वेशीवरच्या पाऊलखुणा : करंजगाव
हरवलेल्या इतिहासाचे करंजगाव !
आपल्या कुशीतील इतिहास हरवल्यावर जी रूखरूख लागते तीच रूखरूख निफाड तालुक्यातील करंजगावाबद्दल अनुभवायला मिळते. इतिहास हरवून बसलेला एक मोठा वाडा, त्याच्या अवतीभवतीची लहान लहान भग्न मंदिरे, डाव्या विचाराच्या चळवळींचा खंदा कॉम्रेड श्रीपाद डांगे यांचा भग्न झालेल्या स्मृती अन् देवाची मूर्ती नसलेले मंदिर मनाला रूखरूख लावते. तरीही महादेवाचे सुंदर मंदिर अन् करंज ऋषींची समाधी मनाला शांतता देत अन् हरवलेल्या इतिहासाच्या पाऊलखुणा शोधण्याची गरज व्यक्त करत रहाते.
गोदावरी नदीच्या किनारी वसलेले करंजगाव नाशिक-औरंगाबाद महामार्गापासून सायखेडा मार्गे साधारण आठ किलोमीटर तर निफाडपासूनही ते दहा किलोमीटरवर येते. सायखेडा-शिंगवे रस्त्यावरून गावात प्रवेश केल्यावर पुरातन राम मंदिर आपले स्वागत करते. पूर्वीचे दगडी मंदिर नंतरच्या काळात जीर्णोद्धार करून लाकडाचे बांधण्यात आले होते, मात्र कालांतराने त्याचीही अवस्था बिकट झाल्याने आता मंदिराचे नव्याने बांधकाम सुरू आहे. सीतेला हव्या असलेल्या सुवर्ण हरणाचा शोधात श्रीराम या गावात आल्याचे ग्रामस्थ सांगतात. त्यासंदर्भ गावातील रामाचे पुरातन राम मंदिराशी आहे. गावात फेरफटका मारताना नव्या जुन्या घरांचा अनोखा संगम पहायला मिळतो. आताचे करंजगाव नव्याने वसले असल्याचेही पहायला मिळते. पूर्वी गाव नदीलगत होते मात्र पुरामुळे अन् अन्य काही घडामोडींमुळे गाव सायखेडा-शिंगवे रस्त्याकडे वसले.
पण जुन्या गावाच्या खाणाखुणा अजूनही नदीलगत पहायला मिळतात. गावातील जुन्या घरांमधून मार्ग काढत नदीकडे निघाल्यावर एक पांढरेफटक लहानसे मंदिर लागते. मंदिरासमोर आमराई बहरली आहे. मंदिराची बांधणी पेशवेकालीन वाटत असली तरी ते त्यापूर्वीचे असावे असे पुरातत्त्व विभागाचे अमोल गोटे सांगतात. कारण मंदिरातून सांडपाणी बाहेर येण्यासाठी खापराची जलवाहिनी काढल्याचे पहायला मिळते. ही जलवाहिनी सुस्थितीत आहे. मंदिरात प्रवेश करताना दरवाजाच्या चौकटीवर एक गोलाकार छिद्र आहे. याचे प्रयोजन मंदिर स्थापत्यात मात्र लक्षात येत नाही. मंदिराच्या शिखरावर चार साधूंच्या प्रतिमा आहेत, त्या खूपच झिजल्याने प्रथम दर्शनी जैन ऋषींसारख्या वाटतात. मंदिराच्या अवतीभवती नक्षीकाम करण्यात आले आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात मूर्ती नाही. या मूर्तीबाबत एक रहस्य आहे. श्रीकृष्णाची एक सुंदर मूर्ती या मंदिरात होती. मात्र कॉ. श्रीपाद डांगे यांच्या मुलीने गाव सोडताना ती बरोबर नेली. तेव्हापासून या मंदिराचा गाभारा मोकळा आहे, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
जागतिक कामगार चळवळीच्या इतिहासात आपल्या कर्तृत्वाची मुद्रा उमटविणाऱ्या कॉ. श्रीपाद अमृत डांगे यांचे गाव म्हणूनही करंजगाव ओळखले जाते. 10 ऑक्टोबर 1899 मध्ये त्यांचा जन्म करंजगावात झाला. तरुणवयात डांगे यांनी 1920 मध्ये महात्मा गांधींच्या असहकार चळवळीत भाग घेतला व पुढे जाऊन 1925 मध्ये कम्युनिस्ट पक्षाची स्थापना केली. त्यानंतर त्यांनी भारतातील कामगार संघटनांत ऐक्य निर्माण करण्याची काम केले. कॉ. डांगे मुंबई विधानसभेवर व नंतर लोकसभेवर निवडून गेले. डांगे यांची साहित्यसंपदाही विपुल आहे. १९७० च्या दरम्यान त्यांनी लिहिलेले इतिहास कोण घडवतो? हे पुस्तक आवर्जून वाचावे असे आहे. मात्र त्यांच्याच जन्मगावातील वाचनालय पुरेशा निधी व कार्यकर्त्यांअभावी बंद पडले आहे. डांगे यांचे निधन २२ मे १९९१ मध्ये मुंबईत झाले. मात्र गावची कॉ. डांगेंचे गाव ही ओळख आठवणींच्या पुसट झालेल्या पाऊलखुणांशिवाय दिसत नाही. देवाची मूर्ती नसलेल्या मंदिरासमोर पूर्वी डांगे यांचा प्रशस्त वाडा होता. \
वाड्याचे अवशेष हेच आज वाड्याची भव्यता व वैभव सांगतात. आमराईत वाड्याची एक भक्कम भिंत अजूनही त्याचे वैभव दाखवून देते. या कोसलेल्या भिंतीवरील दगडावर असलेले नक्षीकाम डांगे कुटुंबीय श्रीमंत असल्याच्या खाणाखुणा दाखवतात. मात्र डांगे यांनी गावासाठी काहीच केले नाही अशी खंतही ग्रामस्थ व्यक्त करतात. कॉ. डांगे त्यांच्या उमेदीच्या काळात दोन-तीन वेळा गावात येऊन गेले. गावासाठी काही करण्याची इच्छाही त्यांनी बोलून दाखविली मात्र तसे काही घडले नसल्याचेही ग्रामस्थ सांगतात. म्हणून की काय गावात ना कॉ. डांगे त्यांचे स्मृतीस्थळ दिसते ना त्यांच्याबद्दल फारशी माहिती मिळते.
या उद्धवस्त वाड्यासमोरच तीन चार एकरात पसरलेला एक भव्य वाडा पहायला मिळतो. वाड्याला तीन प्रशस्त दरवाजे आहेत. अर्थात त्या दरवाज्यांच्या फक्त चौकटी कशाबशा तग धरून उभ्या आहेत. काही ग्रामस्थ हा वाडा डांगेचा असल्याचे सांगतात तर काही ग्रामस्थ हा वाडा ब्राह्मणवाडा म्हणून प्रसिद्ध असल्याचे सांगतात. या वाड्याशी निगडीत इतिहास आता उपलब्ध नाही. हा इतिहास शोधण्याचा प्रयत्नही गावाने केलेला नही. बुरूज असलेला अत्यंत प्रशस्त; पण भग्न वाडा मात्र नजरेतून हटत नाही. येणाऱ्या- जाणाऱ्याला बाहेरूनच त्याच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीची कल्पना येते. भोवताली तीन- चार छोटी; पण इतिहासाची साक्ष देणारी मंदिरंही आहेत. ती छोटेखानी असली तरी त्यांच्या बांधणीच्या शैलीचा अभ्यास करावा अशी ती आहेत. यातील एका शिव मंदिरावर पेशवेकालीन चित्र होती. मात्र मंदिराचे छत मोडकळीस आल्याने पाऊस व वातावरणामुळे ती चित्रे इतिहासात जमा झाली आहेत. या मंदिराची रचना अनोखी आहे. त्याच्या अवतीभवती विरगळी आहेत. त्यावर घोड्यावर बसलेले जोडपे हातात तलवार घेऊन स्वार झालेले आहेत. यावरून गावाने कधीकाळी लढाई अनुभवली असेल असे वाटत रहाते.
नदी किनारी श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर सुंदर आहे. त्याच्या शेजारीच करंज ऋषींची समाधी आहे. करंज ऋषींच्या नावावरूनच गावाला करंजगाव असे नाव पडल्याचे म्हटले जाते. मात्र करंज ऋषी कोण? याबाबत काहीच माहिती मिळत नाही. करंज महाराजांची समाधी छोटेखानी पण पहाण्यासारखी आहे. नदीकिनारी खंडोबा व इतरही लहानमोठी मंदिरे आहेत. त्यातही अनेक मूर्ती पहायला मिळतात. एक दोन मंदिरे मातीत गाडली गेली आहेत. त्यांचा दगडाचा घुमट आपल्याला मदतीचा हाक देतोय असे वाटत रहाते. पाडव्याला गावात बारागाड्यांचा उत्सव व महाशिवरात्रीचा उत्सव पाहण्यासारखा असतो.
मात्र बोहाड्यांचा कार्यक्रम काही वर्षांपासून बंद करण्यात आल्याने उत्सवात त्याची कमतरता जाणवते, असेही ग्रामस्थ सांगतात. डाव्या विचारसरणीच्या कॉ. श्रीपाद डांगेचा या गावातील जन्म असला तरी डावी चळवळ येथे कधीच रूजली नाही, ना कम्युनिस्ट पक्ष रूजला. मात्र अन्यायाविरूद्ध लढण्याची जिद्द या मातीतच असल्याचे दिसते. काही वर्षांपूर्वी करंजगावातील महिलांनी दारूबंदीसाठी उभारलेल्या लढ्यावरून हे लक्षात येते. मात्र इतिहास घडवल्याने इतिहासाचे सुवर्णपान झालेल्या गावाला `इतिहास कोण घडवतो?’ असे म्हणावे लागते हे अस्वस्थ करणारे आहे.
लेखक - रमेश पडवळ
अंतिम सुधारित : 7/12/2023
खाद्या गावात काय दडले आहे हे अनेकदा त्या गावापुरते...