অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

ध्वनी प्रदूषण

ध्वनी प्रदूषण

मनुष्य, प्राणी किंवा यांत्रिक पर्यावरणामुळे निर्माण झालेला मर्यादेपलीकडील असह्य ध्वनी म्हणजे ध्वनी प्रदूषण. यामुळे मनुष्य किंवा प्राणी जीवनाच्या कृती विसकळीत होतात किंवा त्यांचा समतोल बिघडतो. जगभरात मानवी परिसरातील बहुतेक ध्वनी हा बांधकाम आणि वाहतूक (मोटारी, विमाने, रेल्वे इत्यादींचा आवाज) यांच्यामुळे निर्माण होत असतो. शहरी नियोजनात त्रुटी असल्यास ध्वनी प्रदूषणात वाढ होते. तसेच औद्योगिक क्षेत्रे आणि निवासाची ठिकाणे एकमेकांना लागून असल्यास निवासी भागात ध्वनी प्रदूषण जाणवते.

आवाजाची तीव्रता डेसिबेल (डीबी) या एककात मोजली जाते. दूरध्वनीचा शोध लावणारे अमेरिकन वैज्ञानिक अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल यांच्या स्मरणार्थ ध्वनीच्या तीव्रता पातळीच्या एककाला बेल यांचे नाव दिले गेले आहे. डेसिबेल हे घातांकित एकक असून दर १० डीबी आवाजाची तीव्रता दसपटीने वाढते. उदा., २० डीबी आवाज १० डीबीच्या आवाजापेक्षा १० पट असतो तर ३० डीबीचा आवाज १० डीबी आवाजाच्या १०० पट असतो. साधारणत: ८० डीबीपर्यंतचा आवाज मनुष्याला सहन होऊ शकतो. त्यापेक्षा मोठ्या आवाजाचा त्रास होतो. विमाने व रॉकेटे यांचा आवाज १००-१८० डीबीएवढा तीव्र असतो. तसेच बांधकाम, सार्वजनिक कार्यक्रम इत्यादी ठिकाणी आवाजाची पातळी १२० डीबीपेक्षा जास्त असते. गडगडाटी वादळे, जोराचा वारा, भूकंप अशा नैसर्गिक आपत्तींच्या वेळी आवाजाची तीव्रता वाढते. मात्र या घटना क्वचितच घडतात. शहरी भागात अनेक मानवनिर्मित कृतींमुळे ध्वनी प्रदूषण होते. उदा., घरातील दूरदर्शन संच, मिश्रक (मिक्सर), विविध प्रकारचे कारखाने, वाहने, बांधकाम इत्यादी.

ध्वनी प्रदूषणामुळे मनुष्य व प्राणी यांच्या आरोग्यावर आणि वर्तनावर परिणाम होतो. ध्वनीची पातळी वाढली की माणसांमध्ये ताण वाढून हृदयाची धडधड वाढू शकते, रक्तदाब वाढतो आणि हृदयाचे विकार जडू शकतात. तसेच लक्ष विचलित होते, चिडचिड होते, कार्यक्षमता घटते व पचनक्रियेत बदल होतो. सतत होणाऱ्या ध्वनी प्रदूषणामुळे बहिरेपणाही येतो. आपल्याकडील बसचालकांना ते चालवीत असलेल्या आणि अन्य वाहनांमुळे ध्वनी प्रदूषण अनेक वर्षे सहन करावे लागते. त्यामुळे अशा चालकांना बहिरेपणा आल्याची अनेक उदाहरणे आहेत. वाढलेल्या ध्वनीच्या तीव्रतेमुळे अन्न मिळविण्याच्या पद्धतीत बदल झाल्यामुळे काही प्राण्यांचा मृत्यू होऊ शकतो, प्रजननक्षमता व दिशा ओळखण्याच्या क्षमता यांच्यात बदल झाल्यामुळे ते कायमचे बहिरे होतात.

ध्वनीची पातळी वाढत राहिल्यास त्या भागातील प्राणी अधिवासाची जागा बदलतात. असे आढळून आले आहे की, काही पक्षी दिवसाऐवजी रात्री गातात; कारण यावेळी परिसर शांत असतो आणि त्यांचा आवाज जोडीदारापर्यंत पोहोचू शकतो. वाढत्या नागरीकरणामुळे ध्वनी प्रदूषणातदेखील वाढ होत असते. रस्त्यावरील वाहतुकीमुळे होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाची पातळी ध्वनी-अडथळे उभारून, वाहनांचा वेग मर्यादित ठेवून, रस्त्यांच्या पृष्ठभागांमध्ये बदल करून, जड वाहनांवर मर्यादा घालून किंवा टायरच्या रचनेत बदल करून कमी करता येते. विमानांमुळे निर्माण होणारा ध्वनी सुधारित एंजिने बदलून तसेच त्यांच्या मार्गात बदल करून कमी करता येतो. तसेच दैनंदिन व्यवहारात शक्यतो हळू आवाजात बोलून, गाणी ऐकताना आजूबाजूच्या व्यक्तींना त्रास होणार नाही याची खबरदारी घेऊन, विविध उपकरणांची व वाहनांची नियमित देखभाल करून, गरज असेल तरच हॉर्नचा वापर करून व फटाक्यांचा वापर टाळून ध्वनी प्रदूषणाची तीव्रता कमी करता येते.

 

पेडणेकर, हेमंत

स्त्रोत: कुमार विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate