ऐतिहासिक तीर्थक्षेत्र श्री क्षेत्र निरा नरसिंहपूर स्थान आग्नेय दिशेस असून पुणे जिल्ह्या चे ते शेवटचे टोक आहे. क्षेत्राच्या एका बाजूने निरा नदी तर दुसऱ्या बाजूने भीमा नदी आणि तिसऱ्या बाजूस या उभयतांचा संगम. तीन बाजूने पाणी व एका बाजूस जमीन असे हे रमणीय स्थान आहे.
नीरा-भीमा संगमाचा परिसर एकेकाळी अतिशय निसर्गरम्य होता. ऋषी, तपस्वी व योगी यांच्या निवासाचे हे स्थान होते. कारण श्रीनृसिंहाचे चिरस्थायी वास्तव्य या ठिकाणीच होते. भक्त प्रल्हाद अनन्यिसाधारण भक्तिभावाने नृसिंहांच्या ‘वालुकामय मूर्तीची’ पूजा करत असे, हीच वाळूची नृसिंहाची मूर्ती आज या ठिकाणी गाभाऱ्यात दृष्टीस पडते.
दोन्ही नद्यांच्याह पाण्यात भव्य मंदिराची उभारणी करण्यात आली आहे. यावर उंच शिखर बांधण्यात आले आहे. नृसिंह गाभाऱ्याच्या उजव्या बाजूस लक्ष्मी मंदिर दिसून येते. काही सभामंडप, विस्तीर्ण ओवऱ्या आणि भव्य प्रवेशद्वारे पूर्व व पश्चिम दिशांना बांधण्यात आली आहेत.
निरा आणि भीमा नदीच्या संगमावर असलेला गोलाकृती प्रचंड घाटाचे बांधकाम शके १५२७ मध्ये त्रिमलापाळ दाधजी मुधोजी यांनी केले आहे. घाटामध्ये शिल्प सौंदर्य लक्षणीय आहे. घाटाच्या पायऱ्यात बसविलेल्या मोठ्या दगडातून हत्तीचे शिल्प घडविले आहेत. संगमात स्नान करून संगम घाट चढत असताना हत्ती आपली सोंड वर करून भक्ताला अभिवादन करून स्वागत करतात. हत्ती व सिंह यांची जोडी लक्ष वेधते शिवाय मगरीची पाच शिल्पेा आहेत. समर्थ रामदास, संत तुकाराम, संत नामदेव व इतर संतांनी या ठिकाणी काही काळ वास्तव्य करून याची महती अभंग व श्लोकाद्वारे केली आहे.
श्री क्षेत्र निरा नरसिंहपूर या क्षेत्राची मुंबई इलाख्याच्या गॅझेटिअरमध्ये (पान 261, व्हॉनल्यूंम अठरा, भाग-3 (1885) नोंद घेण्यात आलेली आहे. श्रीलक्ष्मी-नृसिंह देवस्थानाला पौराणिक आणि ऐतिहासिक महत्त्व असून महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्र प्रदेशातील लाखो भाविकांचे हे श्रद्धास्थान आहे. प्रत्येक वर्षी वैशाख महिन्यात श्रीनृसिंह जयंती नवरात्र उत्सव भक्तिभावाने साजरा होतो. ‘नृसिंह जयंती’च्या दिवशी भव्य सोहळा संपन्न होतो. याप्रसंगी हजारो भाविक उपस्थित राहतात व आपल्या दैवतापुढे नतमस्तक होतात. या ऐतिहासिक क्षेत्राचे महत्त्व ओळखून शासनाने सन 2001 मध्ये या क्षेत्रास राज्य संरक्षिहत स्मारक म्हणून घोषीत केले आहे.
या राज्यसंरक्षिनत स्मारकासाठी शासनाने २६० कोटी ८६ लाख रुपयांचा विकास आराखडा मंजूर केलेला आहे. विकास आराखड्यानुसार भक्त व पर्यटक निवास बांधकाम, सार्वजनिक सोयी सुविधा, माणकेश्वरवाडा संरक्षण भिंतीचे संवर्धन व बांधकाम, घन कचरा व्यवस्थापन, विद्युतीकरण, पथदिवे, विद्युत जनित्र, रस्त्यांचे रुंदीकरण व पथ सुशोभिकरण, बुडीत बंधारा बांधणे, जलक्रीडा प्रकाराकरीता धक्के व तराफे बांधणे, दळणवळण सोयीसुविधा इत्यादी कामे प्रस्तावित आहेत. यातील मंदिर परिसराचा पर्यटनाचा विकास करणे, मंदिर-नगारखाना, राज्यसंरक्षिेत स्मारक व विंचूरकरवाडा जनत/दुरुस्ती व सुमारे 800 मीटर लांबीचा पूर्वेकडील भिमा नदी व दक्षिणेकडील निरा नदीवरील संगम घाटाची पुरातत्वीय शास्त्र संकेतानुसार जतन, दुरुस्ती इत्यादी कामे सुरु आहेत.
श्री क्षेत्र निरा नरसिंहपूर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कुलदैवत आहे. ज्यावेळी मुख्यमंत्री या भागात दौऱ्यावर येत असतात ते आवर्जुन कुलदैवताच्या दर्शनासाठी येत असतात. या भेटीत ते येथील विकास कामांची पाहणी करुन आवश्यक निर्देश संबंधित यंत्रणांना देत असतात. त्यानुसार संबंधित यंत्रणांचाही या परिसराच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्यानुसार कामे दर्जेदार व वेळेत पुर्ण करण्याचा कटाक्ष असतो.
राज्य शासन श्री क्षेत्र निरा नरसिंहपूर तीर्थक्षेत्र पर्यटन स्थळ म्हणून विकसीत करत आहे. पर्यटनाला चालना देऊन राज्याचे उत्पन्न वाढविणे. रोजगाराच्या संधी उपलब्ध करणे व भाविकांना सर्व सोयी-सुविधा उपलब्ध व्हाव्यात असा उद्देश आहे.
आगामी काळात श्री क्षेत्र निरा नरसिंहपूर पर्यटन स्थळ म्हणून विकसीत होऊन राज्याच्या विकासात व नावलौकिकात निश्चितच भर घालणारे तीर्थस्थळ पर्यटनस्थल ठरेल..आणि ते पर्यटकांनाही भेटीनंतर नक्कीच अविस्मरणीय वाटेल, हा विश्र्वास आहे.
लेखक: शरद नलवडे
माहिती स्रोत: महान्युज
अंतिम सुधारित : 6/28/2020