बांडुंगपरिषद : जागतिक शांततेसाठी आशियाई राष्ट्रांनी आयोजित केलेली एक शांतता परिषद. दुसऱ्या महायुद्धानंतर अनेक शतकांच्या यूरोपीय वसाहतवादाविरुद्ध आफ्रो-आशियाई जनतेमध्ये असंतोष निर्माण झाला होता. यामधूनच स्फूर्ती घेऊन ब्रह्यदेश, श्रीलंका, भारत, इंडोनेशिया आणि पाकिस्तान या कोलंबो परिषदेतील राष्ट्रांच्या निमंत्रणावरून इंडोनेशियात बांडुग येथे १८ ते २४ एप्रिल १९५५ दरम्यान आफ्रो-आशियाई स्वतंत्र राष्ट्रांची परिषद भरली होती. यजमान कोलंबो परिषदेतील राष्ट्रांखेरीज २५ राष्ट्रांचे प्रतिनिधी प्रथमच या परिषदेला उपस्थित राहिल्यामुळे या परिषदेला विशेष महत्त्व आहे. याशिवाय अफगाणिस्तान, कांपुचिया कंबोडिया), चीन, ईजिप्त, इथिओपिया, घाना, इराण, इराक, जपान, जॉर्डन, लाओस, लेबानन, लायबीरिया, लिबिया, नेपाळ, फिलिपीन्स, सौदी, अरेबिया, सूदान, सिरिया, थायलंड, तुर्कस्तान, उत्तर व्हिएटनाम, दक्षिण व्हिएटनाम आणि दक्षिण येमेन या देशांनीही या परिषदेत भाग घेतला.
या परिषदेचा उद्देश आफ्रो-आशियाई देशांत मैत्रीचे संबंध प्रस्थापित करून आर्थिक, सांस्कृतिक व राजकीय सहकार्याला प्रोत्यासहन देणे व वसाहतवादाला विरोध करणे असा होता. परिषदेचे कामकाज सौहार्दपूर्ण वातावरणात झाल्यामुळे हा उद्देश बहुतांशी सफल झाला. द. आफ्रिका, इझ्राएल, तैवान, दक्षिण व उत्तर कोरिया यांना परिषदेचे निमंत्रणच धाडण्यात आले नव्हते
सर्व राष्ट्रांनी परस्परांशी चांगला शेजारी या नात्याने राहून सहकार्य वाढवावे आणि एकमेकांशी खालील तत्त्वांच्या आधारे वर्तन करावे
परिषदेच्या कामकाजामध्ये चीनने प्रभावीपणे भाग घेतला. चौ एन-लायने शेजारी आशियाई राष्ट्रांबरोबर चीनचे मैत्रीचे संबंध वाढविले. बांडुंग परिषदेने यजमान राष्ट्रांना सहभागी राष्ट्रांशी सल्लामसलत करून परिषदेची पुढील बैठक बोलावण्याबद्दल व्यवस्था करण्याची शिफारस केली होती; परंतु अशी परिषद पुन्हा भरलीच नाही. बांडुंग परिषदेमधील एकजूट अंतर्गत मतभेदांमुळे टिकू शकली नाही; तरी बांडुंग ‘स्पिरिट’ हे पुढेही टिकून राहिले; कारण संयुक्त राष्ट्रांमधील आफ्रो-आशियाई गट त्याची आठवण करुन देतो.
संदर्भ : 1. Brecher, Michael, India and World Politics, London, 1968.
2. Calvocoressi, Peter, World Politics Since 1945. London, 1977.
3. Macridis, R. C. Ed. Foreign Policy in World Politics, Englewood Cliffs N.J). 1976.
लेखक - सु. रा काकडे /वि.मा. वाचल
स्त्रोत - मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 7/18/2020
राज्य रक्तसंक्रमण परिषद संस्थेचा मूळ उद्देश राज्या...
सध्या सर्वत्र चर्चा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ...
पशुसंवर्धन विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या योजना...
विज्ञान प्रसार - विज्ञान प्रसारक संस्था