महाराजा सवाई जयसिंग दुसरा याने कल्पकतेने १७२८ मध्ये ही नगरी वसविली आणि सु. ११ किमी. वरील अंबेरहून राजधानी येथे आणली. त्याच्या नावावरूनच नगरीस जयपूर हे नाव मिळाले.
हातमागावर कापड विणणे, हस्तिदंतांवरील कोरीवकाम, जडावाचे काम, संगमरवरावरील जडावकाम, बांधणीची वस्त्रे–विशेषतः साड्या इ. कलाकौशल्याच्या कामांसाठी जयपूर प्रसिद्ध आहे.येथील मीन्याचे काम तर भारतात पहिल्या प्रतीचे समजले जाते.अशा कलांचे शिक्षण देणारी एक शाळाही येथे आहे.
राज्यातील व्यापाराचेही ते केंद्र आहे.
येथील जुना राजवाडा हा दोनशे वर्षांपूर्वीचा मोगल-राजपूत शिल्पाचा उत्तम नमुना आहे. पाचमजली चंद्रमहाल व कोरीवकामासाठी प्रसिद्ध असलेला मुबारक महाल, वास्तुकलेच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रतापसिंहाने बांधलेला हवामहल, जुने लेख,चित्रे, शस्त्रे यांचा संग्रह, जंतरमंतर ही उघड्यावरील वेधशाळा,सार्वजनिक उद्यान व तेथील प्राणिसंग्रहालय, नाहरगढटेकडीजवळच्या पूर्वीच्या महाराजांच्या छत्र्या, टेकडीवरीलसूर्यमंदिर, गोविंदजीचे मंदिर इ. ठिकाणे पाहण्यासाठी प्रवाशांची रीघ असते. अंबेर आणि संगनेर येथील देवालये आणि तेथून दिसणारानयनरम्य देखावा पाहण्यासाठीही लोक जात असतात. १९४७ मध्ये राजस्थान विद्यापीठ स्थापन झाले.
पश्चिम रेल्वेच्या दिल्ली–अहमदाबाद मार्गावर जयपूर हे स्थानक आहे. सु. १३ किमी.वर संगनेर येथे विमानतळ आहे व राज्यातीलआणि बाहेरच्या महत्त्वाच्या ठिकाणांस जोडणारे चांगले रस्ते आहेत.
दातार, नीला
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 10/7/2020