অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

अंजनेरी

अंजनेरी

वेशीवरच्या पाऊलखुणा : अंजनेरी : राजधानीच्या अनोख्या प्रदेशात

अंजनेरी पर्वताच्या कुशीत पहुडलेले अंजनेरी गाव हनुमान जन्मस्थान म्हणून ओळखले जाते. अंजनेरी पर्वताची भव्यता प्रत्येकाला श्रद्धेने नतमस्तक व्हायला लावत असली तरी याच पर्वताच्या कुशीत एकेकाळचा वैभवशाली इतिहास व त्याच्या भग्नावशेष झालेला प्राचीन मंदिरांचा सडा अखेरचा श्वास घेतोय, हाही दैवदुर्विलास. एकेकाळी राजधानीचा दर्जा असलेले अंजनेरी बाजारपेठेचे मुख्य ठिकाण होते. या इतिहासाच्या वैभवात लेणीचे कोंदणही भर टाकतात. अंजनेरीच्या अवतीभवती एकांतात पहुडलेल्या असंख्य पाऊलखुणा पुन्हा पुन्हा ‘त्या’ वैभवाची आठवण करून देतात.

नाशिककडून त्र्यंबकेश्वरकडे निघाल्यावर महिरावणीनंतर नाणे संशोधन केंद्रापासून पुढे निघाल्यावर डाव्या हाताला अंजनेरी पर्वत आपल्याला खुणावू लागतो. थोडे पुढे गेल्यावर डाव्या हाताला हनुमानाचे मोठे मंदिर लक्ष वेधून घेते. अंजनेरी पर्वतावर हनुमानाचे जन्मस्थान असलेले अंजनीमाता मंदिर आहे. हजारो वर्षांपासून माणूस श्रद्धेने येथे येतो आहे. बाल हनुमानाने केलेल्या अनेक बाल करामती तसेच सूर्याला फळ समजून ते खाण्यासाठी पहिले उड्डाण याच पर्वतावरून घेतल्याची आख्यायिका आहे. त्यामुळे या ठिकाणाला धार्मिक महत्त्व आहे. माता अंजनीच्या नावावरूनच या गावाला अंजनेरी नाव पडल्याचे म्हटले जाते. रस्त्यालगतच्या हनुमान मंदिरापासून गावात जाता येते. नव्या जुन्या घरांनी गाव सजले आहे. अंजनेरी पर्वताकडे जाण्यासाठी वनविभागाने पहिल्या टप्प्यापर्यंत गाडीने जाता येईल, अशी सोय केली आहे.

अंजनेरी गाव तसे लहान पण त्याच्या वेगवेगळ्या वैशिष्ट्यांमुळे ते मोठे भासते. या गावचा इतिहासही रोचक आहे. इ. स. २६०च्या सुमारास अंजनेरी ईश्वरसेन (ईश्वरदत्त)नावाचा पराक्रमी अभिर राजाची राजधानी होती. ईश्वरसेनने सातवाहनाचे वर्चस्व झुगारून या प्रदेशावर यज्ञश्री सातकर्णीनंतर स्वत:चे राज्य निर्माण केले. चालुक्य राजा भोगशक्ती यांचा कलचुरी वर्ष ४६१ मधील ताम्रपटानुसार महाराजधिराज परमेश्वर विक्रमादित्य यांच्या अधिपत्याखाली एकूण चौदा हजार गावे होती. यात अंजनेरीचा उल्लेख सापडतो. इ. स. ७१०च्या सुमारास बदामीच्या चालक्यांची सत्ता काही काळ नाशिक, कोकण परिसरात होती. या गावातील शिद कुटुंबीयांकडे मिळालेल्या ताम्रपटावरून गुर्जरवंशीय जयभट (तृतीय, इ. स. ७ वे शतक), हरिश्चंद्रवंशीय राजा भोगशक्ती (इ. स. ७ वे शतक), पृ‌थ्वीचंद्र भोगशक्ती (इ. स.७ वे, ८ वे शतक) हे चालुक्य राजे अंजनेरीवर राज्य करीत असल्याच्या नोंदी आहेत. सिन्नर येथील यादव राजांच्या काळात सेऊनचंद्र तिसरा याने इ. स. ११३० ते ११४५च्या सुमारास अंजनेरीहून काही काळ कोकणचा कारभार पाहिला.

जैनांचे आठवे तीर्थंकर चंद्रप्रभू यांच्या जैन मंदिराची व्यवस्था नीट चालावी म्हणून अंजनेरी येथील वत्सराज, लाई, दशरथ या व्यापाऱ्यांनी तीन दुकाने, काही घरे दान दिल्याचे उल्लेख मिळतात. अजूनही हा भाग बाजारपेठ गल्ली म्हणून ओळखला जातो. याच काळात अंजनेरी परिसरात लेणी बहरली. परिसरात लहान मोठ्या १०१ लेणी असल्याचे ग्रामस्थ सांगतात. या लेणींमधील शिलालेखांकडेही दुर्लक्ष झाले आहे. या लेणींचा पुरेसा अभ्यासही झालेला नसल्याने इतिहासाचे अनेक पैलू अजूनही दडलेलेच आहेत. अंजनेरी पर्वतावर जाताना तलाव, दोन पुरातन मंदिरे व शुद्ध पाण्याच्या गुफा ‌आढळतात. तर पर्वताच्या टोकावर अंजनीमाता मंदिर आहे.

अंजनेरी परिसराला जैन परंपरेत ‘श्वेतप्रद’ असे म्हटले जायचे. यादवांच्या काळात हा परिसर श्री संत ज्ञानेश्वर, त्यांचे बंधू आणि गुरू निवृत्तीनाथ महाराज व त्यांच्या पूर्वजांच्या पदस्पर्शाने पुनीत झाला आहे. मोगल-मराठा संघर्षाच्या काळात अंजनेरी किल्ल्याचे उल्लेख येतात. या काळातील किल्लेदारांची नावे अंजनेरीशी संबंधित आहेत. एवढेच नव्हे तर निजामशाहीचे पुनरूज्जीवन होत असताना अल्पवयीन निजामशहाला ज्या किल्ल्यांवर काही काळ सुरक्षित ठेवले होते त्यात अंजनेरी किल्ल्याचा उल्लेख येतो. या किल्ल्याचा उपयोग कैद्यांना ठेवण्यासाठी होत असावा, असा उल्लेखही ऐतिहासिक दस्तऐवजामध्ये मिळतो. इंग्रजांच्या काळात इंग्रजांनी किल्ल्यावरील थंड हवामान व निसर्ग पाहून गडावर बंगले बांधले. त्यामध्ये अनेक अधिकारी, ख्रिस्ती मिशनरी उन्हाळ्यात मुक्कामास येत असत, असे प्रभाकर शिंदे व छगनराव चव्हाण या ज्येष्ठ ग्रामस्थांनी सांगितले.

अंजनेरी पर्वताच्या व गावाच्या पायथ्याला जुनी प्राचीन मंदिरे आहेत. ही जवळपास १६ मंदिरे असून, त्यापैकी १२ जैन व ४ हिंदू देवालये आहेत. अंजनेरी एक प्राचीन मुख्य बाजारपेठ व एक प्रमुख राजकीय केंद्र होते, हे या मंदिरावरून स्पष्ट होते. चालुक्य ते यादवापर्यंतच्या काळात अंजनेरी गावात असंख्य मंदिरे उभारली गेली. अंजनेरी राजधानी व व्यापारी पेठ असल्याने येथे येणाऱ्या राजे, महाराजे तसेच व्यापाऱ्यांकडून मंदिरांना मोठ्या प्रमाणात निधी मिळे. त्यामुळे परिसरात मंदिर उभारणीचे काम मोठ्या प्रमाणात झाले. या मंदिरांच्या स्थापत्यावर वेगवेगळ्या शैलींचा प्रभाव दिसतो. या रचनेत नागर, भूमिज, फासना अशी प्रमुख वैशिष्ट्ये आढळतात. येथील वैशिष्ट्य म्हणजे काही मंदिरांचे सभामंडप व मुखमंडप यांच दोन्ही रुंदी समान आहेत.

हे वेगळेपण महाराष्ट्रात इतरत्र दिसत नाही. आठवे जैन तीर्थंकर चंद्रप्रभू यांचीही मूर्ती आहे. तसेच, यातील ८ क्रमांकाचे विष्णू मंदिर व इतर हिंदू देवालये अप्रतिम होती. या देवालयावर नरसिंह, वामन, वराह अवतार तर काही ठिकाणी शिव, ब्रह्मा, गणपती अशा मूर्ती आहेत. अंजनेरीची स्थापत्य वैशिष्ट्ये म्हणजे जैन व हिंदू धर्म येथे एकत्रपणे आनंदात नांदत होते, असे दिसते. मात्र ही मंदिरे सध्या अंतिम घटका मोजत आहेत. पुरातत्त्व खात्याने या मंदिरांभोवती कंपाऊंड उभारून त्यांचे दगड चोरीला जाऊ नयेत, याची काळजी घेतली आहे; मात्र या मंदिरांची पुनर्बांधणी गरजेची आहे. ही सोळा मंदिरे पुन्हा उभी राहिली तर अंजनेरीचे राजधानी म्हणून असलेले महत्त्व पुन्हा उठून दिसेल. नाणे संशोधन केंद्र, परिसरात ब्रह्मा व्हॅली, सपकाळ नॉलेज अशा शैक्षणिक संस्थांमुळे अंजनेरीचे रूप पालटत आहे. अंजनेरी पर्वतामुळे हा परिसर पर्यटकांनी गजबजलेला असतो. हा परिसर पर्यटन क्षेत्र व गिर्यारोहकांचे आवडते ठिकाणही होऊ पाहत आहे.

अंजनेरीच्या पायथ्याशी असलेल्या ऐतिहासिक मंदिरांची रांगोळी विस्कटलेल्या अवस्थेत पाहताना मन हेलावते. मात्र, अंजनेरीने अजूनही आपले सौंदर्य हरविलेले नाही. विस्कळीत इतिहासाला सावरण्याचा प्रयत्न करीत आपल्या अंगाखांद्यावर दुर्मीळ फुलांच्या खजिन्याच्या माध्यमातून आपल्या ऐतिहासिक व नैसर्गिक पाऊलखुणा अंजनेरी जपत आहे. त्या जपल्या गेल्या पाहिजेत यासाठी जाणीवपूर्वक
प्रयत्नही व्हायला हवेत.

लेखक : रमेश पडवळ

 

अंतिम सुधारित : 6/26/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate