फोंडे : गोवे केंद्रशासित प्रदेशात असलेला एक भुईकोट किल्ला. बेळगाव – पणजी मार्गावर पणजीपासून आग्नेयीस सु. २५ किमी. अंतरावर वसला आहे. मराठ्यांनी याला मर्दनगड हे नाव दिले होते. सध्या हा किल्ला प डीक स्थितीत असून त्यात एक दर्ग्याशिवाय दुसरी कोणतीही वैशिष्ट्यपूर्ण वास्तू आढळत नाही . पूर्वी त्याला खाडीचा खंदक होता . सोळाव्या शतकात हा किल्ला विजापूरच्या आदिलशाही अंमलाखाली होता. इ. स. १५१६ मध्ये तेथील किल्लेदार अं कू शखान याच्याकडून तो बळकावण्याचा अयशस्वी प्रयत्न पोर्तुगीजांनी केला. पुढे आदिलशाही तक्ताचा एक वारस मल्लूखान यास पोर्तुगीजांनी फोंड्यास आदिलशाही सुलतान बनविण्याचा प्रयत्न केला ; पण तो फसून पोर्तुगीजांना फोंडे सोडावे लागले. पुन्हा फोंडे पोर्तुगीजांनी हस्तगत केले ( १५५७ ). त्यानंतर १५७० – ७१ मध्ये पहिल्या अली आदिलशाहने ( कार. १५५७ – ८० ) फोंड्यास तळ ठोकून गोवे जिंकण्याचा प्रयत्न केला ; पण त्यात यश आले नाही . नंतर फोंडे पोर्तुगीजांनी पुन्हा हस्तगत केले ( १६७३ ).
शिवाजी महाराजांनी १६ मे १६७५ रोजी फोंडे हस्तगत करून तेथे त्रिंबक पंडित यास सुभेदार नेमले. छ. संभाजीच्या वेळेसही तो किल्ला मराठ्यांच्या ताब्यात होता. संभाजीने तेथे तळ ठेवून गोव्यावर स्वारी केली होती ( १६८३ ). तेथील सरदेसाई दुल बा जी नाईक प्रतापराव हा पोर्तुगीजांस फितूर झाला, तेव्हा पोर्तुगीजांनी फोंडे जिंकण्याचा प्रय त्न केला; पण येसाजी कंकाचा मुलगा कृष्णाजी कंक ( त्यालाच संभाजीने येसाजी हेच नाव ठेविले ) याने पराक्रमाची शर्थ करून किल्ल्याचे संरक्षण केले. संभाजीच्या वधानंतरच्या काळात ( १६८९ ) हा किल्ला पोर्तुगीजांच्या ताब्यात गेला ; पण १७३९ च्या सुमारास मराठ्यांनी तो पुन्हा आपल्या ताब्यात घेतला. वसईच्या तहाने ( ११ सप्टेंबर १७४१ ) पोर्तुगीजांनी किल्ल्यावर आक्रमण न करण्याचे मान्य केले असतानाही त्याच वर्षी तो त्यांनी बळकाविला. पुढे तो किल्ला त्यांनी उत्तर कर्नाटक जिल्ह्यातील सोंध्याच्या संस्थानिकास दिला. सोंधेकरांनी तो किल्ला मराठ्यांना दिला असता पोर्तुगीजांनी १७५६ मध्ये तो पुन्हा ताब्यात घेण्याचा प्रय त्न केला. त्या प्र यत्ना त पोर्तुगीज व्हाइसरॉय फ्रा न्सिस्कू द आसीस ( कार. १७५४ - ५६ ) मारला जाऊन तो किल्ला मराठ्यांच्या ताब्यात राहिला. पुढे बारभाईंच्या कारभाराच्या कालखंडात ( १७७३-८२) सावंतवाडीचे सावंत, सोंधेकर व पोर्तुगीज यांच्यातील हेव्यादाव्यांमुळे तो किल्ला या त्रिकुटापैकी एकाच्या ताब्यात रहात गेला आणि इंग्रजी अंमल सुरू होण्याच्या वेळी तो किल्ला पोर्तुगीजांच्या ताब्यात होता . भारताने पोतुर्गीज प्रदेश जिंकून घेईपर्यंत ( १९६० ) तो त्यांच्याकडेच होता.
संदर्भ : 1. Danvers, F. C. The Portuguese in India, 2. Vol s . , London, 1966.
2 . पिसुर्लेंकर , पां . स . पोर्तुगेज – मराठे संबंध , पुणे , १९६७.
लेखक - ग. ह. खरे
स्त्रोत - मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 7/3/2020
कुलाबा जिल्ह्यातील एक भुईकोट किल्ला, मुरुड तालुक्य...