्या पवित्र गुहेला भेट देण्यासाठी दरवर्षी भाविक गर्दी करतात. हिरव्यागार वनराईने वेढलेल्या या स्थानाला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या सातत्याने वाढते आहे. लांजा-माचाळ हे अंतर 32 किलोमीटर तर तळवडे रेल्वेस्टेशनपासून 15 किलोमीटर अंतरावर आहे.

साटवली किल्ला

साटवली गावावरूनच या किल्ल्यास 'साटवलीचा किल्ला' असे संबोधले जाते. किल्ला आकाराने अगदी लहान असून मुचकुंदी नदीच्या किनाऱ्यावर उभारला आहे. तो किल्ले प्रकारातील 'गढी किल्ला' आहे. लांजापासून 23 किलोमीटर अंतरावर हा किल्ला आहे. किल्ल्याचा परिसर 5 एकराचा आहे. किल्ल्याला पाच बुरूज आहेत. किल्ल्याला भेट देऊन इतिहासाच्या पाऊलखुणा न्याहाळता येतात.

अंजनारी मठ

रत्नागिरीहून लांजा येथे जाताना हातखंबापासून 19 किलोमीटर अंतरावर अंजनारी नदीच्या तटावर निसर्गरम्य परिसरात श्री अवधूत दत्त मठाची स्थापना करण्यात आली आहे. या ठिकाणी गुरुदत्ताचे सुंदर मंदिर उभारण्यात आले असून परिसरात उद्यान विकसीत करण्यात आले आहेत. नदीपात्राच्या दोन्ही बाजूस दाट झाडी असल्याने परिसराचे सौंदर्य खुलून दिसते. मंदिराच्या मागच्या बाजूस गरम पाण्याचा झरा आहे. शेजारी असलेल्या नदीपात्रातील गार पाणी आणि झऱ्यातील गरम पाणी असा निसर्गाचा चमत्कार येथे पाहता येतो.

 

संकलन : जिल्हा माहिती कार्यालय, रत्नागिरी

माहिती स्त्रोत : महान्युज

अंतिम सुधारित : 1/30/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate