पृथ्वीवर उष्ण आणि समशीतोष्ण कटिबंधांत कोरड्या हवेचे ओसाड, वाळवंटी प्रदेश आणि आर्द्र हवेचे अरण्यप्रदेश यांच्या दरम्यान, खंडांच्या अंतर्भागात मुख्यत:गवताने निसर्गतःच आच्छादलेले विस्तृत, सपाट मैदानी किंवा पठारी प्रदेश आढळतात. त्यांना उष्ण कटिबंधात सॅव्हाना व समशीतोष्ण कटिबंधात स्टेप व प्रेअरी म्हणतात.
दक्षिण आफ्रिकेत त्यांना व्हेल्ड, दक्षिण अमेरिकेत लानोज, कँपोज, पँपास, आणि ऑस्ट्रेलियात डाउन्स अशीही नावे आहेत. अंटार्क्टिकाशिवाय प्रत्येक खंडात असे विस्तीर्ण तृणप्रदेश आहेत.
ब्रिटिश बेटे, पश्चिम यूरोप, न्यूझीलंड इ. थंड प्रदेशांत मनुष्याने अरण्ये तोडली, तेथे लुसलुशीत हिरव्यागार गवताची कुरणे तयार झाली आहेत. वाळवंटी प्रदेशातही काही भाग तृणाच्छादित असतो. टंड्रा प्रदेश, बहुतेक पठारी प्रदेश आणि काही पर्वतांचे उतार येथेही प्राणी चरू शकतील असे गवत आढळते. तथापी मुख्यतः सॅव्हाना, स्टेप व प्रेअरी हेच विस्तीर्ण प्रदेश, गवताळ प्रदेश असे विशेषत्वाने मानले जाते.
पृथ्वीवरील जमिनीचा सु. २४ % भाग गवताळ प्रदेश आहे. त्यापैकी ३१% प्रदेश विशेष उंच सॅव्हाना गवताचा, २२% उंच सॅव्हाना गवताचा, १८% ओसाड प्रदेशातील सॅव्हानाचा, १३% उंच प्रेअरी गवताचा, १०% बुटक्या स्टेप गवताचा व ६% पर्वतीय तृणप्रदेशाचा आहे.
तृणप्रदेशात झाडांपेक्षा गवतच वाढावे अशी नैसर्गिक परिस्थीती असते. पाऊस इतक्या बेताचा पडतो, की त्याची ओल जमिनीच्या खालच्या थरांपर्यंत पोहोचत नाही, ती वरच्या थरातच राहते. ही गोष्ट झाडांपेक्षा गवताच्या वाढीला अधिक पोषक असते. प्रेअरीचा तृणप्रदेश जवळजवळ वृक्षहीनच आढळतो. परंतु येथील हवामान पाहता तेथे अरण्येही वाढू शकली असती. अर्जेंटिना, यूरग्वाय, पॅराग्वाय येथेही अरण्ये वाढण्याजोगी हवामानाची परिस्थिती आहे.
आफ्रिकेतील विस्तीर्ण सॅव्हाना तृणभूमीत जसे हवामान आहे तसे भारत, आग्नेय आशिया, मध्य अमेरिका येथेही आहे. परंतु या प्रदेशात त्या हवामानात अरण्ये वाढलेली आहेत. आफ्रिकेच्या आणि स्टेप प्रदेशाच्या गवताळ प्रदेशांत मात्र मधूनमधून काही थोडी झाडे दिसतात तेवढीच. याचे कारण मानवाची वस्ती आणि त्याने वापरलेला किंवा आपोआप उत्पन्न झालेला अग्नी.
इ. स. पू. १०००० वर्षांपूर्वींच मनुष्य काही प्राण्यांना माणसाळवून त्यांचे कळप बाळगू लागला होता. माणसाने बाळगलेले प्राणी मर्यादित प्रदेशात चरतात आणि तेथील गवत पार नाहीसे करतात. आफ्रिकेच्या वायव्येकडील पर्वतीय प्रदेशात माणसाने शेळ्या, मेंढ्या आणि उंट चारले नसते, तर तेथे अरण्य तयार झाले असते.
अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांच्या नैऋत्य भागात प्राणी चारल्यामुळे त्या भागाचे मरुभूमित रूपांतर झाले आहे. भारतातही राजस्थानच्या वाळवंटी प्रदेशाच्या सीमेवर शेळ्या-मेंढ्या चारल्यामुळे वाळवंटी प्रदेश विस्तार पावत आहे आणि मरुभूमीचे हे आक्रमण थांबविण्यास तेथे मुद्याम गवताची लागवड करून प्राणी चारण्यास बंदी करण्यात येत आहे.
उत्तर आणि दक्षिण अमेरिकेत हरणे, गवे, हत्ती, घोडे वगैरे विविध प्राणी भरपूर होते, ते सापक्षतः अलीकडच्याच काळात माणसाने नष्ट केले. त्यामुळे तेथील गवत अधिक उंच वाढले. वणवा लागून ते गवत जळले तेव्हा लहान गवत जळल्यामुळे जांच्यावर विशेष परिणाम होत नव्हता, ती झाडेही नष्ट झाली आणि तृणभूमी वाढली.
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 6/30/2020
टंड्रा : ज्या प्रदेशाचे वर्षातील एखाद्या तरी महिन्...